भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतांना…! @ श्रावण गिरी
While celebrating the Amrit Mahotsav of Indian Independence...!


भारतीय स्वातंत्र्य लढयातील सैनिक,हुतात्मे,महात्मे,साहित्यिक,विचारवंतआणि समाजसेवक;या सर्वांनी देशनिष्ठा जागवत ,प्रसंगी प्राण्यांच्या आहुती देत स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात स्वतःला झोकून दिले.बाराशे वर्षे किंबहुना त्याहून अधिक काळ मुघलांनी,सुमारे दिडशे वर्षे ब्रिटिशानी,काही काळ डच,पोर्तुगीज आदी विविध राजसत्तांनी भारतावर राज्य करीत पारतंत्र्याच्या गुलामीत लोटून अन्याय, अत्याचार केले. स्वातंत्र्याचे हे समर सुरु झाले १८५७ साली.राणी लक्ष्मीबाईंचे दत्तक विधान नामंजूर करुन झाशी संस्थान ब्रिटीश राज्यात विलीन करण्यात आले. लॉर्ड डलहौशी यांनी तसा फतवाच काढला.मेरी झांशी नही दूंगी,या शब्दात राणी लक्ष्मीबाई यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला. तात्या टोपे,नानासाहेब पेशवे बहादूर शहा,अवधचा नवाब आदींसोबत विचार विनिमय करून राणी लक्ष्मीबाईंनी बंड केले.
पुढील काळात आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके,भगतसिंग राजगुरू ,सुखदेव,चाफेकर बंधु,लाला लचपतराय,बाळ गंगाधर टिळक ,स्वातंत्र्यवीर सावरकर आदींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्यक्ष १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला असला तरी हुतात्म्यांच्या त्यागाची ,बलिदानाची खूप मोठी परंपरा त्यामागे आहे.१९४२ च्या चले जाव घोषणेने ही चळवळ पुन्हा पेटली.गोवालिया टैंक मैदानावरील ‘करेंगे या मरेंगे’ घोषणेतून गांधीजींनी प्रत्येकाला नेता बनण्याचे आवाहन केले.परिणामी भल्या पहाटे बिर्ला हाऊसमधून गांधीजींसह कस्तुरबा, महादेव देसाई, मिराबेन यांना ताब्यात घेण्यात आले.
महात्मा गांधी आणि त्यांच्यावरील दृढविश्वासाने साहेबांच्या गाडीसमोर आडवे होऊन प्राण त्यागणारे हुतात्मा बाबु गेणू ही मंडळी राजकीय स्वातंत्र्यासाठी लढली.एकीकडे हा मुक्तीचा लढा सुरु असतानाच राजाराम मोहन रॉय, म.जोतिबा फुले ,न्या.महादेव गोविंद रानडे, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी सामाजिक समतेसाठी केलेले कार्यही अत्यंत प्रेरक आहे. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही कारगील युध्द असो वा संसद भवनावर आणि इतर बॉंबस्फोट प्रकरणात आणि देशाचे संरक्षण करताना तैनात असलेला शूर राष्ट्रभक्तांना मी अभिवादन करतो.
महापुरुषांची गाऊ गाथा ,
आदराने टेकऊ माथा
सैनिक आम्ही या देशाचे
एकसंघ भारताचे
याचे भान ठेऊन आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना हुतात्म्यांच्या स्मृती जागवायच्या आहेत. पुढच्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळतील,हे निर्विवाद आहे. या नेत्यांनी भारतीय माणसांची गरिबी, लाचारी,अन्यायी जीवन आणि दमकोंडी पाहिली होती.आपला स्वाभिमान जपत स्वातंत्र्याचा श्वास घेण्यासाठी या विचारवंतांनी अहोरात्र कार्य केले.
महात्मा गांधीसारख्या निधड्या छातीच्या युगपुरुषाने विनाशस्त्र बंदुकधारी राजसत्तेला नमवले. त्यावेळी कॉंग्रेस अधिवेशनातील जवळपास सर्वच नेत्यांना अटक झाली.महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव भाई देसाई आणि मिराबेन यांना गुप्त ठिकाणी हलवले तरी ते जनतेला कळले.गाधीजींना आगाखान पैलेसमध्ये,नेहरूं,पटेल,आझाद यांना अहमदनगर येथे पाठवण्यात आले.त्यामुळे जनता भडकली.जाळपोळ,लाठीचार्ज, अश्रुधूरांनी वातावरण धुमसत-पेटत होते.ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जनआंदोलन चांगलेच पेट घेत होते.शंकर दयाळ मिश्रा यांनी मोडेल पण वाकणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली.
ब्रिटिशांनी मिश्रांना अटक केली.काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. हा सर्व इतिहास स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना डोळ्यापुढून सरकता सरकत नाही.व्यर्थ न हो बलिदान श्रीमंतीचं प्रदर्शन एकीकडे तर दुसरीकडे राहायला घर नाही. गगनचुंबी इमारतीच्या बाजूला झोपडपट्टीही दिसते. कोणी उपासपोटी तर कोणी अवकाशात स्पेस शोधतो आहे.कित्येकांच्या अन्न, वस्त्र, निवारा ;या मुलभूत गरजा पूर्ण होत नाहीत.तर कोणी संपत्तीचा हिशोब लपविण्याचा आटापिटा करतो.सर्वत्र ही भयावह विषमता पहायला मिळते.प्रत्येक जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने प्रतिनिधित्व करीत मत-मतांतरे मांडत आपला दबाव गट निर्माण करणारी मंडळी सर्वत्र दिसते.स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही मूलभूत प्रश्न मिटले नाहीत. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी यह आझादी झूठी है,देश की जनता भूखी है म्हणत मोर्चा काढला.
मूल्य व्यवस्थेसमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत.१९४७च्या फाळणीची वेदना आपण पाहिली. भारत,पाकिस्तान, बांग्लादेश आदी राष्ट्रांना तुटून स्वतंत्र होताना पाहिले.यासंबंधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रार्थना “या भारतात नित्य बंधुभाव वसू दे,दे वरची असा दे “,अत्यंत मोलाची ठरते.भारत हा कोणत्याही भेदाविना अर्थात कोणत्याही धर्म जाती प्रांतांच्या समान अधिकाराचा स्वीकार करणारा देश आहे. सौहार्द जपणारा शांतताप्रिय असा हा देश आहे. परंतू वाढत्या स्वार्थी वृत्तीमुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा देश हुकूमशहाच्या स्वाधीन होऊन, गुलामगिरीच्या गर्तेत जातो की काय,असे भयानक चित्र पहायला मिळते.न्यायव्यवस्था आणि तत्सम यंत्रणांचा गैरवापर होऊन चोर सोडून संन्यासी फासावर जाण्याची भीती निर्माण होत आहे.
असे असले तरी समृध्दीचाही यशस्वी टप्पा आपण गाठला,हे कसे नाकारता येईल?विकासाच्या बाबतीत परावलंबी असलेला हा देश आज स्वतंत्र उपग्रहाची निर्मिती करतो .अन्नधान्य निर्यात करतो . आर्थिक आणि शारीरिक प्रगती बरोबरच आपलं आयुर्मान दुपटीपेक्षा अधिक वाढले आहे. साक्षरतेचा दर 12% वरून 74% पर्यंत पोहोचला . यशसिध्दीकडे जाताना समाजातील जातीय तेढ आणि विषमता पिच्छा सोडत नाही.आजही बेरोजगारीचा भयावह प्रश्न आहे .पदव्युत्तर शिक्षण घेऊनही तरुणांच्या हाताला काम मिळत नसेल तर ती शक्ती जयहो करीत कोणाच्याही मागे जाऊन विध्वंसक मार्गाकडे वळताना पाहायला मिळते.
खरं तर शिक्षणातून तयार होणा-या अशा मणुष्यबळाचा भौतिक प्रगतीच्या कामी कसा हातभार लावता येईल हेही पाहणे गरजेचे आहे. उत्तम उदारीकरणाचा वेग झपाट्याने वाढत जाऊन अब्जावधी डॉलरहून अधिक उलाढाल असलेल्या कंपन्या भारतात आल्या .आर्थिक उन्नतीचा टप्पा पूर्ण केला जात असतानाच सीमेभोवती पाकिस्तान ,चीन किंवा तत्सम शक्तींना आवर घालण्यासाठी तैनात व्हावे लागते .हे सर्व पाहताअगदी युक्रेंनचे उदाहरण डोळयासमोर ठेऊन लढण्यासाठी आपल्यालाच सज्ज व्हावे लागेल .बंधुभाव जपणूक करण्यासाठी आजही प्रबोधनाची आवश्यकता आहे. धर्म ,जात, वंश, परंपरेतून मतांच्या राजकारणाची स्वतंत्र सांस्कृतिक वर्चस्ववादाची निर्मिती होत आहे. तथापि सक्षमपणे अर्थकारण ते आरोग्यापर्यंत बदलाची आणि सर्व भेदाच्या पलीकडे जाऊन मूल्याधिष्ठित समाज रचना तयार करण्याची अजूनही नितांत गरज आहे .तरच सुजलाम सुफलाम अशा वैभव संपन्न भारताचं अमृत महोत्सवी स्वातंत्र्य काळात बलस्थान कायम राहील,असे मला वाटते.


श्रावण गिरी हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतुन पुढे आलेले साहित्यिक आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके आणि कविता संग्रह प्रकाशित आहेत. गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य चालू आहे. एक संवेदनशील कवी आणि साहित्यिक आणि उत्कृष्ठ वक्ता, सुत्रसंचालक म्हणून ते सर्व परीचित आहेत.