योगेश्वरी देवीचा जन्मोत्सव; मार्गशीर्षचा नवरात्र महोत्सव !


कोकणवासीयांची कुलदेवता आणि अंबाजोगाई शहरवासीयांची ग्रामदेवता माता योगेश्वरी यांच्या मार्गशीर्ष नंवरात्र महोत्सवास खुप महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला माता योगेश्वरी देवीच्या जन्म झाला असल्यामुळे हा नवू दिवसांचा नवरात्र महोत्सव साजरा केला जातो, असे सांगितले जाते. या सोबतच १२ व्या शतकात मार्गशीर्ष पौर्णिमेलाच या योगेश्वरी मातेच्या मंदिराची स्थापना झाली, हा ही संदर्भ मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाशी जोडला जातो.
या मार्गशीर्ष महोत्सवास पुजा अर्चा, भजन किर्तन, वाघ्या मुरळी चे कार्यक्रम, गायन आदि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याशिवाय या नवरात्र महोत्सवानिमित्त आपले गा-हाणे योगेश्वरी माते कडे मागून तिच्या दरबारात सलग नवू, पाच, तीन दिवस बसण्याची प्रथा चालत आली आहे. जो भक्त या नवरात्र महोत्सव कालावधीत माते कडे आपले गा-हाणे मांडुन मातेच्या सेवेत लीन होतो, त्यांचे गा-हाणे दुर होते असे सांगतात. यांचा प्रत्यय अनेकांना आला असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्त मातेकडे आपले गा-हाणे मांडून जमेल तितके दिवस मंदिराच्या ओव-यांमध्ये बसून तिची सेवा करतात. १२ व्या शतकात मंदीर स्थापनेपासून सुरु झालेली ही परंपरा सतत सुरू आहे. याला आराध बसणे असे म्हणतात.


महाराष्ट्रात तुळजापुर, कोल्हापुर आणि माहुर ही तीन शक्तीपीठे मानली जातात. त्यापाठोपाठ अंबाजोगाई येथील योगेश्वरी माता आणि नाशिक वणी येथील सप्तशृंगी देवी या दोन्ही स्थळांना अर्धे शक्तीपीठ म्हणून मान्यता आहे. या सर्व ठिकाणी दस-याचा नवरात्र नवरात्र महोत्सव सर्व सर्व ठिकाणी साजरा केला जातो. मात्र योगेश्वरी देवीचा जन्मोत्सव म्हणून साजरा करण्यात येणा-या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवा साखरा उपक्रम फक्त अंबाजोगाई येथेच साजरा करण्यात येतो.
१२व्या शतकात जयंती नदीच्या तीरावर योगेश्वरी मंदिराची स्थापना झाल्याचे येथील शिलालेखात नमूद केलेले आहे. पूर्वीच्या काळी नगराची रचना ही नदीच्या काठी असायची. त्याच उद्देशाने १२ व्या शतकापूर्वी अंबाजोगाई शहर हे रेणुकादेवी परिसरात असणाऱ्या मूळ जोगाई या देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला असावे, असे सांगितले जाते. मात्र, कालांतराने काही प्रसंग उद्भवल्याने १२ व्या शतकात योगेश्वरी
मंदिराची हेमाडपंथी पद्धतीने उभारणी झाली.
मार्गशीर्ष पौर्णिमा हा योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा दिवस गृहीत धरून पूर्वीचे नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन हा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव अंबाजोगाईतील भाविकांनी
सुरू केला. या महोत्सवाच्या कालावधीत योगेश्वरी मातेचे दर्शन घेणा-या व मातेची सेवा करणा-या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. यासाठी योगेश्वरी मंदिरात आराध बसण्याची परंपरा १२ व्या शतकातच सुरू झाली.


५० वर्षांपूर्वीही योगेश्वरी मंदिरात किमान दोन हजार महिला कसल्याही सोयी सुविधा नसताना मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवात आराध बसत असत. पुढे महिलांची संख्या वाढू लागल्याने व देवल कमिटीची स्थिती सुधारल्याने या महिलांना सोयी सुविधा देण्यास सुरुवात झाली. आज आराध बसणाऱ्या महिलांची संख्या १२ हजारांच्या जवळपास असते. १२ व्या शतकापासूनची रूढ झालेली परंपरा आजही मोठ्या प्रमाणात साजरी होत असल्याचे योगेश्वरी देवल कमिटीचे ज्येष्ठ विश्वस्त भगवानराव शिंदे यांनी सांगितले.
▪️मूर्तिकला विकसित होण्याआधी
तांदळा
मूर्तिकला विकसित होण्याअगोदर देवीचा अवतार हा तांदळ्याचा असे. अशा प्रकारचे देवीचे तांदळे हे महाराष्ट्रात फक्त अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी व माहुर येथील रेणुका देवी मंदिर या दोनच शक्तीपीठाच्या ठिकाणी आहेत.
▪️ नारीशक्ती चा सन्मान
योगेश्वरी मंदिरात आराध बसणाऱ्या महिला नऊ दिवस, सात दिवस, पाच दिवस, तीन दिवस अशा पद्धतीने बसतात. मंदिरात आराध बसलेल्या महिलेला पूर्णाहुतीचा होम झाल्यानंतर व होमात आहुती पडल्यानंतर तिचे नातेवाईक अथवा घरची मंडळी साडीचोळीचा आहेर देऊन त्या महिलेचा सन्मान करतात व त्या आराध बसलेल्या महिलेला सन्मानपूर्वक घरी नेले जाते.
योगेश्वरी मातेचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव हा ३० नोव्हेंबर २०२२ पासून सुरु झाला आहे, तो ७ डिसेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे. या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवा निमित्ताने आपले गाऱ्हाणे मांडुन बसणा-या आराध महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे ही आयोजन देवल कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती देवल कमेटीचे अध्यक्ष तहसीलदार बिपीन पाटील, सतीश ऍड. शरद लोमटे यांनी दिली.


या शिवाय शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने या नवरात्र महोत्सवात आराध म्हणून बसणा-या महिलांना फराळ व चहा पाण्याची व्यवस्था ही सातत्याने करण्यात येत आहे. या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवा निमित्ताने शहरात योगेश्वरी मातेचा जागर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.