बीड जिल्ह्यात गोगलगायीच्या प्रादूर्भावाने उगवत्या पिकांचे नुकसान
पंचनामे करून हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या ; आ.धनंजय मुंडे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/snails.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/snails.png)
जिल्ह्यात पावसाने उशिरा का असेना पण दमदार हजेरी लावली असून या काळात उगवलेल्या सोयाबीन सह अन्य पिकांना गोगलगायीनी मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत, तर सोयाबीन सह इतरही पिकांना गोगलगाईच्या नुकसानीचा मोठा फटका बसला असून, याबाबत कृषी व महसूल यंत्रणेने तात्काळ पंचनामे करून राज्य सरकारने संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.
#बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील सोयाबीन व इतर पिकांचे शंखी व अन्य प्रकारातील गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, गोगलगायींचे नियंत्रण व दुबार पेरणी असे मोठे संकट जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांसमोर उभे आहे. आगामी काळात या संकटाची व्याप्ती आणखी वाढण्याची भीती आहे(1/2) pic.twitter.com/pZ1Ik9pm45
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 11, 2022
बीड जिल्ह्यात पेरणीनंतर पाऊस काही काळ लांबणीवर होता, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाने दमदार हजेरी लावली. याच काळात बीड जिल्ह्यात पेरणी करण्यात आलेल्या प्रमुख पिकांपैकी सोयाबीनचे क्षेत्र गोगलगायींच्या भक्ष्यस्थानी पडले. शंखी व अन्य प्रकारातील गोगलगायी उगवलेली रोपटे खाऊन नष्ट करत असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, कृषी विभागाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यशाळा आदी उपाययोजना केल्या, परंतु त्याला खूप उशीर झाला होता.
या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून पेरणीचे 100% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री @mieknathshinde साहेबांना पत्राद्वारे केली आहे. (2/2) pic.twitter.com/YfadNj80QL
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 11, 2022
ऐन पेरणीच्या हंगामात तत्कालीन कृषी मंत्री सहलीवर होते व नवीन सरकारमध्ये अद्याप खातेवाटप झालेले नाही. पेरणी करून १०० टक्के नुकसान झाल्यानंतर आता गोगलगायीचे नियंत्रण करणे व दुबार पेरणी करणे असे मोठे दुहेरी संकट बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या समोर असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन सह इतर पिकांचे नुकसान व प्रशासन करत असलेल्या व्यवस्थापनाची धनंजय मुंडे यांनी रविवारी अंबाजोगाई तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, अधिकारी नम्रता चाटे आदींकडूनही माहिती घेतलीअसून कृषी व महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य शासनास कळवावा व शासनाने दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करून ती तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.