प्रबोधन

मंडल आयोग समजून घेण्यास आपण कमी पडलो…!

डॉ. शिवाजी हुसे

या देशात ५२% ओबीसी समाजाचे लोक राहतात. विविध जातीमध्ये विभागलेला हा समाज आजही उपेक्षिततेचे जीणे जगतो असून विकास व परिवर्तनाच्या प्रक्रियेपासून आजही कोसो दूर आहे. प्रचंड दारिद्रय, शिक्षणाचा व नोकरीचा अभाव, अन्याय, अत्याचार व सामाजिक विषमतेचा बळी कायम हा समाज ठरला आहे. काही मूठभर लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले असले तरी अजूनही पाहिजे तसे नेतृत्व छोट्या समाजातून निर्माण झाले नाही. होऊ दिले गेले नाही. सत्तेच्या भागिदारीत कायम या समाजाचा केवळ वापर करून घेतला गेला मात्र सत्तापदे व लाभाची पदे देतांना त्यांना बाजूला सारले गेले. अनेकांच्या अंगावर गुलाल टाकून त्याला महत्वाच्या सत्तेच्या पदापर्यंत पोहोचविण्यासाठी सिडी म्हणून त्यांचा वापर केला जातो मात्र त्याला या सर्व प्रक्रियेपासून दूर ठेवले जाते.

 काही मूठभर लोकांना पदे, सत्ता देऊन त्यांना कायम गुलाम केले. तेही आपल्या मालकाची गुलामी करण्यात धन्यता मानत आहेत. ओबीसी समाज विशेषतः मायक्रो ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी समाज पिढ्यान पिढ्या या व्यवस्थेच्या शोषणाचे बळी ठरत आहेत. ओबीसी जर संघटित झाला जागा झाला तर या व्यवस्थेत वाटेकरी होऊन भागीदार होईल. त्याच्या हक्काचे त्यांना द्यावे लागेल म्हणून जातनिहाय जनगणना न करता त्यांना खोटी आशासने देऊन सर्वच राजकीय पक्ष त्यांना ग्रहित धरीत आहेत. ७ ऑगस्ट १९९० रोजी या देशात व्ही. पी. सिंह यांनी आपण पंतप्रधान असतांना मंडल आयोगाच्या दोन तिन शिफारसी लागू झाल्या. त्यामुळे ओबीसींना शिक्षण व नोकरीत आरक्षण व संधी मिळाली. मंडल आयोगाच्या या धोरणामुळे देशाचे सामाजिक, राजकीय जीवन ढवळून निघाले. प्रचंड विरोध पत्करावा लागला. ओबीसी मंडलकडे ओढण्या ऐवजी कमंडलमध्ये अडकला गेला. मंडल आपल्यासाठी आहे. हे तो विसरल रामराज्य व राम मंदिर उभारणीच्या लढाईत तो नादी लागला पर्यायाने आपला समाज, आपले वर्तमान जीवन व प्रश्न तो विसरला. आपले शत्रु व मित्र कोण? हे पारखन घेण्यास तो

कमी पडला. जाणिवपूर्वक ढोंग व सोंग घेऊन तो खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागला. आपले महामानव, प्रेरणास्थाने, आदर्श यांचा विसर त्यांना पडला. धार्मिक सण, उत्सव, संघटना यामध्ये जीव ओतून काम करू लागला. छोट्या मोठ्या पदात गुरफटला त्यामुळे ओबीसी समाजाचे प्रचंड नुकसान झाले. ही व्यवस्था त्याला समजून घेता यावीच नाही. त्याचे नेतृत्व निर्माण होऊन प्रस्थापित होण्यास संधी मिळू नये ही परिस्थिती निर्माण केली जाते. शिक्षण, साहित्य, राजकारण, समाजकारण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात ते कसे दूर राहतील यासाठी त्यांना जागृत होऊ दिले जात नाही. तो संघटित होऊ लागला की त्यांच्यात फूट पाडून प्रती स्पर्धी लोक स्व घटकातून व पक्षातून निर्माण केले जातात. ओबीसी समाज हा केवळ आपली व्होट बँक कशी राहील. 

लढायला, संघर्ष करायला तोच सर्वात पुढे असतो. अजूनही प्रबोधनाच्या चळवळी फारशा रुजल्या नाही. छत्रपती शिवराय, ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राजीनामा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आदी महापुरुषांचे विचार व कार्य समजून घेण्याची ओबीसींना गरज वाटली नाही. मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल, पंतप्रधान व्ही.पी. सिंह या महामानवाचा विसर त्यांना पडून त्यांनी आपल्यासाठी कशी किंमत मोजली याची आजही त्यांना जाणिव नाही. मंडलच्या लढाईत ज्यांनी साथसंगत दिली. बळ दिले त्यानांही ओबीसी पार विसरले. अस्तित्वाची व अस्मितेची लढाई लढण्यास ओबीसी कमी पडले. सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत सामील न होता जाती धर्माच्या लढाया लढण्यात त्यांचे नेतृत्व करण्यात त्यांचा सहभाग त्यांना सुखावतो. बुद्धिजीवी व शिकलेला, नोकरी करणारा ओबीसी आपली ओळख लपवतो. ओबीसी म्हणून त्यांना कमीपणा वाटतो. विद्यार्थी, युवक, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकिल आदी मंडळी सामाजिक प्रबोधन व विकासाची चळवळ करण्यास पुढे येत नाही. 

ऊलट प्रस्थापितांची हुजरेगिरी करण्यात त्याला धन्यता वाटते. आज ओबीसी समाजासमोर अगणित प्रश्न आहेत. अडचणी आहेत. एकेकाळी कुशल कारागिर व कलावंत असलेला हा समाज आज वेठबिगार म्हणून राब राब राबतो आहे. ओबीसीतील प्रस्थापित घटकांनीछोट्या ओबीसी घटकांना समजून घेतले नाही. त्यांना जवळ करून पाठबळ दिले नाही. त्यामुळे त्यांना सतेत भागिदार होता आले नाही. छोट्या छोट्या समाजातून, बलुतेदार, अलुतेदार, बहुजन समाजातून नवे नेतृत्व निर्माण होणे गरजेचे आहे. आरक्षणाच्या नावाखाली या बहुजन समाजाला तोडण्याचे काम केले जात आहे. एकमेकांचे पिढ्यानपिढ्याचे बांधव आज एकमेका समोर शत्रू म्हणून ऊभे राहताहेत ही निती समजून घेणे गरजेचे आहे. त्यातून नुकसानच जास्त होण्याची शक्यता आहे. आज एकूणच राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रचंड अनागोंदी आहे. संभ्रम आहे.

कोण आपला कोण परका ? सांगणे अवघड झालें आहे. ओबीसीच्या मतावर राजकारण करायचे सत्ता मिळवायची मात्र सत्ता येताच त्यांना दूर करून प्रक्षांतर केलेल्या प्रस्थापितांना सत्तापदे द्यायची हे चित्र सर्वच पक्षात आहे. केवळ राजकारण व देवा धर्माच्या नादी न लागता ओबीसी समाजाला आपला मार्ग शोधावा लागेल. माणूसकीची, न्याय हक्काची लढाई लढावी लागेल. बहुजन महामानव समजून घ्यावे लागतील. तरच ओबीसांना भवितव्य आहे. आज काही प्रमाणात ओबीसी लिहू, बोलू लागला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात वावरू लागला म त्यांना जाणिव पूर्वक संधी दिली जात नाही. मान सन्मान दिले. जात नाही. दुय्यम संधी दिल्या जातात. हे चालतच राहील. परंतु आता ओबीसींनी इतरावर विसंबून न रहाता आपल्या संस्था, संघटना, पक्ष निर्माण कराव्या लागतील. सामाजिक न्याय हक्कासाठी लढा उभा करावा लागेल. वसतिगृहे, शिष्यवृत्ती यासाठी संघटित व्हावे लागेल. जनगणना व आरक्षण टिकविण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल. या व्यवस्थेत कोणीच तुमची बाजू घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, त्याचप्रमाणे, बी.पी. मंडल, व्ही. पी. सिंह, आदी महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. नवे बदल, नवा विचार व तंत्रज्ञान स्विकारून परिवर्तन व विकासाच्या वाटेवर सज्ज व्हावे लागेल. 

मंडल आयोग व आयोगाच्या शिफारसी समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी लढा पकारावा लागेल. सत्ताधारी समाहोण्यासाठी पराक्रमाची पराकास्टा करावी लागेल. कुणाचाही व्देष न करता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन त्यांच्याही प्रश्नासाठी संघर्ष करावा लागेल. स्पर्धा परिक्षा केंद्र, अभ्यासिका, वाचनालये, प्रबोधनाच्या चळवळी, व्याख्यानमाला, मिडिया, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, चित्रपट, संगीत अशी सर्वच क्षेत्रे पादाक्रांत करावी लागतील. शेती मालाला रास्त भाव मिळावा यासाठी संघर्षात उडी घ्यावी लागेल. शेतीला चांगले दिवस आल्याशिवाय बहुजन समाजाची प्रगती नाही. यासाठी सर्वांनीच पुढे येणे गरजेचे आहे. ओबीसींनो झोपेतून बाहेर आल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. मंडलचे विचार गावोगावी पोहचून अन्य शिफारशी लागू करण्यासाठी सर्वच पातळ्यावर ताकदीने उतरावे लागेल. मंडलची लढाई अजून संपली नाही. खेदाने म्हणावेसे वाटते की मंडलला समजून घेण्यास आपण सारेच कमी पडलो आहे. आता तरी जागे व्हा ! अन्यथा तुमचे अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. ७ ऑगस्ट हा मंडल दिन आहे. मंडल दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून गावोगावी साजरा व्हावा. हा आपला मुक्तिदिन आहे. मंडल दिनाच्या पार्श्वभूमिवर परिवर्तनाच्या लढाईचे सैनिक व्हा! मंडल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

 

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker