शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धतीकडे वळावे– सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, डॉ. बाबासाहेब ठोंबरे

लातूर / माध्यम टीम : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, लातूर करिता अमेरिका स्थित एडीएम केयर या संस्थेच्या माध्यमाने सुमारे २० लक्ष रुपयेचा निधी “शेतकऱ्यांचे रासायनिक शेतीकडून एकात्मिक पद्धतीकडे टप्प्या टप्प्याने संक्रमण” या तीन वर्षीय प्रकल्पासाठी निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, डॉ बाबासाहेब ठोंबरे तर श्री. अपूर्व गर्ग, प्रमुख व्यावसायिक व कृषि प्रकल्प, एडीएम अग्रो इंडस्ट्रीज, नवी दिल्ली, कु. वनिता गुप्ता, व्यवस्थापक, व्यवसाय विकास तथा कृषि वाढ प्रकल्प आणि श्री अमोल ढवन, एडीएम अग्रो इंडस्ट्रीज, लातूर आणि वायझाक प्रा. लि. आणि डॉ. विजय भामरे, प्रकल्प समन्वयक तथा सहयोगी प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, लातूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. ठोंबरे म्हणाले की, “आज शासकीय तथा खाजगी क्षेत्राने कृषि क्षेत्राच्या उन्नतीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या स्थानिक गरजा भागविण्यासाठी एकत्रित उपक्रम राबविणे काळाची गरज झाली आहे. मराठवाड्यातील बहुसंख्य शेती ही संसाधनांच्या मर्यादेत केली जाणारी शेती म्हणून प्रसिद्ध आहे. अशातच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या नवनवीन कृषि रसायनाच्या वापरामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, त्यामुळे शेती एका बाजूला परवडत नाही तर दुसऱ्या बाजूला कृषि रसायनाच्या अविवेकी आणि अमर्याद वापरामुळे पर्यावरणातील मनुष्य प्राणी, पशुधन, पशु-पक्षी, मित्र किडी इत्यादीवर विपरीत परिणाम दिसून येत आहे. हि बाब लक्षात घेऊन कृषि महाविद्यालय लातूर यांनी या विषयावरील प्रकल्प एडीएम केयर या संस्थेला एडीएम अग्रो इंडस्ट्रीज, लातूर आणि वायझाक प्रा. लि. मार्फत सादर केला होता. या संस्थेने महाविद्यालयातील या पूर्वीच्या उपक्रमांची दखल घेत सदरील प्रकल्प मंजूर केलेला आहे. त्याबद्दल मी एडीएम केयर या संस्थेचे आभार व्यक्त करतो व हा प्रकल्प सादर केल्याबद्दल प्रकल्पाचे प्रवर्तक डॉ. विजय भामरे यांचे अभिनंदन करतो. अशा प्रकारच्या प्रकल्पाच्या आखणीसाठी वनामकृवि, परभणीचे मा.संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता, डॉ. धर्मराज गोखले आणि या महाविद्यालयाचे भूतपूर्व सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, डॉ. अंगद सुर्यवंशी यांनी जे मार्गदर्शन केले त्यासाठी मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. भविष्यात देखील अशाप्रकारच्या उपक्रमांमधून वनामकृवि, परभणी यांनी संशोधित केलेले तंत्रज्ञान मराठवाड्यातील प्रत्येक भागात प्रसारित करण्यासाठी व रुजण्यासाठी अधिकची मदत होईल अशी अशा व्यक्त करतो.” कार्यक्रमावेळी श्री. अपूर्व गर्ग म्हणाले कि, “वनामकृवि, परभणी आणि कृषि महविद्यालय, लातूर यांनी केलेल्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय तर आहेच परंतु सर्वांना सुपरिचित देखील आहे. कृषि महाविद्यालय, लातूर यांच्या या प्रकल्पाच्या निष्कर्षांचा कृषि क्षेत्रातील शेतकरी आणि विद्यार्थी यांना नक्कीच फायदा होऊन येत्या काळात या प्रकल्पाची दखल समाजातील विविध माध्यमे देखील आवर्जून घेतील अशी अपेक्षा करतो व या प्रकल्पासाठी शुभेच्छा देतो”. कु. वनिता गुप्ता ह्या म्हणाल्या की “संयुक्त राष्ट्र संघटनेच्या १७ शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन सदरील प्रकल्पाची आखणी केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमाने काही उद्दिष्टांची पूर्ती होण्यास मदत होईल अशी अशा वाटते”.
याप्रसंगी, श्री. अमोल धवन यांनी प्रकल्पा विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय भामरे तर आभार प्रदर्शन डॉ. ज्योती देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. आनंद कारले, डॉ. भागवत इंदुलकर, डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ. विलास टाकणखार, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. प्रभाकर अडसूळ, डॉ. दयानंद मोरे, डॉ.ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ.सुनिता मगर, प्रा.ममता पतंगे तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
