Uncategorized

नामदेव ढसाळ यांचा “गोलपीठा” हा शोषित, वंचित आणि दलितांचे वास्तव मांडणारा संग्रह

अमर हबीब यांचे मत


ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा “गोलपीठा” हा शोषित, वंचित आणि दलितांचे वास्तव मांडणारा संग्रह आहे असे मत ज्येष्ठ लेखक, समिक्षक अमर हबीब यांनी व्यक्त केले.
मसाप शाखा अंबाजोगाई च्या वतीने आधार मल्टिस्टेट घ्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मासिक पुस्तक परिचय उपक्रम नामदेव ढसाळ यांच्या “गोलपीठा” या प्रसिद्ध कवितासंग्रहाचा परिचय करून देताना बोलत होते.
आपल्या विस्तारीत विवेचनात बोलताना अमर हबीब पुढे म्हणाले की, या पुस्तकाला जेष्ठ नाटककार, श्री. विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना आहे. या कविता संग्रहात नामदेव ढसाळ यांच्यातील कार्यकर्ता, लेखक ते पॅन्थर कार्यकर्ता इथं पर्यंतची ओळख झाली आहे. दलित पँथर चळवळीचे संस्थापक सदस्य, मराठी दलित साहित्याला क्रांतिकारी वळण देणारा कवी असलेल्या नामदेव ढसाळ यांच्या कवितेत दलितांचे जीवन, मुंबईची झोपडपट्टी, समाजातील अन्याय व शोषण याचे कडवे, उग्र पण वास्तव दर्शन घडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे दर्शन त्यांच्या साहित्यातून सतत दिसते. माणुस म्हणून जगण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेतून सूर्याची उपमा दिली आहे.


या कविता संग्रहातील भाषेतील निखळ वास्तववाद, शिवीगाळ यामुळे त्याकाळी त्यांना विरोधही झाला. पण त्यांच्या लेखनात समाजाचे जळजळीत सत्य दिसते. नामदेव ढसाळ यांचा गोलपीठा हा कविता संग्रह मराठी साहित्यातील टर्निंग पॉइंट आहे. दलित साहित्य केवळ करुणा किंवा सहानुभूतीत न राहता ते त्यांनी बंडखोरी व वास्तव वादाकडे नेले. संस्कृत, अभिजात परंपरेला धक्का देत, शुद्ध, गोड भाषेच्या काव्यधारेत अचानक आलेली धाडसी, उग्र,भाषा यांच्या माध्यमातून समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांचे वास्तव जगासमोर मांडते.
त्यांच्या कवितेचा विषय स्थानिक असला तरी ती मानवी शोषणाची सार्वत्रिक कहाणी बनते.
“गोलपीठा” हा कविता संग्रह म्हणजे शोषितांचे, वंचितांचे, आणि दलितांचे वास्तव मांडणारा क्रांतिकारी दस्तावेज आहे. नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेतून केवळ सौंदर्य शोधले नाही, तर समाजातील विद्रूपतेला तोंडावर आणून साहित्य म्हणजे समाजाचे आरसे असतात हे सिद्ध केले. नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेतून थेट, आक्रमक आणि क्रांतिकारक दलित जीवनातील दैन्य, संघर्ष, लैंगिकता, हिंसा, असमानता यांचे निर्भीड चित्रण केले आहे.


या काव्य संग्रहाची प्रस्तावना ही ज्येष्ठ नाटककार तथा साहित्यिक मंगेश तेंडुलकर यांनी लिहिली असून ती अतिशय बोलकी आहे. नामदेव ढसाळ यांच्या कविता म्हणजे संत तुकाराम महाराज यांच्या खऱ्या अभांगाचे रूप आहे. नामदेव ढसाळ यांच्या कवितेच्या काही ओळी आपल्याला त्यांच्या विचारांची आणि साहित्याची जाणीव करुन देतात असे तेंडुलकर यांनी म्हटले आहे.‌ .. नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये, काळा गोरा म्हणू नये, तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये असे म्हणत अभाळाला आजोबा अणि जमिनीला आजी माणून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने रहावे असा संदेश त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून दिला असल्याचे अमर हबीब यांनी आपल्या विवेचनातून सांगितले.


प्रारंभी मसापचे सचीव गोरख शेंद्रे यांनी मसापच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पुस्तक परिचय उपक्रमाबद्दलची माहिती दिली. मसाप मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य दगडू लोमटे यांच्या हस्ते अमर हबीब यांचा शाल, बुके व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला. प्रा. सुरेश सोनवळकर यांनी अमर हबीब यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमास शहरातील वाचन प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button