२०० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात!

आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे झाले शक्य
अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या २०० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामास आता सुरुवात झाली आहे. आ. नमिता मुंदडा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून आता प्रत्यक्ष कामास सुरुवात ही झाली आहे.
मराठवाड्याचे मागासलेपण दुर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७१ मध्ये मराठवाड्यातील बीड लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी मांजरा मध्यम प्रकल्पास मंजुरी दिली आणि १९८५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर या तीन ही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होवू लागली. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने जुलै १९८८ मध्ये एक शासकीय आदेश काढून या प्रकल्पातील पाणी अंबाजोगाई, लातुर, केज, कळंब या गावांसह इतर गावांतील पाणी पुरवठा योजनांना देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अधिन राहून तत्कालीन आ. डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी १९८८ मध्ये राज्य शासनाकडे ६५ कोटी रुपयांचा पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल केला आणि ही योजना मंजूर करवून घेतली. आज आपण या ६५ कोटी रुपये खर्चून १९९० च्या काळात निर्माण करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतील पाणी वापरत आहोत.
जुनी योजना कालबाह्य होण्यापूर्वीच नवीन योजना होणार कार्यान्वित
३४ वर्षापुर्वी कार्यान्वित झालेली ही पाणी पुरवठा योजना आता कालबाह्य झाली आहे. शहर विस्तारीकरण, वाढती लोकसंख्या आणि शेजारील गावांचा या योजनेतील समावेश ही प्रमुख कारणे असावीत. या विभागाच्या आ. नमिता मुंदडा यांनी दोन वर्षापूर्वी या शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. शहरातील वाढती लोकसंख्या, शहराचे विस्तारीकरण लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांपर्यंत पाणी पुरवठा योजना टिकेल अशा पध्दतीचा कृती आराखडा तयार करुन राज्य शासनाकडे २०० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल केला आणि सतत पाठपुरावा करून तो मंजूर ही करुन घेतला. आता ही जुनी योजना कालबाह्य होण्यापूर्वीच ही नवी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
जॅकवेल, फिल्टर, सहा टाक्यांसह होणार नवीन पाइपलाइन
या २०० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेत धरण क्षेत्रात उच्च दर्जाचा जॅकवेल, अंबा साखर कारखान्याजवळ नवीन फिल्टर प्लॅन्ट, शहरातील विविध विभागांत लागणारा पाणी पुरवठा लक्षात घेऊन आवश्यक साठवणुकीच्या सहा टाक्या, मांजरा धरणापासून ते शहरातील प्रत्येक विविध प्रभागात आवश्यक असलेल्या इंचाची नवीन एचडीटीइ स्वतंत्र पाइपलाइन व इतर वितरण व्यवस्थेचा समावेश राहणार आहे.
जॅकवेल ची जागा बदलणार
यानवीन पाणी पुरवठा योजनेत साध्या असलेल्या जॅवलेल पासून धरणक्षेत्रात पुढे २०० मीटरवर असलेल्या ठिकाणी जॅकवेल बसवण्यात येणार आहे. सध्या असलेल्या जॅकवेलमधून धरणातील पाणी संपत आले की ते पाणी ओढण्यास हा जॅकवेल असमर्थ ठरत होता, म्हणून आहे त्या जॅकवेलच्या पुढे २०० मीटर अंतरावर हा नवा जॅकवेल बसवण्यात येणार आहे. यामुळे धरणात कमी पाणीसाठा असला तरी धरणातील पाणी सहज ओढता येणार आहे.
▪️ जॅकवेल ते फिल्टर १८ किमी.
उच्च दर्जाची पाइपलाइन
मांजरा धरण क्षेत्रात बसवण्यात येणाऱ्या नवीन जॅकवेलपासून ते अंबा साखर कारखाना जवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन फिल्टर प्लॅन्ट चे अंतर साधारणतः १८ किमी असून या अंतरामध्ये मोठ्या व्यासाचे डीआय पाइप टाकण्यात येणार आहेत. तर या फिल्टर प्लॅन्ट पासून मोरेवाडी विभागातील छत्रपती संभाजी राजे चौकातील एमडीआर (सर्वात मोठे पाणी स्टोरेज साठवणुकीच्या टाक्या) येथ पर्यंत पाणी आणून ते शहरातील विविध प्रभागातील सहा टाक्यांमध्ये पोहचवण्यात येणार असून तेथून ते वितरीत करण्यात येणार आहे.
▪️सहा नव्या टाक्यांची होणार निर्मिती
शहरातील विविध प्रभागात पाणी वितरीत करण्यासाठी शहरात सहा नवीन पाण्याच्या टाक्या निर्माण करण्यात येणार आहेत. यामध्ये मेडिकल कॉलेज परीसरात २६ लाख लिटर साठवण क्षमतेची १ टाकी, रविवार पेठ विभागात ११ लाख लिटर साठवण क्षमतेच्या २ टाक्या, बोधवर्धिनी परिसरात ५० हजार लिटर क्षमतेची १ टाकी, मोरेवाडी परीसरात ९ लाख लिटर क्षमतेची १ टाकी तर राष्ट्रीय संत भगवान बाबा चौक परिसरात १.२५ लाख लिटर क्षमतेची १ टाकी अशा ६ टाक्या निर्माण करण्यात येणार आहेत. शहराच्या विविध प्रभागात बांधण्यात येणाऱ्या या सहा टाक्यातुन शहरातील विविध प्रभागात ८ इंच, ६ इंच, ५ इंच आणि २ इंच व्यासाच्या पाइपलाइन मधुन पाणी वितरीत करण्यात येणार आहे.
▪️२०२६ मध्ये पुर्ण होणार योजना
अंबाजोगाई शहर विकासाचा पुढील ५० वर्षांचा कृती आराखडा तयार करून ही २०० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून या योजनेतील मुख्य कामास आता सुरुवात करण्यात आली आहे.साधारत: दोन वर्षांमध्ये ही नवीन पाणी पुरवठा योजना तयार होणार आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अंकुश आडे, अपील कसबे व पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी ही योजना चांगल्या पद्धतीने पुर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या कार्यकाळात दाखल झाला प्रस्ताव
अंबाजोगाई शहर पाणीपुरवठा योजनेत सतत बिघाड होत असल्याचे पाहून तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी या नवीन पाणीपुरवठा योजनेला मुर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. आपल्या कार्यकाळात त्यांनी या मुळे योजनेत बदल करीत नवीन प्रारुप आराखडा तयार केला व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे योग्य यंत्रणेमार्फत तो पाठवला होता. या नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रारुप आराखडा तयार करण्यात तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांचे मोठे योगदान आहे.

आ. नमिता मुंदडा यांचा पाठपुरावा
अंबाजोगाई शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी ही योजना मंजूर करुन घेण्यासाठी दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले आहेत. आता या योजनेच्या प्रत्यक्ष कामास ही सुरुवात झाली असल्याने या विभागातील नागरिक आ. नमिता मुंदडा यांचे आभार मानत आहेत.