प्रबोधन

नंदा खरे : मूल्यप्रधान लेखनप्रवास

अतुल देऊळगावकर यांच्या ‘ऐकता दाट’ ह्या साधना प्रकाशनाने प्रसिद्द केलेल्या पुस्तकातील मुलाखतीतील काही अंश

अनंत यशवंत खरे उर्फ नंदा खरे यांनी मुंबईच्या आयआयटी मधून 1961 या वर्षी सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर ते ‘खरे-तारकुंडे असोसिएट्‌स’ ह्या व्यावसायिक संस्थेतून बांधकाम क्षेत्रातील कामं करू लागले.  उजनी व जायकवाडी धरण, अनेक पुलांची कामं त्यांनी केली आहेत.  2001 ला त्यांनी निवृत्ती घेतली. या सगळ्या क्षेत्रामधनं आणि ते म्हणत जरी नसतील, तरी ते विज्ञान प्रसाराच्या कामाला लागले. 2001 ला निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सलग 10 वर्षं ‘आजचा सुधारक’चं संपादन केलं. त्यात कोणतेही विषय वर्ज्य नव्हते. प्रत्येक मराठी वाचकाने अंक संग्रही ठेवला पाहिजे, असा त्याचा दर्जा होता. खरे यांना शेती, माती, पाणी, नगर रचना, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, उत्क्रांती आणि हे सगळे विषय अतिशय जवळचे असल्यामुळे ‘आजचा सुधारक’मधून अनेक ज्ञानशाखांचा संगम दिसत असे. खरे यांची ग्रंथसंपदादेखील हेच अधोरेखित करते. ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ ‘2050’, ‘अंताजीची बखर’, ‘संप्रती’, ‘जीवोत्पत्ती आणि त्यानंतर’, ‘दगडावर दगड विटेवर वीट’, ‘नांगरल्यावीण भुई’, ‘कहाणी मानव प्राण्याची’, ‘बखर अंतकाळची’, ‘वाचताना, पाहताना, जगताना’, ‘उद्या’, ‘ऐवजी’, ‘दगडधोंडे’ यांमधून अनेक दिशांनी जगाचं दर्शन होतं. खरे यांनी ‘वारूळपुराण’, ‘इंडिका’ ही भाषांतरित केलेली पुस्तके आहेत. विषयातील विविधतेमुळे त्यांचा आवाका लक्षात येतो. ते आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा करून दाखवतात. कारण त्यांना मुळात आतून कुतूहल आहे. मग ते ‘जीवोत्पत्ती आणि नंतर’ असेल किंवा ‘कहाणी मानव प्राण्याची’ सारखा अतिशय महत्त्वाचा मोलाचा ग्रंथ. त्यातून ते वाचकाला मुळापर्यंत घेऊन जातात. ‘अंताजीची बखर’मधून इतिहासाकडे तटस्थपणे पहाण्याची नजर देताना त्यांची विनोदबुद्धी मनापासून खुलून जाते.

साहित्य अकादमीने गौरविण्यात आलेल्या ‘उद्या’ ह्या कादंबरीत श्री. नंदा खरे यांनी कमालीच्या अस्वस्थेतून वर्तमानाचा वेध घेत `उद्या’ या कादंबरीत भविष्याचा बहुआयामी विशाल पट सादर केला आहे. ललित, वैचारिक, कथा, कादंबरी हे सारे भेद पुसून त्यांचा संगम घडवला आहे.

विख्यात विचारवंत नोम चोमस्कि म्हणतात“जनतेच्या मनावर नियंत्रण मिळवण्याकरिता दरवर्षी हजारो कोटी खर्ची पडत असतात. काय घडत आहे यापासून सर्वसामान्य जनता अनभिज्ञ असते  आणि याची त्यांना जाणीव देखील नसते. ”  याची प्रखर जाणीव ‘उद्या’ करून देते.

