Uncategorized

मराठवाड्यातील पीक नुकसान भरपाई साठी आले ११०६ कोटी; पण… बीड औरंगाबाद जिल्हा वगळुन !

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत सलग चौथ्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगामा गेला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख 81 हजार 761.18 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी होत होती. दरम्यान सरकराने राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. आता मराठवाडा विभागासाठी 1106 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. तर उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे.
मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातुर आणि उस्मानाबाद या सहा जिल्ह्यांसाठीच ही मदत मिळणार असून यातील सर्वाधिक ७१७ कोटी ८८ लाख ९२ हजार मदत नांदेड जिल्ह्याला मिळणार आहे. त्या खालोखाल हिंगोली जिल्ह्याचा क्रमांक असून १५७ कोटी ४ लाख ५२ हजार रुपये तर उस्मानाबाद जिल्ह्याला ९० कोटी ७४ लाख ३६ हजार, लातुर जिल्ह्याला ३७ कोटी ३० लाख ८३ हजार रुपये, जालना जिल्ह्यासाठी ३ कोटी ७१ लाख ८४ हजार रुपये तर सर्वात कमी मदत परभणी जिल्ह्यासाठी १ कोटी ६० लाख ३४ हजार रुपये मिळाली आहे.
मराठवाड्यातील जालना,परभणी, हिंगोली,नांदेड, लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र याचवेळी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्याला नुकसान भरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.


विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील अनेक गावांतील पिकांना यावर्षी शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे खुप मोठे नुकसान सहन करावे लागले होते. याशिवाय पावसाने वेळेवर साथ न दिल्यामुळे डोंगराळ भागातील अनेक पिके वाळून गेले होते. तर औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असतानाही औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


प्रशासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळालेल्या जिल्ह्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादी नुसार जालना जिल्ह्यातील ६९९८ बाधीत शेतकऱ्यांच्या २३११.७९ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले असून यासाठी ३ कोटी ७१ लाख ८४ हजार रुपयांचे, परभणी जिल्ह्यातील १५५७ बाधीत शेतकऱ्यांच्या ११७८ हेक्टर शेतजमीन चे नुकसान झाले असून यासाठी १ कोटी ६० लाख ३४ हजार रुपये, हिंगोली जिल्ह्यातील १३३९७० बाधीत शेतकऱ्यांच्या ११३६२० हेक्टर शेतजमीन चे नुकसान झाले असून यासाठी १५७ कोटी ४ लाख ५२ हजार, नांदेड जिल्ह्यातील १७१९४६ बाधीत शेतकऱ्यांच्या ५२७४९१ हेक्टर शेतजमीन चे नुकसान झाले असून या साठी ७१७ कोटी ८८ लाख ९२ हजार रुपये, लातुर जिल्ह्यातील ४९१६० बाधीत शेतकऱ्यांच्या २७४२५.३७ हेक्टर शेतजमीन साठी ३७ कोटी ३० लाख ८३ हजार रुपये तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ७५७३९ बाधीत शेतकऱ्यांच्या ६६७२३.२० हेक्टर शेतजमीन साठी ९० कोटी ७४ लाख ३६ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker