अंबाजोगाईच्या सोमय मुंडे यांना राष्ट्रपती शौर्य चक्र पुरस्कार जाहीर!
President's Shaurya Chakra Award announced to Somay Munde from Ambajogai!


अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील मुळ रहिवाशी असलेले आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्यातील भूमिपूत्राच्या कर्तृत्वामुळे तालुक्याचे नाव या देशाच्या नकाशावर पोहाचले आहे. सोमय मुंडे यांच्या धाडसी कार्याची दखल भारत सरकारने घेतली असून त्यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहिर झाले आहे. सोमय मुंडे या अवघ्या ३१ वर्षाच्या या तरुणाने यशाला गवसणी घातलेली आहे.
सोमय मुंडे हे सध्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ बनलेले आहेत. मुळचे बीड जिल्ह्यातील आणि सध्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी असलेल्या एका डॉक्टर दांपत्याचा मुलगा असलेल्या आयपीएस अधिकारी सोमय मुंडे यांनी शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील मार्डीनटोला जंगलात तब्बल नऊ तास नक्षलवाद्यांशी झुंज देत, धाडसी कार्यवाही करत नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे सह २६ जणांना कंठस्नान घातलं. या कारवाईने देशाची व राज्याची मान उंचावली आहे. सोमय विनायक मुंडे हे सध्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवाशी आहेत. त्यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव हे आहे. त्यांचे वय फक्त 31 वर्षे असणारे सोमय विनायक मुंडे यांना बालपणापासूनच आयपीएस अधिकारी व्हायचं होतं. आएपीएस अधिकारी असणार्या सोमय मुंडे यांचे शिक्षण एमटेक, आयआयटी आहे.
सोमय यांचे प्राथमिक शिक्षण हे देगलूर येथील साधना हायस्कुल या ठिकाणी झालं आहे. तर माध्यमिक शिक्षण सातारा सैनिकी शाळा आणि राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज, देहराडून या ठिकाणी झालं आहे. सोमय यांनी आयआयटी व एमटेक ही पदवी मुंबईहून घेतली. सोमय मुंडे हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची २०१६ ची परीक्षा पास होऊन आयपीएस अधिकारी झाले आहेत. सोमय मुंडे हे देगलूर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. मुक्ता विनायक मुंडे व जनरल सर्जन डॉ. विनायक चंद्रसेन मुंडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांना दोन मुले असून सोमय हे थोरले असून मुलगी सुमंता यांचे कॉम्प्युटर सायन्स चे शिक्षण चालू आहे.
सोमय विनायक मुंडे यांची पहिली पोस्टींग ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणची आहे. त्यानंतर एएसपी म्हणून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे व आता गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे ऍडिशनल एसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या अगोदर अनेक धाडसी कार्यवाही केल्या आहेत. ज्यात मार्च २०२१ छत्तीसगड परिसरातील अबुजमाळ येथे नक्षली परिसरात जाऊन त्यांचा अड्डा उद्धस्त करत एन्काऊंटर कार्यवाही करून शस्त्र हस्तगत केले होते. तर जून २०२१ रोजी गडचिरोली येथील अटापल्ली येथे धाडसी कार्यवाही करत १३ नक्षलींना कंठस्नास घातले होते.


काय आहे शौर्य चक्र?
शौर्य चक्र भारताचे शांततेच्या काळातील शौर्याचे पदक आहे. हा सन्मान सैनिकांना व असैनिकांना असाधारण शौर्य किंवा प्रकट शूरता किंवा बलिदानासाठी दिला जातो. हा मरणोत्तर सुद्धा दिला जाऊ शकतो. शौर्यामध्ये हा कीर्ती चक्रच्या नंतर येतो.
कोणाला देतात हा पुरस्कार?
देशाच्या संरक्षणासाठी कायम सज्ज असलेल्यांना वर्षातून दोन वेळा म्हणजे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला (Republic day 2022 ) पुरस्काराने सन्मानित (Gallantry awards) करण्यात येतो. काही पुरस्कार फक्त देशाच्या रक्षणासाठी दिवसरात्र लढणाऱ्या सैनिकांसाठी असतात. तर काही पुरस्कार हे पोलीस, जेल कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसाठी पण असतात. बालशौर्य पुरस्कार त्यातीलच एक पुरस्कार आहे. परमवीर चक्र हा सैन्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतर महावीर चक्र, कीर्ति चक्र, वीर चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र. आज आपण या पुरस्कारांबद्दल जाणून घेऊयात…
देश स्वतंत्र झाल्यानंतर तेव्हापासून भारत सरकार दरवर्षी जवान आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देण्यात येत आहे. पुढे २६ जानेवारी १९५० ला खास करुन शौर्य पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. आणि अजून तीन पुरस्कारांची घोषणा केली परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र. तसं तर १५ ऑगस्ट १९४७ पासून हे पुरस्कार प्रभावी मानले गेले. त्यानंतर भारत सरकारने ४ जानेवारी १९५२ मध्ये अजून तीन पुरस्कारांची घोषणा केली. अशोक चक्र श्रेणी-१, अशोक चक्र श्रेणी-२ आणि अशोक चक्र श्रेणी-३I. १९६७ मध्ये त्यांचे नाव अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र अशी ठेवण्यात आले आहेत.