परिवर्तन चळवळीला वाहिलेले व्यक्तीमत्व; प्रा. डी. जी. धाकडे


मानव हा समाजशील प्राणी आहे तो समाजात जन्मतो, वाढतो आणि आपला सर्वांगीण विकासही समाजातच करून घेतो समाज हा ज्या पद्धतीने मानवाला घडवत असतो त्याच पद्धतीने मानवही स्वतः घडत-घडत समाजाची घडी बसवत असतो. ही समाजाची एकमेकांवर अवलंबून असलेली प्रक्रिया आहे. मात्र, जेव्हा ही समाजाची घडी श्रेष्ठ -कनिष्ठ ,ऊच -नीच,गरीब- श्रीमंत या भेदाभेदात विस्कटली जाते तेव्हा समाजाला उभे तडे जातात. याचे परिणाम समाजातील बहुजन- वंचित ज्यांच्या हातात स्व-संरक्षणाची किंवा उन्नतीची साधने नाहीत अशांना भोगावे लागतात. म्हणून अशा वंचितांना त्यांच्या उन्नतीचे व स्व-संरक्षणाचे साधने उपलब्ध करून देण्याच्या व समतेची वागणूक मिळवून देण्याच्या भूमिकेतून अगदी प्राचीन काळातील संत-महंत, परिवर्तनाच्या चळवळी उभ्या करणारे गौतम बुद्ध , फुले-शाहू-आंबेडकर आदि समाज सुधारकांनी जीवाचं रान करून समतेचा लढा उभा केला, आणि स्वातंत्र्य-समता-बंधुता- न्याय व प्रज्ञा-शील -करुणा या संविधानिक व सामाजिक मूल्यांची पेरणी समाजात केली, ज्यामुळे समतेच्या मूल्यारूपी बीजाचा बोधिवृक्ष आज फुला-फळाला आलेला पहावयास मिळतो आहे.


या संविधानिक मूल्याची गोड फळं आज बहुजन- वंचित नवा तरुण चाखत आहे ,आणि वंचितपणाची लक्तर बाजूला सारून प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. आपले हक्क-अधिकार अबाधित ठेवण्यासाठी उजळ माथ्याने रस्त्यावर उतरत आहे. परिवर्तनाची नवी दिशा, नवी मळवट शोधण्यासाठी हाती मशाल घेऊन अज्ञानाच्या अंधारात डोकावत आहे . यातूनच अनेक परिवर्तनवादी संघटना ,चळवळी नावारूपाला आलेल्या आहेत. ज्या बहुजन- वंचितांच्या परिवर्तनाला व विकासाला प्रेरक ठरत आहेत. याच परिवर्तनाच्या चळवळीला वाहिलेलं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डी.जी. धाकडे सर जे विद्यार्थी दशेपासून ते आज तागायत तन-मन-धनाने आणि तरुणाला लाजवेल इतक्या उत्साहाने चळवळीच्या कामात कार्यरत आहेत आज त्यांचा 75 वर्षे पूर्ती निमित्त अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत आहे. हा सोहळा आपणास अनुभवायास मिळत आहे ही बाब आपल्यासाठी प्रेरणादायी व आनंददायी आहे.
वास्तविक सर मूळचे अंबाजोगाईचे नाहीत. ते नोकरीच्या निमित्ताने आंबेजोगाईत आले आणि कायमचेच आंबेजोगाईकर झाले ते आंबेजोगाईच्या विविध चळवळीतील इतके सक्रिय सहभागी झाले की, त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. सरांचा जन्म त्यांचे मूळ गाव सावी (बु) जिल्हा अमरावती या गावी, वडील दादाराव व आई शांताबाई यांच्या पोटी 15 सप्टेंबर 1948 रोजी झाला. घरची अत्यंत हालाखीची परिस्थिती रोजंदारी करून हातावर पोट घेऊन भटकत फिरणाऱ्या आई बापाचं दुःख सरांनी उघड्या डोळ्यांनी बालपणीच पाहिलं होतं, त्यामुळे शाळेच्या वयात असतानाच त्यांनी शनिवार -रविवार हाताला लागेल ते काम करून आई-वडिलांना मदत करायचे. शाळेची दोनाने- चयाराणे फीस भरण्यासाठी पैसे मिळत नव्हते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सावी या मूळ गावी झाले.


त्यानंतर चौथी ते सहावी मावशीकडे विहिगाव तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती या ठिकाणी झाले ,पुढे ते सातवीचे शिक्षण इसूदना तालुका तिरुपुर जिल्हा अमरावती या ठिकाणी पूर्ण केले, मात्र त्याही ठिकाणी ते दीर्घकाळ टिकले नाहीत पुढे आठवीचे शिक्षण असदपुर तालुका इचलपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी घेतले. पुढे नववी, दहावी अमरावती वस्तीगृहात राहून त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर सर औरंगाबादला गेले आणि उच्च शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथून पूर्ण केले.खरंतर सरांचं उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व प्रवास अस्थिर आणि दिशाहीन अशा पद्धतीचे झालेलं आहे, कसल्याच प्रकारचा थारा नसल्यामुळे जमेल तिथे राहणे आणि जमेल तसे शिकणे हीच पद्धत त्यांनी अवलंबली पण शेवटपर्यंत शिक्षण न सोडता ते चिकाटीने शिकत राहिले ,त्यांची शिक्षणाविषयीची जिद्द ही वाखाणण्या जोगी आहे. ते उच्च शिक्षण घेऊन 3 सप्टेंबर 1986 रोजी आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात रुजू झाले ,त्यांची शिफारस आर. पी. नाथ यांनी केली होती, त्याकाळी प्राचार्य म्हणून एम.डी नाडकर्णी हे होते. महाविद्यालयात रुजू झाल्यानंतर सहा महिने नोकरी केली आणि नंतर ते औरंगाबादला परत गेले त्यावेळेस कसल्याही प्रकारचा नोकरीसाठी लागणारा अर्ज त्यांनी केलेला नव्हता. हे जेव्हा बाबासाहेब परांजपे आणि बेथुजी गुरुजी यांना कळले तेव्हा त्यांनी सरांना पुन्हा बोलून घेतले आणि कायम पूर्णवेळ येथेच नोकरी करण्याचे सांगितले, आणि तिथून पुढे सर शेवटपर्यंत याच महाविद्यालयात राहिले.
वास्तविक बहुजन समाजातून आलेल्या विद्यार्थ्यांना किंवा प्राध्यापकांना त्या काळात कोणत्याही क्षेत्रात स्वीकारण्याची मानसिकता सकारात्मक समाजात नव्हती, तरीही केवळ संस्थेतील समाजवादी चळवळीशी एकनिष्ठ असलेल्या काही कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी आपली नोकरी आणि कार्य चालू ठेवले. सुरुवातीच्या काळात आंबेजोगाईत त्यांना घर भाड्याने घेणे हे अत्यंत कठीण गेले .याच काळात धर्मगुरू भंते उपाली हे धर्मसुधारणेच्या चळवळीसाठी आंबेजोगाई आले होते तेव्हा त्यांना राहण्यासाठी खोली मिळाली नाही त्यामुळे त्यांनी स्वतंत्र बंगला घेतला आणि आणि आपलं चळवळीचे काम तिथून सुरू केलं त्यात सरांचा मोलाचा वाटा होता ही जागा कार्यकर्त्यांसाठी एकत्रित येऊन विचार विनिमय करून संघटना बांधणीसाठी महत्त्वाची ठरली.पुढे त्याच ठिकाणी त्यांनी धम्म उपासक संघ स्थापन केले आणि आंबेजोगाईत बौद्ध विहारही बांधले.
या धम्म उपासक संघाचा पहिला कार्यक्रम धोबीघाट या ठिकाणी झाला. पुढे सर बौद्ध चळवळ , धार्मिक चळवळ, नामांतराची चळवळ विद्यार्थी चळवळ ,ग्राहक भांडार चळवळ, सहकार चळवळ अशा अनेक चळवळीच्या रूपाने अंबाजोगाई व परिसरात लढत राहिले . मुळात सरांचं बालपण अत्यंत कष्टमय आणि वेदनेत गेलेले असल्यामुळे त्यांचा हा स्वभाव शांत अत्यंत, संयमी, मितभाषी आणि परोपकारी आहे. अन्याय सहन करणे त्यांच्या रक्तात नाही. त्यामुळे ते महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थी चळवळीत सक्रिय होते ,त्याचाच परिणाम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाही विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, मागासवर्गीय प्राध्यापकांच्या जागा भरणे, महात्मा फुले वस्तीगृह अशा अनेक स्वरूपातून त्यांनी कार्य केले .त्यांना या चळवळीतून अनेक वेळा अटकही झाली होती.


सरांनी काम केलेल्या विविध चळवळीत नामांतराची चळवळ हा महत्त्वाचा टप्पा होता. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावं यासाठी संपूर्ण मराठवाडा पेटलेला असताना सरांनी आंबेजोगाई व परिसरात काही सहकाऱ्यांच्या मदतीने आंदोलन हाती घेतलं होतं . इतर भागात ज्या पद्धतीने आंदोलने, जाळपोळ झाली तशा पद्धतीचे यांचं आंदोलन नव्हतं. त्यांनी शहरातील व परिसरातील नामवंत सुवर्ण जातीतील लोकांना एकत्रित करून आमची मागणी काय आहे ती समजावून सांगितली होती. हा जातीचा लढा नाही ,हा श्रेयवादाचा लढा नाही किंवा धनसंपत्तीप्राप्तीच लढा नाही ,तर हा नामांतराचा, अस्मितेचा लढा आहे आणि. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळावं इतकाच मर्यादित लढा आहे, त्यासाठी आपण सर्वांनी याला समर्थन दिलं पाहिजे अशी भूमिका सर ठासून मांडायचे आणि ही भूमिका सर्वांनाच पटायची त्यामुळे परिसरात कसल्याच प्रकारची हिंसा झालेली नाही, यावेळी सर आंदोलन दोन टप्प्यात चालवायचे एकीकडे त्यांची पत्नी आणि बहुजन समाजातील अनेक महिला जेलभरो आंदोलन करत होत्या तर तरूण मुलं रस्त्यावर उतरून आक्रोश करत होते, तर सर सहकाऱ्यांसमवेत इतर जाती- धर्मातील लोकांना एकत्रित करून या विषयाचं गांभीर्य पटवून द्यायचे. ही आदर्श चळवळीची- आंदोलनाची वेगळी दिशा सरांनी त्या काळात निर्माण केली होती. या कामात मोरे सर, सबमिशन सर अशा अनेक आंबेजोगाई आणि परिसरातील कार्यकर्त्यांचा सहभाग मोलाचा होता. चळवळीच्या पार्श्वभूमीवर सरांनी कायमच समन्वयाची भूमिका घेतली ,ज्यामुळे हिंसेला प्रोत्साहन कधीच मिळाले नाही.
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भूमिहीन सत्याग्रहांची मोठी चळवळ जेव्हा सुरू झाली होती ती दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात व गवई यांच्या समवेत यात सरांनी सक्रीय सहभाग घेतला होता. यात सरांना अटक ही झाली होती मात्र चळवळीच्या कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे शिक्षणात पुढे अडथळा नको म्हणून दादासाहेब गायकवाड यांनी झालेली अटक टाळून सरांना घरी पाठवलं होतं.
सरांना ग्रंथाविषयी अफाट प्रेम आहे. वाचन -लेखन याची अफाट आवड असल्यामुळे त्यांनी पुढे ग्रंथालय चळवळ सुरू केली बारा वर्ष ते जिल्हा ग्रंथ संघाचे अध्यक्ष होते त्यांनी विविध वाचनालय चालवले. चळवळीत काम केलेले असल्यामुळे वाचनालय चळवळ कशी चालवावी याचा मोठा अभ्यास त्यांना होता. गाव -खेड्यातील गोरगरीब मुलांनी शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे यासाठी वाचनालय चळवळ किती महत्त्वाचे असते हे ते वारंवार पटवून सांगत असत. या वाचनालय- ग्रंथालय चळवळीत ही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय ते आजही चालवतात. सर दोन टर्म योगेश्वरी शिक्षक पतसंस्थेचे सचिव होते . तसेच ते सोसायटी, ग्राहक भांडार, अजिंठा पतपेढी याचेही ते पदाधिकारी होते. त्यांनी या सहकार चळवळीच्या माध्यमातून प्राध्यापक -शिक्षक यांना मदत केलीच पण त्याचबरोबर ग्राहक भांडार च्या माध्यमातून गोरगरीब लोकांसाठी रेशन दुकान उघडून कमीत -कमी दरात घर उपयोगी लागणाऱ्या वस्तू त्यांना कशा मिळतील याच्यासाठी ते आज तागायत झगडत आहेत. त्यांचं ग्राहक भांडार आजही तितक्याच जोमाने कार्यरत आहेत.
सर विविध चळवळीत काम करत होते पण त्यांचं संपूर्ण कुटुंब ही त्यांच्यासोबतच कार्यरत होतं त्यामुळे घराची चिंता सरांना कधीच नव्हती. . मात्र सरांच्या वैचारिक पायाभरणीत मा.फुले यांचा वारसा तितकाच ठासून भरलेला होता. त्यांनी बारावीनंतर पत्नीला एम. ए .राज्यशास्त्र, मराठी ,बीएड केले आणि प्राध्यापक म्हणून नोकरीला लावले. घर-नोकरी हे संपूर्ण सांभाळत सांभाळत त्यांनीही सरांना चळवळीच्या कामात भाग घेतला. कार्यकर्त्यांची पत्नी म्हटलं की ‘गाड्या संगे नळ्याची जत्रा, आलीच ,ताईंनीही ते भक्कमपणे स्वीकारलं आणि घर, नोकरी आणि सामाजिक चळवळीतला सहभाग तितक्याच ताकतीने पेलला. खरंतर हाडाचा चळवळीचा कार्यकर्ता जो असतो तो कायमच आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी स्वतःला वाहून घेत असतो ,पण सर एकीकडे विविध चळवळीत सक्रिय होते त्याचबरोबर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून विद्यार्थी प्रिय व अभ्यासू प्राध्यापक म्हणून चर्चेचा विषय होते,तर कुटुंब म्हणून भक्कमपणे पालकाचे दायित्व निभावत होते त्यामुळे त्यांचे पाल्य डॉ. राहुल धाकडेसह आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत, तेही आज वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यात भक्कमपणे पाय रोवून आहेत.