व्यक्ती व नाती दोन्हींचं वस्तुकरण झाल्यामुळे आपल्याला कुणाशीही जोडून घेण्यासाठी (कनेक्ट)उपयोगिता हा एकमेव निकष झाला आहे. बाजारपेठेत आपल्या `मूल्यात’ वृध्दी कशी होईल, या काळजीनं सगळे ग्रासून गेले आहेत. घरापासून दारापर्यंत, संस्थेपासून यंत्रणेपर्यंत उदारतेची हेटाळणी, सहिष्णुतेची नालस्ती व करूणेची अवहेलना वृध्ंिदंगत होत आहे. जिव्हाळा आटत जाऊन वरचेवर परिपूर्ण शुष्क (सॅच्युरेटेड ड्रायनेस)होत चाललेल्या वातावरणात संवेदनशीलतेची ससेहोलपट होत आहे. अशा परिस्थितीत सभोवतालच्या असंख्य घटनांचा अन्वय लावणं हे अतिशय यातनादायक असतं. कारण त्यातून आगामी काळाची जीवघेणी चाहूल ‘उद्या’ त होते.

‘उद्या’ विषयी स्वत: नंदा खरे म्हणतात.

नंदा खरे :- खरं सांगू का? ती कादंबरी तिला मी ‘उद्या’ हे नाव दिलं त्याच्या ताबडतोब नंतर लोक मला म्हणायला लागले की, ‘उद्या’ काय म्हणतोयस? ती आज आहे काल आहे. माझा मुलगा मला म्हणाला, ‘‘ तुम्ही फक्त पृष्ठभाग खरवडलाय, खोलात कुठंच गेला नाहीयेत’’. आणि मला ते पटतंय. ते पुस्तक लिहून पूर्ण झालं होतं २०१४ साली अन्‌ ते २०१५ च्या सुरुवातीला प्रकाशित झालं. आता त्यानंतरही ५वर्षं उलटून गेली आहेत. या काळात परिस्थिती इतक्या झपाट्यानं वाईट झालेली आहे की, कोविड हा फार माझ्या मते दुय्यम प्रकार आहे. आपल्याला कल्पनासुद्धा करवत नाही इतकी विषमता वाढलेली आहे. कोविडची साथ अन्‌ टाळेबंदी सुरू झाल्यानंतर आत्महत्यांचे प्रकार वाढलेले आहेत. अपघात वाढले. जालन्याजवळ १६ माणसं रेल्वेखाली गेली. दोन-तीन माणसं सायकलनं जात होती, त्यांना ट्रकनं धडक मारल्यामुळे गेली. खरं तर, कोरोनानं जेवढी माणसं मरतायेत जवळजवळ तेवढीच माणसं कोरोनाच्या उप-परिणामानं मरत असतील अशी शक्यता आहे. कुणीतरी याचा अभ्यास केला पाहिजे. मला कल्पना आहे, आपल्याकडे माहिती मिळवणं आणि त्यातसुद्धा अंकबद्ध माहिती मिळवणं खूप कठीण आहे. कारण सगळे लोक खोटं बोलतात, सरकारही खोटं बोलतं. सर्व कंपन्या खोटं बोलतात. त्यातून तुम्हांला खरं काय आहे ते शोधावं लागतं. कोरोनामुळे मरणं आणि कोरोनाच्या उप-परिणामांमुळे मरणं हे जर सम प्रमाणात असेल तर मानसिक परिणाम किती वाईट होत आहेत? खूप लोकं डिप्रेशन-खिन्नतेचे विकारी वाढत आहेत. मी स्वतः जवळजवळ त्या पातळीवर अनेक वर्षं आहे. त्यामुळे मला आता लोक म्हणतात की, तुझं हे नेहमीचं रडगाऱ्हाणं असतं. मीही स्वतःला पटवून घेतलेलं  आहे, आपण आता असेच रडत राहणार.

