मुळात संस्कृत भाषेत असलेल्या पंचतंत्रातील कथा इसवीसनाच्या पाचव्या शतकातल्या आहेत. ह्या कथांची इंग्रजीत भाषांतर केलेली पुस्तके आहेतच, पण अरबी आणि फारसी भाषेत सुध्दा ह्या कथांची भाषांतरे केली आहेत. सोळाशे वर्षांनंतर सुध्दा विष्णूगुप्ताने लिहिलेल्या ह्या कथा ताज्या आहेत, डोळ्यांत अंजन घालणा-या व डोक्यात लख्ख प्रकाश पाडणा-या आहेत..!
पंचतंत्रात मानवी प्रवृत्तीची प्रतीकं दाखवण्यासाठी प्राणी व पक्षांची पात्रं उभी केली आहेत. ससा, हत्ती, वाघ, सिंह, अस्वल, उंटापासून ते कावळा, पोपट, गरुड, साप मुंगूसपर्यंत सगळीच पात्रे पशुपक्षांची; तर त्यांची प्रवृत्ती मात्र मानवी..! ससा कसा..? तर भित्रा..! कावळा कसा..? तर सावध..! कोल्हा कसा तर.. हुशार..! गरुड कसा तर.. भरारी घेणारा..! लांडगा तर लबाड.. साप कसा तर बेभरवशाचा, उलटणारा, कशीही दिशा बदलणारा अन् मुंगूस त्याचा शत्रू म्हणून शुभ शकूनाचं प्रतीक..! मुंगसाचं तोंड दिसणं शुभसंकेत मानण्याचे प्रकार आजही समाजात दिसतात.. अशीच एक कथा साप अन् मुंगसाची आहे.
एक जोडपं होतं. त्यांचं घर एका कोपर्यातल्या शेतात होतं. माणसांचा वावर कमी अन् सापांचा वावर जास्त असलेला तो भाग होता. दोघांना काम करण्यासाठी बराच वेळ घराबाहेर रहावं लागायचं म्हणून त्यांनी घराच्या रक्षणासाठी एक मुंगूस पाळला होता. मुंगूस त्या घरात खूप रुळला होता. मुंगसाच्या भीतीनं विषारी साप घराच्या सभोवती फिरकेनासे झाले..
एके दिवशी तो पुरुष कामासाठी बाहेर गेला व स्त्री घरकाम करु लागली. पाणी संपलं होतं म्हणून ती छोट्या मुलीला पाळण्यात टाकून घागर घेऊन बाहेर पडली.. इकडच्या भागात कोणी माणूस व प्राणी येण्याची शक्यता नव्हती अन् सापांचा बंदोबस्त करण्यास मुंगूस समर्थ होतं. मुंगूसाच्या विश्वासावर घर सोडून ती पाणी आणण्यासाठी बाहेर गेली होती..
ती बाई घराबाहेर पडली अन् ती संधी साधून दोन विषारी नाग घरात शिरले.. साप पाळण्याच्या दिशेने निघाले होते.. अचानक मुंगसाची नजर सापांवर पडली अन् झटापटीला सुरुवात झाली. दोन साप विरुद्ध एक मुंगूस. दंश व चाव्यांचे हल्ले प्रतिहल्ले होऊ लागले.. बराच वेळ झुंज दिल्यावर दोनही विषारी साप मारले गेले, सापांचे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले, बाळ पाळण्यात सुखरूप अन् सर्पदंशानं घायाळ होऊन थकलेलं मुंगूस घरमालकीणीची वाट पहात उंबरठ्यावर उभं राहिलं..!
पाण्याने भरलेली घागर घेऊन बाई घराजवळ आली तर समोर उंबरठ्यावर रक्तानं तोंड माखलेलं मुंगूस उभं होतं. त्याचं सगळं शरीरही रक्तानं भिजलेलं.. ते दृश्य पाहून बाई क्षणभर थिजली. एका काल्पनिक भीतीनं थरथरु लागली.. अचानक मनातल्या भीतीची जागा रागाने घेतली.. बाळ गेलं या रागाच्या भरात तिनं हातातली पाण्यानं भरलेली घागर मुंगसाच्या अंगावर भिरकावली.. सापांशी झुंजून विषारी सर्थपदंशाने थकलेल्या त्या शरीरावर पाण्याने भरलेली घागर आदळताच मुंगूस जागच्या जागीच ठार झालं.. क्रोध,संताप,भीतीचं वादळ मेंदूत घोंघावत असलेली ती बाई जेव्हा उंबरठा ओलांडून घरात शिरली तेव्हा..? तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिच्या मेंदूतलं वादळ उलट्या दिशेनं घोंघावू लागलं.. समोरच्या पाळण्यात बाळ अंगठा चोखत हसत हसत पाळण्याला बांधलेल्या चांदव्याशी खेळत होतं. भोवती घडलेल्या उलथापालथीचा त्या बालमनाला गंधही नव्हता..!
रक्षणकर्त्याच्या शरीराचा लगदा घागरीखाली रक्ताने पाझरत होता अन् बाईच्या डोळ्यांतील झरा वेगवान झाला होता.. दुसर्या दिवशीपासून घराभोवती सापांचा सुळसुळाट वाढला अन् मुंगूस तिकडे फिरकेनासे झाले.. कारण मुंगूस अतिजहाल विषारी सर्पांशी लढू शकत होते, पण कृतघ्न प्रवृत्तीशी लढणं त्यांच्या आवाक्याबाहेर होतं..!
ही एक प्रवृती दाखवणारी काल्पनिक कथा आहे. कोणत्याही व्यक्तीचा याच्याशी संबंध नाही अन् प्रचलित राजकारणाचा व राजकीय पक्षाचाही याच्याशी संबंध नाही. खरं म्हणजे आज नागपंचमीच्या दिवशी सर्व माताभगिनी (अपवाद वगळून) नागाच्या फोटोची पुजा करत असताना ही कथा आठवणं हा योगायोग नव्हे.. तर एका दिवशी असेना पण माणूस त्याचं आदरातिथ्य व पुजा करतो. कारण काही प्रतीकं संस्कृतीची तर काही प्रवृत्तीची असतात..!✍🏻
विकास कुलकर्णी
“विकास कुलकर्णी हे अंबाजोगाई येथील वृक्तृत्व विकास अकादमिचे संचालक आहेत. शिवसेनेचे एक निष्ठावंत कार्यकर्ते, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्व विचारांचे पाईक, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू सहकारी, उत्कृष्ट वक्ते व लेखक आहेत.”
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.