स्थानिक स्वराज्य संस्थानिवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देणार


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहणार असल्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, अशी माहिती दिली.
ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. @NCPspeaks @PawarSpeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 11, 2022
धनंजय मुंडे यांचंही ठरलं!
“राज्यातील ९२ नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असल्या, तरी माझ्या मतदार संघातील परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना २७% जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत बहाल केले जावे, ही आमची भूमिका आहे व राहील”, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
निवडणुका पुढे ढकला, भाजपची मागणी
पावसाळ्यात निवडणुका कशा होणार? मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारशी सल्लामसलत न करता निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली आहे.