त्याबद्दल एक गमतीदार गोष्ट आहे! आहे. ‘हेलन ऑफ ट्रॉयची कहाणी’ मधील हेलन ही एक ग्रीक राजकन्या होती. सध्याच्या तुर्कस्थानात ट्रॉम आहे. तिथल्या राजाचा मुलगा पॅरिस यानं तिला पळवून आणलं. पॅरिसचा बाप प्रियान याच्या अनेक मुलांपैकी एक होती कॅसांड्रा! ह्या राजकन्येच्या प्रेमात अपोलो हा देव पडला. त्यानं तिला खूश करण्याकरिता ‘तिला भविष्य समजेल’ असा वर दिला. पण हा वर देऊनसुद्धा ती काही देवाला वश झाली नाही. त्यामुळे अपोलो संतापला आणि म्हणाला, ‘आता मी तुला दिलेला वर परत तर घेऊ शकत नाही. तू भविष्यकथन करशील, पण त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही.’ कॅसांड्राने तिच्या भावाला- हेलनसला भविष्य कथन करायचं कौशल्य शिकवलं. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. परंतु कॅसांड्रावर कुणीही विश्वास ठेवला नाही. कॅसांड्रा म्हणाली, ‘तुम्ही दरवाजाबाहेर ठेवलेला लाकडी घोडा घेऊन आला आहात. त्याच्या आतमधे ग्रीक लोक लपून बसले आहेत. ते तुम्हांला रात्रीत येऊन कापून काढतील.’ कोणीही ऐकलं नाही आणि ट्रॉयचा सत्यानाश झाला. विषमतेचे आणि हवामानबदलाचे धोके सांगणारे वैज्ञानिक अनेक वर्षांपासून अनेक धोक्याच्या सूचना देत आहेत. लोक म्हणतात, ‘तुम्ही नेहमीच असंच सांगत असता. त्याला काही अर्थ नाही.’ आम्ही आपलं आडनाव ‘खरे’ऐवजी ‘कॅसांड्रा’ करावं, असं बरेचदा माझ्या डोक्यात येतं.

‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ नावाची एक मालिका आहे. (ॲमेझॉन प्राइमवर पहायला मिळेल.) त्यामधे एक गोष्ट होती- एखादी व्यक्ती लवकरच हिंसेत गुंतणार आहे हे दाखवणारा प्रोग्राम एक माणूस रचतो. त्यात एक पेच फक्त असा असतो की, ती व्यक्ती दुसऱ्याची हिंसा करणार आहे की ती व्यक्ती स्वत:च हिंसेचा बळी होणार आहे, हे मात्र कळत नाही. त्यामुळे  तो माणूस सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे की सायकॉलॉजिस्ट आहे हे समजत नाही. तो खूप श्रीमंत आहे पण तो फाटका माणूस आहे- लंगडत चालणारा जाड चश्मेवाला, माझ्यापेक्षाही जाड चश्मेवाला आहे. तर तो जुना सैनिक अधिकारी किंवा थोडक्यात सांगायचं तर सत्प्रवृत्त माणूस गुंड गोळा करून म्हणतो, ‘ह्या माणसाबद्दल नाव येतंय. ह्या माणसाभोवती हिंसा होणार आहे. तर त्या माणसाजवळ जा. जर तो हिंसा  करणार असेल तर त्याला थांबव आणि जर त्याच्यावर हिंसा होणार असेल तर ती थांबव.’ पुढे ही मालिका बरीच चालली. माझ्या दृष्टीनं ह्या सगळ्या  मालिका म्हणजे पुढे काय होणार यासाठी केलेली बौद्धिक कसरत आहे. ह्याचा अभ्यास केला पाहिजे की हे तंत्रज्ञान फार दूर नाहीये. कदाचित त्यांची प्रयोगशाळेत चाचणीही चालू झालीही असेल. ते शास्त्रज्ञही आपल्याला सांगणार नाहीत. (ते पैसे मिळाल्याशिवाय काही सांगत नाहीत अशी आजची स्थिती आहे.) आता ‘बिलियन’ नावाचीही एक मालिका आहे तिचे आजवर पाच भाग झाले असून सहावा भाग येणार आहे. तो तर मला भयंकर घाबरवतोय. त्यात माणुसकी उरलेलीच नाही. फक्त पैशांकरता काय काय करायचं, ह्यावरच ती मालिका बेतलेली आहे. त्या मालिकेचं परीक्षण लिहिण्याचं मनात आहे. कुणी छापेल की नाही, मला माहीत नाही. त्या गोष्टी जरा त्रासदायक असतात. जाहिराती जातील, सरकारी मालक नाराज होतील, ही भीती दाटून आलेली असल्यानं वृत्तपत्रं घाबरलेलीच असतात. आपल्याला घाबरत घाबरतच जगायचं आहे, तर माझ्या दृष्टीने सुखाची गोष्ट अशी आहे की मी आता ७४ वर्षांचा आहे. त्याच्यामुळे फार काही नाही; पण तू माझ्यापेक्षा १५ वर्षांनी लहान आहेस. बाकी माझे पुष्कळ मित्र आहेत की, जे माझ्यापेक्षा थेट ३०—४०  वर्षांनी लहान आहेत. त्यांना हे सगळं भोगत जगायचंय.

