

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, प्रसिद्ध लेखिका डॉ. शैला लोहिया तुमच्या-आमच्या “भाभी” या २४ जुलै २०१३ रोजी आपल्या सर्वांमधून निघून गेल्या असल्यातरी आज ही त्यांच्या स्मृती सतत आपल्या आवती-भोवती दरवळत असल्याची जाणीव सतत होते. त्या जावून आज नवू वर्षाचा कालावधी लोटला असला तरी आजही त्या आपल्या सोबतच आहेत असे वाटते. ही जाणीव निर्माण होणे, त्या सतत आपल्या सोबत आहेत असे वाटणे याचे कारण त्यांनी जनसामान्यात राहून समाजातील तळागाळातील घटकांसाठी केलेले कार्य, समाज, साहित्य-कला-सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचा वावर आणि आपणा सर्वांवर केलेले प्रेमच आहे.
प्राचार्या सौ. शैला लोहिया यांची ओळख जेष्ठ लेखिका, महिला चळवळीतील, राष्ट्र सेवादलातील अग्रगण्य कार्यकर्त्या या सर्वांच्या पलिकडे जावून त्या ख-या अर्थाने त्या “मनस्विनी” होत्या अशीच करावी लागेल.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या सोबत शैला परांजपे यांनी १९६२ साली अन्तर जातीय विवाह केला आणि त्याच्या जीवनाला एक वेगळा आयाम मिळाला. डॉ. लोहिया आणि सौ. शैला या दांम्पत्यांनी राष्ट्र सेवादलात काम करीत असतांनाच महिलांच्या प्रश्नांच्या सोडवण्यासाठी १९८४ साली “मनस्विनी महिला प्रकल्पा” ची सुरुवात केली. त्यांनी “मनस्विनी” च्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल राज्य, केंद्र शासनासह अनेक सामाजिक संस्थांनी घेवून त्यांना विविध पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान ही केला.
घरातील आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी १९७० साली प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. सौ. शैला लोहिया या उत्कृष्ठ अध्यापन आणि कार्यकुशल प्रशासनाच्या जोरावर प्राचार्या म्हणून सेवानिवृत्त झाल्या.
एक उत्कृष्ट प्राध्यापक, प्राचार्या, उत्तम लेखिका-कवयत्री या सोबतच समाजातील पिडीत महिलांच्या उत्थानासाठी सतत प्रयत्नरत असलेली कार्यकर्ती, सशक्त अभिनेत्री, एक कुटुंबवत्सल पत्नी आणि आई अशा विविध भुमिका लिलीया पध्दतीने हाताळण्याची खूबी सौ. शैला लोहिया यांच्या मध्ये होती.
प्राचार्या सौ. शैला लोहिया यांनी महिलांच्या प्रश्नावर सतत विपुल लिखाण केले. १९८२ ला त्यांनी लिहीलेल्या “जगावेगळा संसार” या कादंबरीस राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला. त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये “सात रंग सात सूर”, “जगा वेगळा संस्कार”, “इत्ता इत्ता पाणी”, “बाबाचा प्रासाद”, “सुखाची वाट” आणि “होयीन मी स्वयंसिद्धा” या सहा कादंब-या, “वाहत्या वाऱ्यासंगे”, “मनतरंग”, “रून झुनत्या पाखरा”, “गजा आडच्या कविता”, “देश-परदेश प्रवास वर्णन”, “तिच्या डायरीतील पाने” आणि “स्वरांत” हे ललित साहित्य आणि अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
सामाजिक, सांस्कृतिक आणि विशेषतः स्त्रीयांच्या प्रश्नांविरुध्द शेवटच्या श्वासापर्यंत झगडून महिलांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अंबाजोगाई शहराची ओळख सर्वदुर पोहंचवणा-या प्राचार्या सौ. शैला लोहिया उर्फ तुमच्या-आमच्या सर्वांच्या “भाभीं” ना स्मृतीदिनानिमित्त भावपुर्ण अभिवादन…
सुदर्शन रापतवार, अंबाजोगाई.