पावसाने दडी मारल्याने पीके संकटात तातडीने पंचनामे करा;
आ. मुंदडा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/namita-mundada-1.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/namita-mundada-1.png)
पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली; उत्पादनात निम्म्याने घट होण्याची शक्यता
उत्पादनात निम्म्याने घट होण्याची शक्यता
बीड जिल्ह्यात सुरवातील चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, पिके मोठ्या प्रमाणात घेतली व पिकेही जोमात आली होती. परंतु मागील २० ते २५ दिवसापासून पावसाचा खंड पडला असल्यामुळे सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या सुरवातील अत्यंत कमी प्रमाणत पाऊस पडला असून काही भागत तर पाऊस पडलाच नाही त्यामुळे सोयाबीन, मुग, उडीद, कापूस पिकांचे पाने गळती होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. डोंगरी व हलक्या जमिनीतील पिके करपू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
एकंदरीत पिकांच्या वाढीवर वातावरणातील विविध घटकांचा परिणाम होत असतो. यामध्ये प्रामुख्याने एकूण पाऊस, पावसाचे दिवस, पडलेल्या पावसाची सरासरी किमान व कमाल तापमान, आद्रता, सूर्यप्रकाशाचे तास, वाऱ्याचा वेग, जमिनीचा प्रकार, जमिनीची जलधारण क्षमता, पिकांच्या वाढीची अवस्था, इत्यादी घटकांचा समावेश होतो. शेंगा भरण्याच्या काळात सोयाबीन, मुग, उडीद, ही पिके पाण्याच्या ताणाला अतिशय संवेदनशील आहेत. फुल धरण्याच्या अवस्थेत पिकला पाण्याचा ताण बसल्यामुळे फुल गळती होऊन उत्पादनात घट होत आहे. पावसाच्या खंड सोबतच वातावरणातील इतर घटकांची परिस्थिती देखील उत्पादन व उत्पादकता निश्चित करण्यासाठी कारणीभूत ठरते. पावसाच्या खंडामुळे होणारे नुकसान तपासण्यासाठी हवामान शास्त्र विभागात अभ्यास चालू आहे. पावसाचा २० ते २५ दिवसाचा खंड पडल्यास ५०% उत्पादनात घट होते. बीड जिल्ह्यात मागील २० ते २५ दिवसापासून पाऊसाचा खंड पडल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट होणार असून हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाऊस नसल्याने फुले गळती मोठ्याप्रमाणात झाली असून शेंगा कमी प्रमाणात भरल्या आहेत. ज्या शेंगा भरल्या आहेत त्यामध्ये दाण्याचा आकार कमी झाला असून दाणे कमी पोसले आहेत… याआधीच शंखी गोगलगाय व पिवळा मोझाक यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते आत्ता पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानात भर घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वरील सर्व बाबीचा विचार करून तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचीअत्यंत आवश्यकता आहे. बीड जिल्ह्यातील सोयाबीन, मुग, उडीद, कापूस पिकांचे तातडीने पंचनामे करण्याबाबत आदेश देऊन विमा कंपनीला गांभीर्याने घेण्याबाबत आदेश अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.