जी.ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कथा अभिवाचनाचा कार्यक्रम नांदेडमध्ये रंगला!
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई,जिल्हा केंद्र नांदेड आणि 'कथायन'च्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यिक उपक्रम


नांदेड/ संतोष कुलकर्णी मराठी साहित्यातील प्रतिभावंत कथालेखक जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई,जिल्हा केंद्र नांदेड आणि ‘कथायन’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित जी.ए.कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आशयगर्भ व कथांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमात डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी ‘ पाण माय ‘ , डॉ. योगिनी सातारकर- पांडे यांनी ‘ ‘चैत्र ‘आणि शिवाजी आंबुलगेकर यांनी ‘लग्न ‘या कथेचे अभिवाचन केले. तीनही कथा उपस्थित रसिकांना भावल्या.तसेच जी.एं.च्याच ‘चैत्र’ या कथेवरून दिग्दर्शक क्रांती रानडे यांनी साकारलेला लघुपटही या कार्यक्रमात दाखविण्यात आला.
‘कथायन’चे मधुकर धर्मापुरीकर आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या नांदेड जिल्हा केंद्राच्या वतीने सचिव शिवाजी गावंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण व जी. ए. कुलकर्णी यांच्या प्रतिमांना ज्येष्ठ कथालेखक माधवराव टेंभुर्णीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी जी ए कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘ कथायन ‘ च्या माध्यमातून चालू असलेल्या जी एं च्या कथांच्या अभिवाचन उपक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमाला डॉ. माधवराव किन्हाळकर, डॉ नंदू मुलमुले, यांच्यासह साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
जी ए कुलकर्णी यांच्या अनेक कथा ह्दयाला दावे लावून आपल्याबरोबर फरपटत नेतात. अनेक कथा हृदयाला पिळवटून टाकतात. क्षणभर त्याला सुन्न करतात. सर्वच कथा वाचून संपल्यावर रसिक, साक्षेपी वाचकाला गावल्यासारखी वाटते. पण तसे वाटत असतानाच त्याच्या हातून निसटते. मागे ठेवून जाते ती फक्त एंक अंतर्मुख विषण्णता, अनेक अनुत्तरित प्रश्न,असंख्य गूढ उपप्रश्र, अस्वस्थ विचारमाला, आणि अज्ञेय भावानुभावाचां एंक गुंता. त्यांच्या कथेची ही शक्ती अजब आहे.जीएंच्या , प्रसंगी लघुकादंबर्यांइतक्या मोठ्या आकाराच्या आणि खोलीच्या कथांच्या मानाने ‘ चैत्र ‘ ही कथा खूपच छोटी आहे. आधी म्हण्टल्याप्रमाणे, कथालेखक म्हणून आपल्या संपूर्ण शक्तिनिशी लिहिण्याचा काळ अजून यायचा होता. त्या काळातली ही कथा. आयुष्यभर आपल्या लिखाणातून जी एं नीं आपल्या आयुष्याबद्दल, त्याच्या अर्थाबद्दल , माणूस म्हणून जगताना भोगाव्या लागलेल्या दु:ख-वेदनांबद्दल लिहीले. लेखक म्हणून सुरवातीच्या काही वर्षांनंतर त्यांच्या कथांचे स्वरूप गुंतागुंतीचे होत गेले, त्यातील दु:खाच्या छटा जास्त जास्त गडद होत गेल्या. नियतीच्या वरवंट्याखाली पिचतानाही आपला अभिमान , आपले सत्त्व न हरवणारी माणसे त्यांनी रंगवली. प्रस्तुत कथेतील कथानक हे , त्यांच्या पुढील प्रवासाच्या पाऊलखुणा दाखविणारेच आहे.
कथेचा निवेदक आहे एक सात -आठ वर्षांचा , गावातल्या एका गरीब (बहुदा ब्राह्मणी) कुटुंबात वाढणारा एका मुलगा. काळ : बहुदा आजपासून सत्तरेक वर्षांपूर्वीचा. कुटुंबात माणसे तीनच. आई-वडील आणि हा छोटा मधू. कथा सुरु होते तेव्हा चैत्र महिना चालू आहे आणि घराघरांमधून हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू आहेत. रोज कुठे ना कुठे कार्यक्रम असतो. या छोट्याशा गावातलीच एक बाई घराघरांमधे जाऊन “आजचे हळदीकुंकू कुलकर्ण्यांकडे , आजचे हळदीकुंकू नाईकांच्या वाड्यावर” अशी दवंडी पिटत जाते. रोज संध्याकाळी सवाष्णी एकमेकांच्या घरी आपापल्या पोरांना घेऊन जातात.
घरी आल्यावर रात्री एकही शब्द न बोलता आई मधू आणि त्याच्या वडिलांना जेवायला घालते. दुसर्या दिवशी ती आपले काही दागिने काढून मधुच्या वडिलांना देते आणि त्याचे पैसे करून एका मोठ्या हळदी कुंकवाची तयारी करायला सांगते. वडील काहीही न विचारता हो म्हणतात. आई त्यांना विचारतेही : “तुम्हाला का असा प्रश्न नाही पडला ?” वडील शांतपणे म्हणतात : “स्वतःकरता कधीही काहीही न मागणारी तू काहीतरी करायला सांगते आहेस. त्यामागे नक्की काहीतरी आहे. मी कशाला विचारू ? उद्या तू म्हणालीस की निखार्यावरून चालत जा तर तेही करेन.” हे सारे मधू पहातो , नोंदवतो.दुसर्या दिवशी मधूकडे आजवर झाले नसेल इतके मोठे हळदीकुंकू. गावभर दवंडी गेलेली असते – नाईकांकडेही. समारंभ खूप वेळ चालतो. एरवी घराचे मालक असणारे मधूचे बाबा त्या संध्याकाळपुरते घराबाहेर. मधूची आई सगळ्यांची रितीने ओटी भरते , विचारपूस करते. सगळ्या बायकांच्या नजरेत तिच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. आईची एक नजर अर्थातच दाराकडे. सगळ्या येऊन गेल्या ; पण नाईक बाई नाहीत. शेवटी खूप उशीरा सासू नि सून आपल्या बग्गीतून हजर होतात. मधूच्या छोट्याशा घरातल्या सजावटीने , आदबशीर , घरंदाज आतिथ्याने भारल्यासारख्या होऊन जातात. भरपूर मोठी ओटी भरून घेताना नाईक सूनबाई इतकेच म्हणते “तुमच्याकडे होते होय हळदीकुंकू ? मला कल्पना नव्हती.” दोघी निघतातच.
बग्गीत सून बसलेली असताना सासू क्षणभर आईपाशी येते नि म्हणते : बाई, मनात तळपट धरू नकोस. आता माझं राज्य नाही घरात. नवीन माणसं आली. मी झाल्या प्रकाराने लाजलेले आहे. जमेल तेव्हा याची भरपाई करेन. यावर मधुची आई जे म्हणते ते अगदी साधेच – पण सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे. ते सांगते : ” मी तर झाला प्रकार केव्हाच विसरले. मला त्याचे काहीच महत्त्व नाही. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. ” दूर अंधारात मधू हे सर्व पहातो. बग्गी हलते. वर्ष उलटते. पुन्हा चैत्र येतो. मधूच्या घरासमोर एके दुपारी बग्गीचा आवाज आल्यावर आई पटकन आत जायला वळते. मधूला सांगते : “नाईकबाई येतील. त्यांना सांग मी न्हाणीघरात आहे. जे सांगतील ते फक्त ऐक. जाताना फक्त करंडा दे कुंकवाचा त्यांना. ” मिनिटाभरात सासूबाई दारात येतातच. मधू त्यांना ठरल्याप्रमाणे सांगतो. त्या आलेल्या असतात हळदीकुंकवाचे निमंत्रण द्यायला – जातीने , सर्वात पहिल्या घराचा मान द्यायला. निरोप देतात , कुंकू लावून निघून जातात.
मधू आत येतो. आई त्याला म्हणते : “मधू , आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. ” मधूला काही उमगत नाही. माजघराच्या अंधारात उभ्या आईला म्हणतो : “म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?” आणि इतका वेळ आपल्या गंभीर , ताठ चेहर्याने वावरणार्या आईला हुंदका येतो.हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे क्रांती कानडे यांनी. आईची भूमिका केली आहे सोनाली कुलकर्णी यांनी. नाईक सासूचे काम लालन सारंग यांचे.संपूर्ण लघूपटाची हाताळणी मूळ कथेशी इमान राखणारी , त्या कथेच्या घरंदाजपणाशी इमान राखणारी झाली आहे. कुठेच भडक, बटबटीतपणा नाही. झालेला अपमान , त्याची केलेली भरपाई , सात आठ वर्षाच्या मुलावर नकळत घडलेले संस्कार या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने टिपल्यात. आई वडीलांमधील शालीन , घरंदाज स्नेहाचे चित्रण , कोसळलेल्या संकटाला धीराने सामना देताना इतरांवर आणि स्वतःवर “चिखल उडू न देण्याची ” घेतलेली काळजी आणि हे यच्च्यावत टिपणारे एक बालमन. सत्तर वर्षांपूर्वीच्या ब्राम्हणी घरातले वातावरण , पेहराव , हंड्या-झुंबरे. चित्रपटात बघायला मिळतात. लघूपटात कोठेही एकही सैल , अनावश्यक संवाद नाही.