रिमझिम पावसातच काळवटी तलाव ओव्हरफ्लो; अंबाजोगाईकरांची पाण्याची चिंता मिटली


अंबाजोगाई: अंबाजोगाई शहर व परिसरात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरासाठी राखीव असलेला काळवटी साठवण तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. मागील चार दिवसापासून या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. काळवटी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे अंबाजोगाईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. अंबाजोगाई शहराला मुख्यत्वे धनेगाव धरणातून पाणीपुरवठा होतो, तेथून पाणीपुरवठा थांबल्यास शहरासाठी राखीव असलेल्या काळवटी तांडा येथील साठवण तलावातून अंबाजोगाईकरांची तहान भागवली जाते.
त्यामुळे काळवी साठवण तलावाचे अंबाजोगाईकरांसाठी अनन्य साधारण महत्व आहे. या तलावाची साठवण क्षमता १.४१ दशलक्ष घनमीटर एवढी असली तरी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास अंबाजोगाईला या तलावाचे पाणी किमान सहा महिने पुरते. त्यामुळे हा साठवण तलाव पावसाळा सुरू झाल्यानंतर महिनाभरातच भरल्यामुळे अंबाजोगाईकरांसाठी ही आनंदाचीबातमी आहे. दरम्यान, यंदाही चांगला पाऊस पडत असल्याने शहर व परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. त्यामुळे बुट्टेनाथ, नागनाथ, काळवटी तांडा हा परिसर सौंदर्याने नटला असून निसर्गप्रेमींना खुणावत आहे.