मराठवाडा मुक्ती संग्रामापुर्वीची अंबाजोगाई; एक दृष्टिक्षेप!
Ambajogai before the Marathwada Liberation War; A look!




मराठवाडा मुक्ती संग्राम होण्यापुर्वी पासुनच अंबाजोगाई शहराला तसे मोठे एतिहासिक महत्त्व आहे. मुक्तीसंग्रापुर्वी अस्तित्वात असलेल्या हैदराबाद संस्थानात हा भाग यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला मराठवाडी असे म्हटल्या जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा असल्यामुळे इस १८६०-१९०० या चाळीस वर्षाच्या कालावधीत या शहरात ब-याच एतिहासिक वास्तु निर्माण करण्यात आल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तु शंभरीपुर्ण करुन गेल्या आहेत. तर अनेक जुन्या वास्तुंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या देखण्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र अंबाजोगाई हा त्याकाळी जिल्हा असल्यामुळे आणि निजाम सरकारच्या सैन्यदलाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तु, समाध्या, मंदीरे, मस्जिद, ख्रिश्चन स्मशानभूमी, सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापुर्वीची साक्ष देत आज ही दिमाखात उभ्या आहेत. या एतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे.
अंबाजोगाई शहरावर आणि हैदराबाद संस्थानवर जवळपास सव्वादोनशे वर्षे निजामाची सत्ता होती असा इतिहास सांगतो. तसे पाहीले तर हैदराबाद संस्थान चा विस्तार हा आज अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यातील कांही प्रदेशावर होता. यात महाराष्ट्रातील संपुर्ण मराठवाडा, कर्नाटकातील बीदर, रायचुर, गुलबर्गा आणि आंध्रप्रदेशातील आदिलाबाद, करीमनगर, निझामाबाद, वरंगल, हैदराबाद, कलगोंडा आणि अलफ ई बल्र्दा यांचा समावेश होता.
साधारणतः ३१ जुलै १७२४ ते १७ सप्टेंबर १९४८ अशी सलग २२५ वर्षे हे हैदराबाद संस्थान अस्तित्वात होते. मराठवाडा, गुलबर्गा आणि हैदराबाद या संस्थानचा कारभार पाहण्यासाठी तीन स्वतंत्र निझामांची नियुक्ती करण्यात येत असत आणि या तीनही विभागावर नियंत्रण हैदराबाद येथून पंतप्रधान करीत असत.


१८६० च्या दशकाच्या काळात हैदराबाद संस्थानचे पंतप्रधान म्हणून सालारजंग हे काम पहात असतांना त्यांनी या संस्थानच्या विकासाच्या दृष्टीने अनेक विकासात्मक कामे केली. विशेषतः हैदराबाद संस्थानमधील विभागात आज ज्या ऐतिहासिक वास्तु दिमाखाने उभ्या आहेत, त्या सर्व पंतप्रधान सालारजंग यांच्याच कार्यकाळात झाल्या असल्याचे सांगितल्या जाते. या कालावधीत मराठवाडा विभागावर मीर महेबुब अली हा सहावा निजाम हा १८६१ ते १९११ या कालावधीत काम पहात होता. अंबाजोगाई शहरात आज उभ्या असलेल्या आनेक दिमाखदार इमारती याच कालावधीत निर्माण करण्यात आल्या असल्याचे सांगितले जाते.
हैदराबाद संस्थानविरोधात विरोधात १९३८ पुर्वी चाळीसएक वर्षांपूर्वी पासून लोकजागृतीच्या माध्यमातून बंड उभे करण्याची चळवळ सुरु करण्यात आली होती. मात्र या चळवळीला खरी सुरुवात १९३८ साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली. १९३८ ते १७ सप्टेंबर १९४८ अशी सलग १० वर्षे ही हैदराबाद मुक्ती संग्रामाची चळवळ चालली. १९३८ पुर्वी या चळवळीचे नेतृत्व लोकमान्य टीळकांनी केले होते. अंबाजोगाई येथे लोकमान्य टीळकांचे समर्थक भाऊसाहेब चौसाळकर, नारायणराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली भगवानराव पुराणीक, डॉ. व्यंकटराव जोशी, रघुनाथराव नागापूरकर, किशनराव कुर्डुकर, राम कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वदेशीच्या चळवळी सुरु केल्या होत्या.


लोकमान्य टीळकांच्या निधनानंतर या चळवळीचे नेतृव पुढे महात्मा गांधी यांनी स्विकारले. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईत या चळवळीची खरी सुरुवात झाली ती स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या उपस्थितीतील १९३५ साली योगेश्वरी मंदीर परीसरातील शाळेच्या प्रांगणात “परदेशी कपड्यांची होळी” या उपक्रमाने. पुढे स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, नृसिंह राव भातांब्रेकर, रावसाहेब देशमुख, आचार्य ग. धो. देशपांडे, व्ही. डी. देशपांडे, श्रीनिवास खोत, धोंडीराम पवार, वामनराव ठाकूर, अँड. आर. डी. देशपांडे, चंदुलाल बिहारीलाल गुप्ता, राम मुकद्दम, अशा नव्या लोकांनी ही चळवळ पुढे नेली.
हैदराबाद संस्थानात या काळात मराठी, तेलगु आणि कन्नड या तीन भाषा बोलणारे हिंदु नागरीक हे ८५ टक्के होते तर मुसलमानांची संख्या फक्त १५ टक्के होती. निजाम राजवटीमुळे या १५ टक्केच मुसलमानांना सरकारी नौकरीत ८० टक्के जागा होत्या. एवढेच नव्हे तर ८५ टक्के हिंदुंच्या शिक्षणासाठी फक्त उर्दु ही एकमेव भाषा होती. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे बंड हे तसे दुहेरी बंड होते. हैदराबाद संस्थानवर राज्य करणारा निजाम हा पहिला शत्रु तर हिंदुस्थानावर राज्य करणारा ब्रिटीश हा दुसरा शत्रु असे हे दुहेरी बंड होते.


मराठवाडा विभागातील अंबाजोगाई त्याकाळी मोमीनाबाद म्हणून ओळखल्या जायची. या ठिकाणी निजाम सैन्यदलाचा तळ असल्यामुळे त्याकाळी या विभागाला जिल्ह्याचा दर्जा होता. त्यामुळे साहाजिकच या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी मोठमोठ्या कार्यालयीन इमारती, सैन्यदलातील अधिका-यांना राहण्यासाठी निवासस्थाने, पोहण्यासाठी तलाव, गोळीबारचा सराव करण्यासाठी बंकर, दळणवळण व्यवस्थेसाठी पोस्ट आँफीस, आपसी तंटे मिटवण्यासाठी जिल्हा न्यायालय, घोडदळासाठी स्वतंत्र तळ, घोड्याच्या निवासासाठी स्वतंत्र बंकर, घोड्याच्या देखभाल आणि उपचारासाठी स्वतंत्र दवाखाना, पोलीस स्टेशन, पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अशा कितीतरी सोयी-सुविधा या ठिकाणी करुन ठेवण्यात आल्या होत्या. यापैकी अनेक वास्तु मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीच्या खुणा दाखवत आजही दिमाखाने उभ्या आहेत.
जुन्या अंबाजोगाई (मोमीनाबाद) या शहरात निजाम सैन्यदलाचे तळ असल्यामुळे या गावाला तसे विशेष महत्त्व होते. या सैन्यदलाच्या देखभालीसाठी, विशेषतः कोणी परकीय शत्रु या तळावर चाल करुन येतो का याची टेहाळणी करण्यासाठी या शहराच्या मध्यभागी प्रचंड महाकाय बुरुज बांधण्यात आला होता. या बुरुजावर जावून टेहाळणी करण्यासाठी बुरुजाच्या मध्यभागी पाय-यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढे हैदराबाद संस्थानमध्ये त्याकाळी होणाऱ्या प्रमुख घटना समजण्यासाठी १९४२ साली
इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावल्यानंतर या बुरुजावर एक मोठा रेडिओ ठेवण्यात आला. दररोज सायंकाळी या रेडिओ वरुन हैदराबाद संस्थानमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती निजाम राजवटीतील प्रमुख केंद्र असलेल्या हैदराबाद येथून दिली जायची. निजाम सरकारातील सैन्यदलातील अधिकारी, निजाम संस्थानचे कर्मचारी व प्रमुख जनतेला या घडामोडी ऐकण्यासाठी परवानगी असायची. हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा तीव्र झाल्यानंतर हे रेडिओ चे केंद्र उध्दवस्त करण्यासाठी त्याकाळी धोंडीराम पवार, वामनराव ठाकुर, श्रीनिवास खोत व त्यांच्या इतर सहका-यांनी उठाव केला व हे केंद्र नष्ट केल्याचा उल्लेख मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासात आहे.


अंबाजोगाई शहरात त्या काळी इ.स. १८१३ ते १९४८ या कालावधीत हैदराबाद संस्थानच्या रक्षणासाठी निजामाने आपल्या सैन्य दलाची व्यवस्था एकदम चोख आणि नियोजनबद्ध ठेवली होती. या सैन्यदलाला “हैदराबाद काँन्टिजेंट” या नावाने ओळखल्या जात असत. या काँन्टिजेंट मध्ये ५०० घोडदळ आणि पायदळाचे सैन्य असे. आज ज्या परीसरात स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय अध्यापक महाविद्यालय, कृषी महाविद्यालयाची इमारत, फालोअर्स क्वार्टर, चांदमारी, कंपनी बाग, जनावरांचा दवाखाना परीसर या संपुर्ण परीसरात निजाम सैन्यदलाचे भरती केंद्र, प्रशिक्षण केंद्र, रेसिडेंट विभाग अशी विभागवार आखणी करण्यात आली होती. आज अस्तित्वात असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीसरात घोडदळ, शासकीय अध्यापक महाविद्यालय परीसरात अधिका-यांची निवाससस्थाने, फालोअर्स क्वार्टर विभागात सैनिकांची घरे, चांदमारी परीसरात बंकर (फायरींग प्रशिक्षण केंद्र), जनावरांच्या दवाखाना परीसरात स्वतंत्र घोड्यांचे हाँस्पिटल, ब्रिटीश अधिका-यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी स्वतंत्र ख्रिश्चन स्मशानभूमी तर कंपनी बाग परीसरात आधिका-यांसाठी स्वतंत्र आद्दयावत स्विमिंग टँक आणि अधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या विरंगुळ्यासाठी स्वतंत्र बाग अशी ही रचना होती.


निजाम राजवटीत सुध्दा सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी १८८४ साली सर्वप्रथम येथे न्यायालय सुरु करण्यात आले होते. खोलेश्वर मंदीरातील सभागृहात सुरुवातीला हे न्यायालय चालवले जात असे. या न्यायालयास जिल्हा न्यायालयाचा दर्जा होता. या न्यायालयात त्यावेळी ४१२ खेड्यांची प्रकरणे चालत असत. या न्यायालयासाठी याच काळात एक स्वतंत्र इमारत बांधण्यात आली होती. अनेक दरवाजे असलेल्या या इमारतीचे वैशिष्ट्य असे होते की, आतुन कोणत्याही दरवाजापासून बंद करण्यास सुरुवात केली तरी फक्त एकच दरवाजा बाहेरील कुलूप लावण्यासाठी उघडा रहायचा. याच इमारतीत पुढे सरकारी न्यायालयाचे कामकाज चालले. पुढे ही इमारत २०१२ साली या ठिकाणी स्वतंत्र नवी इमारत बांधण्यासाठी पाडण्यात आली.
अंबाजोगाई येथे त्याकाळी निजाम सरकारची महत्वाची कार्यालये होती. या सर्व कार्यालयांचा व्यवहार सुरळीतपणे चालावा, वरीष्ठ व कनिष्ठ कार्यालयाशी ही सर्व कार्यालये पत्रव्यवहाराच्या माध्यमातून जोडली जावीत म्हणून याठिकाणी १८९८ साली पोस्ट कार्यालयाची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली होती. अंबाजोगाई शहरातील पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, सबजेल, हायस्कुल, पब्लिक क्लब, बीअँडसी कार्यालयाची इमारत या देखण्या इमारती ही साधारण याच कालावधीत बांधण्यात आल्या असल्याचे सांगितले जाते.


