आ. नमिता मुंदडा यांनी केली विधीमंडळाच्या अधिवेशनात मागणी
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात कॅन्सर विभाग पुर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.
राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सध्या राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न अधिवेशनात विधिमंडळ सभापतींच्या समोर मांडुन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत असतात.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय हे आशिया खंडातील एकमेव ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आहे. या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या माध्यमातून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत असते. याच उद्देशाने या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात या विभागातील कॅन्सर रोगाने ग्रस्त झालेले अनेक रुग्ण आढळून येत असल्यामुळे सुमारे पंचेवीस वर्षांपूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागात कोट्यवधी रुपये खर्चून स्वतंत्र कॅन्सर विभाग निर्माण करण्यात येवून या विभागात रोग निदान आणि उपचारांची सुरुवात करण्यात आली होती. मात्र हा विभाग कालांतराने पुरेसे तंत्रज्ञ आणि अनुभवी तज्ञ डॉक्टर मिळत नसल्याने बंद करण्यात आला.
सदरील विभाग बंद होवून ही आता पंचेवीस वर्षांचा कालावधी उलटून गेला असतांनाच या विभागाच्या आ. नमिता मुंदडा यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात मा. सभापती महोदयांसमोर बोलताना या विभागात अजून ही मोठ्या प्रमाणावर कॅन्सर चे रुग्ण आढळून येत असून या रुग्णांना आर्थिक परिस्थिती नसतांनाही संभाजी नगर अथवा मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी जावे लागते असे सांगत या रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागात पुन्हा नव्याने कॅन्सर विभाग सुरु करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
कॅन्सर विभाग सुरु करण्याबाबत शासन काय घेणार निर्णय?
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित असल्यामुळे या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यात येते. या आ. नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर संबंधित मंत्री स्वतंत्र कॅन्सर विभाग सुरु करण्याबाबत काय निर्णय घेतात याकडे मतदार संघातील नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.