Uncategorized
पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या काळवीट साठवण तलावात पोहण्यासाठी बंदी घाला


मुख्याधिकारी साहेब, मानवीमुत्र मिश्रीत पाणी शहरवासीयांना किती दिवस पाजणार?
अंबाजोगाई शहरातील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या काळवीट साठवण तलावात पोहण्यासाठी जाणाऱ्या शौकिनांवर बंदी घालण्याची मागणी माध्यम न्यूज नेटवर्क च्या वतीने करण्यात आली असून मानवी मुत्र मिश्रीत पाणी शहरवासीयांना किती दिवस पाजणार असा संतप्त सवाल मुख्याधिकारी यांना विचारला आहे. या प्रकरणी आ. नमिता मुंदडा यांनी लक्ष घालून पिण्यासाठी आरक्षित असलेल्या तलावात पोहण्यासाठी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
अंबाजोगाई शहरातील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी काळवीट साठवण तलावातील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या साठवण तलावातील पाणी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा योजनेव्दारे पुरवण्यात येते. यासाठी काळवीट साठवण तलावावर नगर परिषदेची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदरील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी या तलावातील पाणी पुरवठा योजनेत चोवीस तास तीन कर्मचारी तैनात असतात.
या साठवण तलावात गेली अनेक वर्षांपासून अंबाजोगाई शहरातील शेकडो नागरिक दररोज सकाळी पोहण्यासाठी जातात. सदरील साठवण तलावात पोहण्यासाठी जाणाऱ्या शौकिनांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी शहरवासीयांच्या वतीने यापुर्वी अनेकवेळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा शहरवासीयांचा आक्षेप आहे.
या तलावात पोहण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरणारा प्रत्येक माणूस हा तलावात पोहताना आपले मुत्र तलावातील पाण्यात सोडतो, त्याशिवाय त्यांच्या शरीरावरील घाण ही या काळवीट साठवण तलावातील पाण्यात मिसळली जाते. त्यामुळे शहरवासीयांना गेली अनेक दिवसांपासून मानवी मुत्र मिश्रीत व शरीरावरील घाण मिश्रीत पाणी पिण्याची वेळ आली आहे.


वैद्यक शास्त्र काय सांगते ?
तलावात पोहताना व आंघोळ करताना माणूस मुत्र जास्त प्रमाणात का सोडतो याला शास्त्रीय कारण आहे. साधारणपणे प्रत्येक मनुष्य आंघोळ करताना किंवा पोहण्यासाठी पाण्यात उतरलेला असतांना तो मुत्र जास्त प्रमाणात सोडतो. यामागील शास्त्रीय कारण आपण समजावून घेतले पाहिजे. या संदर्भात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून या संबंधीची माहिती जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, आंघोळ करताना अथवा पोहण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरल्यानंतर आपल्या शरीरात पोटाच्या खालच्या बाजूला मुत्राशयाची पिशवी असते, या पिशवीवर शरीराबाहेरील पाणी पडताच ही मुत्राशयाची पिशवी आकुंचन पावते, त्यामुळे मनुष्य आंघोळ करताना अथवा पोहताना आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात आपले मुत्र बाहेर सोडतो.
दररोज शेकडो लिटर मानवी मुत्र मिसळले जाते तलावातील पाण्यात!


वैद्यक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या या साठवण तलावात जर दररोज शेकडो माणसं पोहण्यासाठी जात असतील तर शेकडो लिटर मानवी मुत्र या तलावात सोडले जाते, याशिवाय त्यांच्या शरीरावरील घाण पाण्यात मिसळली जाते ते वेगळच! हे मानवी मुत्र मिश्रीत व शरीरातील घाण मिश्रीत पाणी शहरातील लोकांना पिण्याचे पाणी म्हणून नगर परिषद वितरीत करते हे साधे सरळ गणित आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या या साठवण तलावात पोहण्यासाठी नागरीकांना त्वरीत बंदी घालावी अशी मागणी माध्यम न्यूज नेटवर्क च्यावतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना करण्यात आली आहे.
मानवीमुत्र मिश्रीत पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक?
मानवी मुत्र मिश्रीत पाणी पिणे हे शहरवासीयांच्या आरोग्यासाठी चांगले आहे का? असा प्रश्न प्रख्यात आयुर्वेद चिकित्सा तज्ञांना विचारला असता त्यांनी सांगितले की, आयुर्वेदात स्वमुत्र पिणे हे मानवासाठी चांगले आहे असे सांगितले आहे, मात्र इतरांचे मुत्र मिश्रीत पाणी पीणे हे आरोग्यासाठी निश्तच हानीकारक आहे. असे इतर मानवमुत्र मिश्रीत पाणी पिण्यात आल्यानंतर आरोग्यासाठी ते निश्चितच हानीकारक ठरु शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्पॉट इन्स्पेक्शन करुन नोटीसा बजावा
शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या काळवीट साठवण तलावात पोहण्यासाठी जाणाऱ्या लोकांचे प्रमाण फार मोठे आहे. हे रोखण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची एक स्वतंत्र टीम नियुक्त करुन भल्या पहाटे अचानक स्पॉट इन्स्पेक्शन करुन या तलावात पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना यापुढे तलावात पोहण्यासाठी न येण्याचे बंधन घालणारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा आशयाच्या वैयक्तिक नोटीसा बजावा अशी मागणी ही माध्यम न्यूज नेटवर्क च्या वतीने करण्यात करण्यात आली आहे.

