जालना: ३९० कोटी मालमत्ता प्राप्तीकर विभागाच्या छाप्यात उघड


जालन्यात प्राप्तीकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर छापा टाकला या छाप्यात तब्बल 390 कोटींचं घबाड सापडलं आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 58 कोटींची रोख रक्कम तसंच 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. 1 ते 8 ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती. विशेष म्हणजे, अधिकारी जवळपास 13 तास ही रोख रक्कम मोजत होते.
जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने 1 ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती. छापे टाकले असता एकूण 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं उघड झालं. यामध्ये 58 कोटींच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने, हिरे तसंच 300 कोटींच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. प्राप्तीकर विभागाने सर्व मालमत्ता जप्त केली असून, कागदपत्रंही ताब्यात घेतली आहे. दरम्यान यामध्ये औरंगाबादमधील एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे.
रोख रक्कम जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तब्बल 13 तास मोजणी सुरु होती. स्टेट बँकेत सकाळी 11 वाजता सुरु केलेली मोजणी रात्री 1 वाजेपर्यंत सुरु होती. राज्यभरातील आयकर विभागाचे 260 अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.