सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल झाल्याचे वृत्त तथ्यहीन!


माजी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजभवनमधील सूत्रांनी अशी बदली झाल्याचे नाकारले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी हेच अद्याप आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांना नारळ देऊन त्यांच्या पदावर महाजन यांची नियुक्ती झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक जणांनी महाजन यांच्या छायाचित्राचा वापर करून फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींवर पोस्ट केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजभवनमधील सूत्रांशी संपर्क साधल्यावर, असा कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोश्यारी यांनी 5 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. राज्यपाल पदाची त्यांची कारकीर्द गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या बारा नावांची आमदार पदी त्यांनी नियुक्ती केली नव्हती.
तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना त्यांची राज्य सरकारबरोबर अनेक वेळा चकमक उडाली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने कोश्यारी यांची बदली करावी, अशी मागणी अनेक वेळा केली आहे. महाजन यांचे अनेक नातेवाईक आहेत. तसेच महाराष्ट्रातही त्यांची ये-जा होत असते. राज्यपालपद हे निरपेक्ष असावे असा आजवरचा संकेत आहे. महाजन यांचे नातेसंबंध महाराष्ट्रात असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त करता येणार नाही, असेही काही उच्चपदस्थ राजकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सोशल मीडियावरील राज्यपाल बदलाची पोस्ट ही अफवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.