नारायण राणेंपासून राज ठाकरे यांच्यापर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक बंडामागे शरद पवार
दीपक केसरकर यांचा आरोप


मुंबई / मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपच सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता शिवसेनेत आधी झालेल्या बंडाविषयी मोठा खुलासा झाला आहे. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. यामुळे आता राज्यात नवीन वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत. “नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती.
तर शिवसेना सोडताना राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते.” असा गंभीर आरोप केसरकरांनी शरद पवारांवर केला आहे. केसकर का वृत्त वाहिनीशी बोलत होते. “मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहिजे.” असे केसकर म्हणाले. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना केसकर यांनी एक किस्सा सांगितला.
केसकर म्हणाले, शरद पवारांनी विश्वासात घेत राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावे हे मी त्यांना सांगितले नाही, असे शरद पवारांनीच सांगितले होते. छगन भुजबळ यांना बाहेर काढत आपल्यासोबत घेतले. असे केसकर म्हणाले. राज ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाला देखील शरद पवारांचा पाठिंबा होता.” असा गंभीर आरोपही केसरकरांनी केला आहे.
“उद्धव ठाकरेंना चुकीच्या नेत्यांचं मार्गदर्शन”
शिवसेनेच्या वतीने मंत्रिमंडळाचा शपथविधी रोखण्यासाठी पत्र देण्यात आल्यासंबंधी विचारण्यात आलं असता केसरकर म्हणाले की, “लहानपणी क्रिकेट खेळताना ज्याचा बॅट, बॉल असतो तो आऊट झाल्यावर सगळं घेऊन घरी जातो. याला आम्ही रडीचा डाव म्हणायचो. हा रडीचा खेळ राजकारणात असता कामा नये. राजकारण सर्वसामान्यांसाठी असून ते त्यांच्यासाठीच केलं पाहिजे”. उद्धव ठाकरेंना चुकीच्या नेत्यांचं मार्गदर्शन होत असल्याने अशी पावलं उचलली जात असावीत असा आरोप केसरकर यांनी केला.
शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आम्ही एका महिला आदिवासी उमेदवाराला पाठिंबा दिला याचा अर्थ भाजपाला नाही असं विधान केलं होतं. यावर बोलताना ते म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी त्यांना उमेदवारी दिली आहे. आजपर्यंत एकही आदिवसी आणि विशेषकरुन महिला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली नाही”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा पाठिंबा कोणा एका व्यक्तीचा नसून, महाराष्ट्राच्या जनमताचं प्रतिक आहे. बाळासाहेब ठाकरे प्रसंगी एनडीएच्या बाहेर जाऊन मतदान करायचे. उद्धव ठाकरेंनी आज तो गित्ता गिरवला आहे, याबद्दल मला सार्थ अभिमान आहे”.
“बाळासाहेबांनी मी शेवटची व्यक्ती असलो तरी मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, पाठिंबा देणार नाही असं सांगितलं होतं. मग त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेने काँग्रेससोबत जाणं ही त्यांच्या विचारांशी प्रताडणा आहे असं मी समजतो. जर बाळासाहेबांना एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर पाहायचा होता, तर हा एक सुखद धक्का आहे,” असं केसरकरांनी सांगितलं.
“मला महाराष्ट्रभरातून असंख्य फोन येतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे, पण त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंचे आशीर्वादही हवेत असं सांगतात. हे आशीर्वाद मिळतील तेव्हा प्रत्येक शिवसैनिक आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं सांगेल,” असंही केसरकरांनी नमूद केलं. आमचे खासदारही भाजपाला पाठिंबा देतील तेव्हा आम्ही एनडीएत सहभागी झालो असं म्हणू शकतो. महाराष्ट्राचा विधिमंडळ पक्ष भाजपासोबत गेल्याने आम्ही तांत्रिकदृष्ट्या एनडीएत सहभागी झालो आहोत असंही त्यांनी सांगितलं. भाजपाकडून शिंदे गटाला अधिकृत मान्यता आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “महाराष्ट्रात चुकीचं पसरवलं जात आहे. मला अनेकांनी फोन करुन उद्धव ठाकरेंना दिल्लीत निमंत्रण का नाही असं विचारलं. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नेहमी मातोश्रीवर गेला आहे. मातोश्रीचा प्रतिनिधी कधीही राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासंबंधी बैठकीला गेलेला नाही. तीच महती कायम ठेवली पाहिजे असं मी मानतो”.