सर म्हणतात,” काम कोणतंही छोटं-मोठं नसतं ते आनंदाने केलं पाहिजे, कामालाच ईश्वर मानून आपण सतत कार्य करत राहिले पाहिजे तरच यश मिळतं”. ही एका सात्विक आणि चळवळीच्या कामात आयुष्य घालवणाऱ्या कार्यकर्त्याची निर्मळ भूमिका आहे. ती मनोमय भावना आहे. आजच्या कार्यकर्त्याला प्रेरणादायी ठरणारी आहे. ते पुढे मचळवळीचे काम म्हणजे,” घर का खाना आऔर मुक्तमे बकऱ्या चरण” त्यांनी बाबासाहेब परांजपे यांना अत्यंत जवळून अनुभवलेला आहे त्यांच्या चळवळीचा पिंड त्यांनी आपल्यात उतरवलेला आहे त्यांच्या अनुभवावरून व कार्यशैलीवरून .ते म्हणतात,” कार्यकर्त्याने कधीही प्रसिद्धीच्या मागे लागू नये, बाबासाहेब परांजपे सांगायचे,”सूर्य उगवला की नाही, दार उघडून पाहण्याची गरज नसते तर फटीतून आपोआप किरणे आत येतात.” याच प्रेरणेतून सरांनी कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता राजकारणात अनेक वेळा सक्रिय सहभागाची संधी चालून आली असता त्यांनी ते नाकारली. त्यांना राजकारणात व इतर संघटनेत वेगवेगळी पदे बहाल करण्याचे प्रलोभने आले ,असले तरी त्यांनी ते सपसेल नाकारून सामाजिक चळवळ हीच आपल्या आयुष्याचे ध्येय आहे असे मानून कार्य करत राहिले.


ते म्हणतात,” बहुजन चळवळीत खोटं बोललं जात नाही. पण आज कार्यकर्ते अशा खोटेपणाचा आश्रय घेतात आणि स्वार्थापोटी संघटना बदलतात ही चळवळीच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुःखाची बाब आहे”. अशी खंतही ते व्यक्त करतात. ते पुढे म्हणतात,” माझ्या जीवनातला विलक्षण आनंदाचा क्षण म्हणजे नामांतर चळवळीत घेतलेला सहभाग, आणि त्यात मिळालेले यश .काम हेच बोलतं त्यामुळे बहुजनातील विद्यार्थी व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी जीव तोडून मेहनत करावी आपल्या कामाचा ठसा उमटवा. थांबला तो संपतो .मृत्यू अटळ आहे तो ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी निश्चित ठरलेला आहे पण तो केव्हा येईल हे सांगता येत नाही तोपर्यंत आपण लढत राहिले पाहिजे. लढता- लढता मृत्यू येणे हे चळवळीच्या कार्यकर्त्यांचं यश असतं ही चळवळीत काम करणाऱ्या यशस्वी कार्यकर्त्या 75 वर्षे पूर्तीची मानसिकता खरोखरच तरुणाला लाजवेल अशाच पद्धतीची आहे.
खरंतर सरांचा आणि माझा दीर्घकाळाचा सहवास नाही ,तसेच सरांच्या चळवळीच्या कालखंडाचा मी साक्षीदारही नाही आणि त्यांच्या आणि माझ्या वयातलं अंतर पाहता त्यांचं कार्य, अनुभव माझ्या बुद्धीला आणि लेखणीला पेलवणारही नाही, पण सरांचा दि.. 17 सप्टेंबर 2023 रोजी अमृत महोत्सवी वर्ष सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त सहज सरांशी विविध विषयावर संवाद साधला आणि माझ्या हाती जो सच्चा कार्यकर्ता होण्याचा खजिना सापडला, त्यातला माझ्या बुद्धीला झेपेल तितकाच मी यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर आपण हाडाचे कार्यकर्ते आहात. उत्तम वाचक, संवादक आहात. माणसं जोडण्याचं कसं आपल्यात ठासून भरलेला आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची तळमळ आपल्यात आजही तितकीच दिसून येते. आपण असेच याही पुढे कार्य करत राहा. आपले व आपल्या कुटुंबाचे आयुष्य सुखी ,समाधानी, आनंदमय जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपणास अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा…


प्रा. डॉ. देविदास खोडेवाड
मराठी विभाग
खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई.