संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मानधन अदा करा ; आ. नमिता मुंदडा यांची मागणी


बीड जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीचे मानधन अदा करा अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृध्दपकाळ योजना व इतर विविध योजनेच्या लाभार्थीना देण्यात येणारे अनुदान मागील चार महिन्यापासून त्यांना अदा करण्यात आलेले नाही त्यामुळे सदर लाभार्थ्यांवर उपसमारिची वेळ आली असून सदर लाभार्थी त्रस्त आहेत. त्यामुळे सदर लाभार्थ्यांना त्वरित अनुदान उपलब्ध करून देनेबाबतची मागणी मी संदर्भीय पत्रान्वय केली होती. परंतु अद्यापही त्यांना त्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. हि गंभीर बाब आहे.
बीड जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे ५९७८०, संजय गांधी निराधार योजना (एस सी) ७३४०, संजय गांधी निराधार योजना (एस टी) ५९४, श्रावण बाळ योजना (सामान्य) १५०६६३, श्रावण बाळ योजना (एसटी) २१५०, श्रावण बाळ योजना (एससी) २११२३, एवढे लाभार्थी आहेत परंतु मागील आठ ते नऊ महिन्यापासून त्यांना अनुदान न मिळाल्याने ते त्रस्त आहेत. त्यामुळे सदर अनुदान तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करणे अत्यंत गरजेचे आहे.
तरी वरील योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे आहे. सदर अनुदानावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असून त्यांच्यासाठी तो मोठा आधार आहे. त्यामुळे वरील योजनातील लाभार्थी यांचे अनुदान तातडीने अदा करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.