काही पुस्तकं तर मी उत्साहानं विकत घेतो. वाचायला सुरुवात करतो. प्रस्तावना वाचून झाल्यावर मी इतका खिन्न होतो की म्हणतो, ‘जाऊ द्या, हे नको.’  ‘एमआयटी’ (मॅसेच्युसेटस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी) मधील प्रो. शोशना झुबॉफ मांनी लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकानं वाद निर्माण केला आहे. त्याचं अलीकडचं ‘सर्व्हेइलन्स कॅपिटॅलिझम’ हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. आपण कसे वागतो ह्याची माहिती गोळा केली जाते अन्‌ त्या माहितीवरून व्यापारी उत्तरं काढत असतात. एखाद्या शहरी मध्यमवर्गीय माणसाची साधारणपणे 1000 वेळा नोंद होत असणं सहज शक्य आहे. तो डेबिट वा क्रेडिट कार्ड वापरतो, मोबाइल वापरतो, गुगल सर्च करतो तेव्हा अनेक वेळा नोंद होते. असं करता तुमच्याबद्दलची माहिती साठत असते. झुबॉफबाई म्हणतात, ‘तुम्ही केवळ ग्राहक नाही आहात. तर तुम्ही विदा (डाटा) आहात.’ ते पुस्तक पूर्ण करायची हिंमत होत नाहीये माझी. पण…मला त्रास होत असला तरी मला अनेक सोयी आहेत. पण मजुरांचं काय? आज स्थलांतरित कामगारांबद्दल पुष्कळ चर्चा चालू आहेत. या स्थलांतरित कामगारांकरिता आगगाडींच्या सोयी करतात. पैसे कोण देणार, अजूनही माहीत नाही. जे त्यांना गुडबाय म्हणतायत त्या राज्यांनी? की ज्या राज्यात ते गेले त्यांनी पैसे द्यायचे? यावर खूप वर्षं भांडणं होतील. जालन्यात माणसं मेली त्यांना मध्य प्रदेशात जायचं होतं. त्यांना ओळखपत्र, प्रवासाचा परवाना आणि कोविड-१९ नसल्याचं प्रमाणपत्र मागितलं जातं. त्यांचं दूर राहिलं, मलासुद्धा एवढी कागदपत्रं मिळवता येणं शक्य होणार नाही. कारण मला तेवढा अनुभव नाही. तरी मी अडाणी नाही, उत्तम इंजिनीअर आहे. महाराष्ट्रातली खूप महत्त्वाची कामं माझ्या हातून झाली आहेत. पण हे तंत्रज्ञान माहीत नसल्यामुळे ते मला करता येणार नाही. हे डिजिटल तंत्रज्ञान इतक्या सहजपणे  सगळ्या लोकांना अवगत होणं शक्यच नाही. हे तंत्रज्ञान शिकण्याकरता त्यांना तसं शिक्षण देणं गरजेचं आहे. परंतु शिक्षण देण्याचा विचार केला जातो का? अजिबात नाही. जी.डी.पी.च्या (सकल राष्ट्रीय उत्पादन) 5 ते 6 टक्के खर्च शिक्षणावर होणं आवश्यक आहे, असं अनेक तज्ज्ञ सांगतात. भारत 1 टक्क्याच्या जवळ आहे आणि कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे. आता हे ऑनलाइन शिक्षणचंच पाहा ना! स्मार्ट फोन नाही त्याला शिक्षणच नाही? आपल्याला यात काही गैरही वाटत नाही.

तुम्ही विजेचं बिल भरायला गेलात तर फॉर्मवर तुमचा मोबाइल नंबर लिहून मागतात. माझ्या समोर एक बाई उभी होती. ती म्हणाली, ‘मी मोलकरणीचं काम करते. माझ्याकडे मोबाइल नाही.’

‘मग तुमचा पत्ता कुठे आहे?’

ती म्हणाली, ‘मी ज्यांच्याकडे काम करते त्यांच्याकडच्या आउट हाउसमधल्या एका खोलीत राहते. माझी काय दोन माणसे आहेत.’

‘त्यांचा मोबाइल नंबर द्या मग!’

… पण मालक मोलकरणीला मोबाइल नंबर देईल का वापरायला? आपल्या वीज महामंडळाचे खूप नियम आहेत. मोबाइल नंबर असल्याशिवाय वीज मिळणार नाही, असाही नियम आहे. आपण काही तक्रार तरी करतो का ह्या विषयी? आपल्याला काही देणंघेणंच  नसतं ह्या विषयी. आपल्या सगळ्यांकडे स्मार्ट फोन आहेत. पण समाजाच्या एका खूप मोठ्या वर्गाकडे तो नाहीये. भारतातली जवळपास एक चतुर्थांश जनतेला (सुमारे 30 कोटी) ऑनलाइन वा डिजिटल सुविधा उपलब्ध नाही. आपल्या मनात बंधुभाव ही भावना इतकी क्षीण झाली आहे, की आपल्याला ती माणसं आहेत असं वाटतच नाही. आता कोविड चालू झाल्यापासनं मी माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मित्रांशी बोलतो. मी बोलताना कधीतरी विषय निघतोच. कारण मी बांधकाम क्षेत्रात होतो. तिथं हातावर पोट असणारी माणसंच माझ्या आजूबाजूला असायची. मी कुठंही चुकून जरी बोललो की ‘रोजंदारीवर जगणाऱ्या माणसांना त्रास आहे.’ तर माझे मित्र ताबडतोब विषय बदलायचे. ते सांगतात की, ‘आमच्या सोसायटीच्या खाली भाजीवाला येतो. मग चौकीदार आम्हांला फोन करतो. मग आम्ही खाली जाऊन भाजी घेऊन येतो.’

लाखो उपाशी माणसं एका ठिकाणाहून आपल्या घराकडे जायला आसुसली आहेत. याच्याकडे आपलं लक्ष जातंय का? अजिबात नाही. प्रेमचंदांच्या गोष्टींवर आधारलेला ‘गोदान’ नावाचा चित्रपट होता. तुम्ही आमुष्यात कधीतरी एकदा गायीचं दान केलं तर तुम्ही स्वर्गाला जाता. त्यातील पात्राला (अभिनेता – राजकुमार ) काहीतरी करून आपल्या हातून एकदातरी गोदान करून स्वर्गाला जाण्याचं भाग्य मिळावं म्हणून तो गोदान करण्यासाठी झटत असतो. त्याचा धाकटा भाऊ (मेहमूद) याच्या तोंडी गाणं आहे:

‘पिपरा के पतवासरीखे डोले मनवा,

कि जियरा मां उठत हिलोर

अरे पुरवा के झोंकवा से आयो रे संदेसवा

कि चल आज देसवा की ओर…

पिपरा के पतवा’

आपल्याला घराकडे जायची इच्छा भयंकर तीव्र असते. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे मराठीतलं उदाहरण आहेच. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्या माणसांना जाता येत नाहीये. दूर बसून सांगायला काय जातं? की  ‘त्यांच्या खात्यात पैसे आहेत.’ तो म्हणतो, ‘हो, माझ्या जनधन खात्यात पैसे जमा झालेत. पण ते जनधन खातं बिहारला आहे अन्‌ मी हरियाणाला अडकलो आहे.’  किती पैसे जमा झालेत? 500 रुपये! पण तेसुद्धा त्याला मिळत नाहीत. कारण तो हरियाणाला अडकून पडला आहे. त्याची बायका-पोरं, म्हातारे आईबाप बिहारमधे आहेत, हे आपल्याला दिसतंय का? तर नाही दिसत.

साभार अतुल देऊळगावकर

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker