यमुना नदीत बोट उलटली; २० जणांचा बुडून मृत्यू


लखनौ : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात गुरुवारी मोठा अपघात झाला. यमुना नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. बोटीमध्ये 35 ते 40 लोक होते असे सांगण्यात येत आहे. 2 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर 20 हून अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. उर्वरितांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.


फतेहपूरहून मार्काच्या दिशेने येणारी प्रवाशांनी भरलेली बोट ठाणा मार्का परिसरात यमुना नदीत उलटली. अपघातानंतर घटनास्थळी एकच हल्लकल्लोळ झाला. पोलीस अधीक्षक बांदा व इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात गोताखोर, बोटी आदींच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.


मुख्यमंत्र्यांनी दिले मदतीचे निर्देश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांदा येथील यमुना नदीत बोटीच्या दुर्घटनेसंदर्भात जिल्हा प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या.