मांजरा धरणात वर्षभरपुरेल एवढाच पाणीसाठा; पाणी जपून वापरा!


५ शहरे आणि ६१ गावांना होतो पाणी पुरवठा!
लातूर, बीड, धाराशिव या तीन जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या धनेगाव येथील मांजरा धरणातून रोज ०.८ दलघमी इतका उपसा होत असून वाढत्या उष्णतेमुळे ०.२ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात धरणातील पाणी साठ्यात रोज सरासरी १ दलघमी इतकी घट होत आहे. तर धरणाच्या पाण्यावर ८ हजार हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली आले असून लातूर, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या प्रमुख ५ शहरासह ६१ गावांच्या पाणी पुरवठा सुरळीत आहेत.
लातुर एमआयडीसी सह ७५ गावांना मिळतो सिंचनाचा लाभ !
केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण हे २२४.०९३ दलघमी साठवण क्षमतेचे असून लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते. धरणातून लातूर शहर व एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या प्रमुख ५ शहरासह ६१ गावांसाठी पाणी पुरवठा केला जातो. तर धरणाच्या पाण्याचा ७३ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होत आहे. धरण हे मागील तीन वर्षांपासून परतीच्या पावसावर ओव्हरफ्लो वरच भरत आहे. तर यंदा ही पावसाच्या चार महिन्याचा कालावधी उलटून गेल्यावर परतीच्या पावसाने १५ ऑक्टोबरनंतर धरण हे १०० टक्के भरले होते. त्यानंतर पाण्याची आवक राहिल्याने पुढील काही दिवस दोन – चार दरवाजे उघडून पाण्याचा नदी पात्रात विसर्ग केला होता. धरण भरल्याने दोन वर्षांची पाणी टंचाईची चिंता मिटली होती. तर सिंचनासाठी लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
दरवर्षी होते ६ दलघमी बाष्पीभवन!


एप्रिल महिन्यात वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले असून उन्हाळ्याच्या दिवसात दरवर्षी धरणातील ६ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ०.८ दलघमी इतका उपसा होत असून ०.२ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने दररोज धरणातील पाणी साठ्यात १ दलघमी इतकी घट होत आहे. तर एप्रिल महिन्याच्या १७ दिवसात धरणातील १६.६२७ इतके पाणी कमी झाले आहे. धरणातून लातूर शहर व एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह ६१ गावांच्या पाणी पुरवठा योजनेद्वारे दर महिन्याला२ दलघमी इतका पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या या पाणीपुरवठा योजना सुरळीत असल्याने टंचाईची चिंता मिटली आहे.
धरणातील पाणी साठा विचारात घेऊन सिंचनासाठी उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात येऊन कालव्यात टप्प्या-टप्प्याने ३ आवर्तन ( रोटेशन) नुसार ३० मे महिन्यापर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पहिले आवर्तन हे मार्च महिन्यात झाले असून डाव्या व उजव्या कालव्यातून प्रत्येकी ६ व ६.५ दलघमी इतके पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर दुसरे आवर्तन ११ एप्रिल पासून सुरू असून ३० एप्रिल पर्यंत डाव्या व उजव्या कालव्यातून ९ दलघमी इतके पाणी सोडण्यात येणार आहे. त्यांनतर १० दिवसांच्या विश्रांतीनंतर ११ मे ते ३० मे दरम्यान डाव्या व उजव्या कालव्यातून ९ दलघमी इतके पाणी सोडले जाणार आहे. तर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या पाण्यामुळे प्रत्येकी ३ हजार हेक्टर तर बंधाऱ्यांमुळे २ हजार हेक्टर असे एकूण ८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्यामुळे मांजरा पट्टा हा ‘इव्हरी ग्रीन’ झाला आहे.
धरणात वर्षभर पुरेल एवढाच पाणीसाठा!


मांजरा धरणात सध्या १३७.५७४ दलघमी इतका पाणी साठा आहे. सध्या धरणातील पाण्याचा पाणी पुरवठा योजनांसह सिंचनासाठी वापर सुरू आहे. उष्णतेमुळे बाष्पीभवन होत आहे. मात्र पाणी पुरवठा योजनांद्वारे वर्षाला ६० दलघमी पर्यंत पाणी दिले जाते. त्यामुळे आणखी वर्षभर पुरेल इतका पाणीपाणी दिले जाते. त्यामुळे आणखी वर्षभर पुरेल इतका पाणी
साठा धरणात उपलब्ध आहे.
सुरज निकम, शाखाधिकारी, मांजरा धरण.