महाराष्ट्र

अखेर मांजरा धरणाने मृत साठ्याची पाणी पातळी गाठली!

आजपासून सुरू होणार शेकडो गावांना मृत साठ्यातुन पाणी पुरवठा


अंबाजोगाई शहरासह बीड-लातुर- उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या “मांजरा” धरणातील पाणी साठ्याने आता मृत साठ्याची पाणी पातळी ओलांडली आहे. २२४.०९३ दलघमी साठवण क्षमता असलेल्या या धरणात आजच्या तारखेला फक्त ४७.१३० दलघमी. एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. या धरणाच्या घशाला आता कोरड निर्माण होवू पहात आहे. त्यामुळे या धरणावर पाणी पुरवठा अवलंबुन असलेल्या गावांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

१९७१ साली तत्कालीन मुख्यमंत्री श्री. शंकरराव चव्हाण यांनी दिली होती मंजुरी


बीड-लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कांही गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी १९७१ साली मंजुर करण्यात आलेले मांजर धरण दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मृत साड्यांच्या खाली गेले आहे. जागतिक ग्लोबल वॉर्मिंग नंतर या विभागातील गेली अनेक वर्षांचा पावसाचा अभ्यास असा सांगतो की मृग नक्षत्रात जरी ७ जून रोजी सुरुवात होत असली तरी मोठ्या पावसास जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच सुरुवात होते. याचाच दुसरा अर्थ असा की मांजरा धरण शुन्य पातळीच्या वर येण्यास किमान ऑगस्ट महिन्याची तरी वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत या सर्व गावांना शुन्य पातळी खालील गाळ मिश्रीत पाणी पिण्यासाठी वापरावे लागणार आहे.

भूजल पातळी ही गेली खाली!


मांजरा धरणातील पाणी पातळीवर सातत्याने नजर ठेवून असणारे मांजरा धरणाचे शाखा अभियंता सुरज निकम यांनी मांजरा धरण शुन्य पातळीच्या खाली गेल्याची अधिकृत माहिती दिली आहे. सध्या बीड लातुर आणि उस्मानाबाद या तीन ही जिल्ह्यात उन्हाची प्रचंड तीव्रता जाणवत आहे. स्वाभाविकच उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या विभागातील पाणी पातळीवरही मोठा परिणाम जाणवतो आहे. या विभागातील लहान मोठ्या तलावातील पाणीसाठा संपलेलाच आहे शिवाय पारंपारिक विहीरी, बोअरवेल ची पाणी पातळी ही खुप खोल गेली आहे. अनेक विहिरी व बोअरवेल कोरडे पडत चालल्याची माहिती दररोज नव्याने समोर येत आहे.
अशा सर्व परिस्थितीत बीड लातुर उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेकडो गावात साधारणतः हीच परिस्थिती आहे. त्यामुळे या गावातील भाकड जनावरे, माणसांसाठी लागणारे पाणी पुरवण्याची जबाबदारी मांजरा धरणावर व संबंधित यंत्रणांवर येवून ठेपली आहे.

बाष्पीभवनाचा ही होणार मोठा परिणाम!


मांजरा धरणात आज अधिकृत माहिती नुसार ६४२.३७ मीटर पाणी पातळी आता ६३५.७२ मीटरवर येवून पोहोचली आहे. तर २२४.०९३ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात आता फक्त ४७.१३० दलघमी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा धरणाची शून्य पाणी पातळी ४७.१३० असून आज दिनांक २५ मे २०२४ रोजी मांजरा धरणाने ही शुन्य पाणीपातळी गाठली आहे.

उन्हाच्या तीव्रतेमुळे मांजरा धरणातील पाण्याचे बाष्पीभवनाव्दारे पाणी कमी होण्याचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. एरवी धरणातील पाण्याचे बाष्पीभवनाचे प्रमाण ०.१११ एमक्युम असते तर आता हे प्रमाण ८.४० एम एम पर्यंत जाऊन पोहोचले आहे. या वाढत्या पाणी बाष्पीभवनाचा परिणाम ही पाणीसाठा कमी होण्यावर होणार आहे.

१२ गावांचे करावे लागले होते स्थलांतर!


मराठवाड्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील सिंचनाचा आणि पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सोडवण्यासाठी १९७१ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्हायाच्या सीमा रेषेवरील मांजरा धरणाच्या मंजुरीस मान्यता दिली. या धरणाच्या निर्मिती मुळे बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील ७३ गावांचा या धरणाच्या लाभक्षेत्रात समावेश झाला तर १२ गावांचे स्थलांतर या धरणाच्या निर्मिती पुर्वी करावे लागले होते.

धरणामुळे झाला अनेक गावांचा कायापालट!


१९७१ साली मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास ६१६०.४० लक्ष रूपये खर्च करुन या धरणाची निर्मिती करण्यात आली. १९७१ साली या धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात आल्या नंतर १९७८-७९ साली या धरणाची कंदरभरणी करण्यात आली तर १९८१ साली या धरणाचे काम पुर्ण करण्यात आले. मांजरा धरणाच्या निर्मिती नंतर जवळपास ३० वर्षाच्या कालावधीत या धरणक्षेत्रात येणा-या अनेक गावांचा कायापालट झाला. या धरणामुळे अनेक ओसाड गावे भरघोस उत्पादन देणाऱ्या पीकांचे गाव (ग्रीन बेल्ट) म्हणून ओळखल्या जावू लागली होती.
२०११ पर्यंत या धरणात सतत मुबलक पाणी पुरवठा राहिला. मात्र २०११ नंतर या विभागात सतत अल्प प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे या विभागावर पाण्याचे संकट ओढवण्यास सुरुवात झाली. २०११ साली या विभागात जास्त पावूस झाल्यामुळे या धरणाचे चार दरवाजे उघडावे लागले होते, त्यानंतर मात्र या भागात पावूसच झाला नाही. २०११ साली व त्यानंतर झालेल्या अल्प पावसात बीड, लातुर उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात अनेक गावांची तहान या वर्षीच्या मार्च अखेर पर्यंत मांजरा धरणाने भागवली. २०११ नंतर साधारणपणे प्रत्येक पाच वर्षात फक्त एकदा मांजरा भरण्याईतपत पावूस या धरण क्षेत्रात होवू लागला.

२०१६साली धरणात नव्हता पाण्याचा एकही थेंब!


आठ वर्षांपूर्वी २०१६ साली जुलै महिना संपत आला २२४.०९३ दलघमी. पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात पाण्याचा एक टिपूस ही नव्हता. १९८१ साली या धरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर प्रथमच आठ वर्षापुर्वी हे धरण कोरडेठक्क पडले होते. त्यावर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या धरणक्षेत्रात एक आठवडा तुफान पावूस झाला आणि धरण ओसांडून लागले होते.
आजही या विभागात वेगळी परिस्थिती नाही. आज धरणातील पाण्याने शुन्य पातळी गाठली असतांना २०१६ च्या धरणाच्या स्थितीची आठवण येणे स्वाभाविक आहे.
मागील वर्षी मोठा पावूस नसल्यामुळे यावर्षी मांजराने पुन्हा आपला तळ उघडा करण्यास सुरुवात केली आहे. आणि मांजरा धरणाच्या घशाला आता कोरड पडण्यास सुरुवात झाली आहे.

ड्राय झोन ची भिती कायम?


राज्यातील कमी पाऊस पडणाऱ्या व पाणी पातळी कमी असणारा २ लाख ५० हजार चौमी किमी क्षेत्राला वाळवंटी होण्याचा धोका राज्यातील अनेक अभ्यासकांनी यापुर्वी नोंदवलेला आहे. या संदर्भात नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात आणि पाहाणी अहवालाने ही राज्यातील २ लाख ५० हजार चौकिमी क्षेत्राची वाळवंटीकरणाची वाटचाल करीत आहे असे म्हटले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील बीड लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची गेली अनेक वर्षांपासून सतत चर्चा होत असते. तरीही राज्य शासनाने गेली ५० वर्षात या तीन जिल्ह्यांचा भूजल स्तर वाढविण्यासाठी विशेष तर सोडाच पण सीधे-साधे प्रयत्न केल्याचेही ऐकिवात नाही वा प्रत्यक्षात दिसून येत नाही. ही बाब अतिशय संतापजनक आहे.

ही सर्व परिस्थिती पुढील काळात पिण्याच्या पाण्याचे काय होईल याची भिंती निर्माण करणारी, या विभागातील नागरिकांची झोप उडवणारी आहे. हे मात्र निश्चित!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker