

फक्त एखादा ’अभिमन्यू’, एखादा ’भगतसिंग’च वेडा असतो.. असं नव्हे, तर एखादा ’निरंजन टकले’ देखिल वेडा असू शकतो, ही आजच्या काळात अत्यंत आशादायी गोष्ट आहे! लोकशाही आणि मानवतेवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे!
न्यायमूर्ती लोया यांचा खुनी कोण? (Who killed judge Loya?) हे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचं वादळी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. वाचलं. सर्वार्थानं झपाटून टाकणारं हे प्रकरण आहे. ते पुस्तक केवळ न्यायमूर्ती लोया यांच्या खुनाची भयकथा सांगत नाही, तर ती एकूणच आपल्या सध्याच्या भेदरलेल्या समाजाची कहाणी सांगते. दहशतीत वावरणाऱ्या समाजाचं भेदरलेपण सांगते. सत्तेच्या उन्मादाचे बीभत्स दर्शन आपल्याला घडवते. आज आपण आपल्या माना कशा कशा लोकांच्या हातात दिलेल्या आहेत आणि त्यावर चालवली जाणारी सुरी देखिल आपणच धार लावून सन्मानपूर्वक आपल्याच खुन्यांच्या हातात कशी अभिमानाने देत आहोत, याची स्पष्ट जाणिव हे पुस्तक आपल्याला करून देते. सत्तेसाठी, स्वार्थासाठी हलकटपणाचा कहर करणारे लोक जसे आहेत, तसेच सत्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या लोकांचीही समाजात कमी नाही. फक्त ते आपल्याला ओळखता येत नाहीत. समोर दिसत असले तरी त्यांची किंमत कळत नाही, याची जाणीव या पुस्तकातून आपल्याला होते.
राजरोस आणि ठोकभावानं माणसं मारणारे लोकच जेव्हा समाजाला हिरो वाटायला लागतात, तेव्हा समाजाची नेमकी कशी भयानक अवस्था होऊ शकते, याची अस्सल रंगीत तालीम म्हणजे न्यायमूर्ती लोया खून प्रकरण आहे. एखादा समाज जेव्हा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करतो, तेव्हा त्या समाजाचा विनाशकाळ जवळ आला आहे, असं समजायला हरकत नाही.
न्यायमूर्ती लोया यांचा संशयित खून नागपूरमध्ये झाला. रविभवन सारख्या व्हीव्हीआयपी राजकीय परिसरात झाला. तरी त्याची कुणालाही कानोकान खबर लागली नाही, हे आश्चर्य आहे. निरांजन टकले यांनी एकंदरीत जी परिस्थिती पुस्तकातून मांडलेली आहे, ती हादरून सोडणारी आहे. एका वरिष्ठ न्यायमूर्तीच्या खुनाचा सूत्रधार जरी खुनी पृष्ठभूमी असलेली व्यक्ती असेल तरी त्यात सहभागी होणारे इतर मात्र सभ्य आणि प्रतिष्ठित लोक होते. ते एवढ्या सहज या कटात कसे काय सामील झाले? प्रमोशन एवढे महत्त्वाचे आहे का? पैसा एवढा महत्त्वाचा आहे काय? आपल्याच सहकाऱ्याला निर्दयपणे मारून टाकलं जात असताना ही माणसं शांत कशी राहू शकतात? त्यांच्या घरी सुध्दा मुलं असतील, बायको असेल, त्यांच्याशी या लोकांनी कशी नजर भिडवली असेल? त्यांना संशय आला नसेल का? ते सारे त्यांच्या पापात नाईलाजाने की खुशीने सहभागी झाले असतील? माणूस एवढा नीच असू शकतो का?
कळप जनावरांचा, समाज माणसांचा आणि टोळी गुंडांची असते, डाकुंची असते. जनावरांना मानसन्मान, खरे खोटे, न्याय-अन्याय, स्वाभिमान, हक्क असल्या गोष्टींशी काही देणे घेणे नसते. समाजातही बायकापोरं, घर, गाडी, इंक्रिमेंट, उद्योग, व्यापार यातच खुश असणारी जनावरं असतात म्हणून डाकूंचे फावते. अर्थात् समाजात सारीच जनावरं नसतात. काही माणसंही असतात. त्यांना स्वाभिमान असतो. सत्य असत्याची चाड असते. म्हणून समाज जीवंत असतो. म्हणून समाज चालत असतो.
अमित शहा हे काही राजकीय किंवा भ्रष्टाचार वगैरे सारख्या गुन्ह्यातील आरोपी नव्हते. ते खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होते. त्यासाठी त्यांचेच सरकार असतांना आणि ते स्वतःच गृहमंत्री असताना त्यांना तुरुंगात जावे लागले होते. काही दिवस त्यांना गुजरात मधून तडीपार देखिल करण्यात आले होते. गुजरात मध्ये खटला मोकळ्या वातावरणात चालणार नाही, असे न्यायालयाला वाटले म्हणून खटला महाराष्ट्रात चालविण्याचा आदेश दिला गेला होता. त्यातून न्यायमूर्ती लोया यांच्या खुनाची ही मालिका घडली होती!
पुस्तक प्रत्येक संवेदनशील माणसाने वाचले पाहिजे. ज्याचा आत्मा जिवंत आहे, त्या प्रत्येकाने वाचले पाहिजे. एकूणच आपली समाजव्यवस्था कशी सडून गेली आहे, किती तकलादू झाली आहे, हे समजून घेण्यासाठीतरी हे पुस्तक वाचले पाहिजे. मोठमोठे धुरंधर जेव्हा शेपटी घालून चूप बसतात, तेव्हा एखादा पत्रकार कशी सत्यासाठी झुंज देतो, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचले पाहिजे! सारा मिडिया विकला गेलेला असताना, सर्वत्र अंधार असताना, सर्वत्र दहशत असताना, चक्रव्यूहात सापडलेला एक पत्रकार कसा अभिमन्यू सारखी एकाकी लढाई कसा जिवाच्या आकांताने लढत असतो, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे! आपली संवेदना अजुनही जिवंत आहे, असा विश्वास असणाऱ्या लोकांनी हे जरूर वाचलं पाहिजे.
अलिकडच्या दोन, तीन महिन्यात दोन पुस्तकांनी भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या दोन्ही पुस्तकांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद भारतीय समाजमनातील असंतोषाचा वास्तविक अंदाज समजून घेण्यासाठी पुरेसा आहे. भारतीय राजकारणात लौकरच एक मोठं वादळ येऊ घातलं आहे, याची कल्पना या पुस्तकांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून यायला हरकत नाही. विशेष म्हणजे ही दोन्ही पुस्तकं एकाच विचारधारेशी संबंधित आहेत.
देवनुरू महादेव यांनी लिहिलेलं ’आरएसएस: खोली आणि व्याप्ती’ हे सुमारे पन्नास साठ पानाचं पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबर लाखोंनी विकलं गेलं. अनेक प्रकाशन संस्थांनी ते एकाच वेळी प्रकाशित केलं. अनेक भाषांमध्ये त्याच्या धडाधड आवृत्त्या निघाल्या. एका एका भाषेत अनेक लेखकांनी त्याचं भाषांतर केलं. अशा प्रकारचा हा बहूधा पहिलाच विक्रम असू शकतो. दुसऱ्या कोणत्या पुस्तकाला हे भाग्य लाभलं असेल, असं माहित नाही.
म्हणायला ही दोन वेगवेगळी पुस्तकं आहेत. वरवर पाहता त्यांचे विषय पूर्णतः भिन्न आहेत. पण तरीही त्यातील विकृतीचा धागा एक आहे. दोन्हींची मूळ प्रवृत्त्ती समान आहे. प्रेरणा आणि उगमस्थानही एकच आहे. घडून गेलेल्या किंवा पुढे येवू घातलेल्या अराजकाची तंतोतंत ओळख ही दोन्ही पुस्तकं अतिशय प्रभावीपणे करुन देतात. केवळ पुस्तक वाचून कुणाला तरी शिव्या घालत बसणं, हा त्यावरचा उपाय नव्हे. येऊ घातलेलं अराजक थोपविण्यासाठी समाजानं जागं होणं गरजेचं आहे. शुद्धीवर येणं गरजेचं आहे. एकत्र येऊन संघर्ष करणं गरजेचं आहे.
अभिमन्यू लढला, भगतसिंग लढला, निरंजन टकले आता लढत आहेत. आपणही तयार असलं पाहिजे. निदान लढणारांना प्रोत्साहन देण्यासाठी मागंपुढं पाहता कामा नये, एवढीच अपेक्षा आहे.
तूर्तास एवढंच..!
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष, लोकजागर