नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी केला ट्रॅक्टर मधुन दौरा
महसुल व पोलीस प्रशासनाची नवी पावुल वाट!


औरंगाबाद / अतीवृष्टी झालेल्या आणि नाशिक येथुन नाथ सागर धरणात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणा-या पाण्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नदी काठच्या पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तालुक्यातील गावांतील लोकांना सतर्कतेच्या सुचना देण्यासाठी औरंगाबाद चे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा पोलीस प्रमुख मनीष कलवानिया यांनी संयुक्तपणे ट्रॅक्टर मधुन दौरा केला असून महसुल व पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या या नव्या पावुल वाटेची जोरदार चर्चा होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात होणारा संततधार पावुस आणि नाशिक येथील धरणातुन पैठण येथील नाथसागरात सोडण्यात येणारे पाणी यामुळे नाथ सागर केंव्हाही भरले जाण्याची शक्यता आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, वैजापुर, गंगापुर या तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गिवांना पुर सदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सदरील शक्यता गृहीत धरुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा पोलीस प्रमुख मनीष कलवानिया यांनी स्वतः आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना ट्रॅक्टर मधुन दौरा करुन भेटी दिल्या.
” पिण्याचे पाणी, रस्ता, पूल, वीज, शेती, पशुधन आदींबाबत शिंदेवस्तीतील ८० वर्षीय एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ गागरे, जगन्नाथ शिंदे, बाळू शिंदे, धोंडीराम शिंदे यांच्याशी चव्हाण यांनी संवाद साधला. गोदावरीला आलेल्या पाण्यामुळे गावाला पाण्याचा वेढा पडतो. तेव्हा गावातील ट्रॅक्टर, पिकअपचा आधार घेऊन गावकऱ्यांना वांजरगाव येथे जावे लागते, असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. गावात ४९ कुटुंबातील ३८० लोकसंख्या असून आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी यावेळी सांगितले. शिंदेवस्तीला भेट दिल्यानंतर वैजापूर-गंगापूर पुलाची पाहणीही चव्हाण यांनी केली. तसेच सरला बेट येथेही भेट देत रामगिरी महाराज यांच्याशी गोदा पात्रातील येवा आणि पूरस्थितीबाबत चर्चा केली.” पाहणी दरम्यान उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गंगापूर तहसीलमध्ये आढावा गंगापूर तहसीलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. गंगापूर तालुक्यातील संभाव्य पूरग्रस्त गावे आणि आपत्ती व्यवस्थापनसंबंधी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती उपविभागीय अधिकारी आहेर, तहसीलदार सतीश सोनी यांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना दिली. यावेळी तहसील कार्यलयातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण कक्षास भेट देत आवश्यक त्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
“वैजापूर तालुक्यातील वांजरगावपासून अडीच किलोमीटर अंतरावरील शिंदेवस्तीत पाऊस आणि पुरामुळे रस्ता खराब होतो. या रस्त्याने वांजरगावहून ट्रॅक्टरच्या साहाय्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया जाऊन शिंदे वस्तीत ग्रामस्थांची भेट घेतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्या सोडविण्याची ग्वाही देतात. पुरामुळे पाण्याचा वेढा येणाऱ्या या वस्तीत चक्क स्वतः जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक शिंदेवस्तीत येऊन ग्रामस्थांशी संवाद साधतात. त्यामुळे शिंदेवस्तीयांमध्ये आनंदासह समाधान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.