निजाम काळात अंबाजोगाई हे तसे महत्त्वाचे शहर होते. १८४८ साली या गावची लोकसंख्या तशी वीस हजाराच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. या गावातील प्रत्येक विभागात पाण्याचे स्वनिर्मित साठे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. सैन्यदलाचे तळ असलेल्या विभागात तर दोन मोठी तळे आणि जवळपास वीस विहिरी असा प्रचंड पाणीसाठा या विभागात होता. याशिवाय जुन्या शहरातील प्रत्येक विभागात प्रत्येक मंदीराजवळ स्वतंत्र चार-दोन कुंड आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र तीर्थांचीही सोय असायची. पाण्याचे योग्य नियोजन निजाम काळातील अंबाजोगाईत होते याची बरीच उदाहरणे देता येतील.
निजाम हा धर्माने सुन्नी मुसलमान होता. त्या काळातील जातनिहाय आकडेवारीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेला आहे. मुस्लिम ११टक्के, दलित १८टक्के तर हिंदु ७१ टक्के अशी ही संख्या होती. असे असल्यामुळे निजामाने राज्यात सर्वधर्मसमभावाचे धोरण त्याकाळी राबविले होते.


नधर्मांतराची मोहीम निजामाने राबवल्याचा उल्लेख सापडत नाही, तसेच हिंदुचे एकही देवस्थान त्यांनी पाडले असल्याचा उल्लेख नाही. उलट अनेक हिंदुदेवस्थानासाठी निजामाने आर्थसाह्य केल्याचा उल्लेख आढळतो. शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी तर जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेण्यांच्या संरक्षणासाठी १९१४ साली स्वतंत्र पुराण वस्तु संशोधन खात्याची निर्मिती ही केल्याचा उल्लेख आहे. डॉ. मजदानी हे या विभागाचे प्रमुख होते आणि यांच्याचकडे अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी मंदिर, खोलेश्वर मंदिर, हत्तीखाना, मुकुंदराज समाधी मंदिर, संकलेश्वर मंदिर, दासोपंत समाधी, जुन्या शहरातील गणेश मंदिर यांचा समावेश होता. निजामाने हिंदु देवतांचा आदर करीत सांस्कृतिक जीवनाचा मौलिक ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न केले.
१९३८ साली सुरु झालेली मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ १९४८ साली अंतीम टप्प्यात आली आणि १८ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्यदलाला जेंव्हा पोलीस अँक्शन करण्याचे आदेश मिळाले तेंव्हा भारतीय सैन्य दलात आणि निजाम सैन्य दलात लढाई होईल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्यावेळी अंबाजोगाई केंद्रावर नियंत्रण ठेवणारे निजाम राजवटीतील डेप्युटी कलेक्टर नझर अली रझवी यांनी समयसुचकता दाखवत सैन्य दलातील अधिकारी आणि शहरातील जबाबदार नागरिक यांची तातडीने एक बैठक बोलावून संपुर्ण परिस्थितीची कल्पना दिली आणि आपण त्यांच्याशी लढलो तर विनाकारण रक्तपात होईल तेंव्हा भारतीय सैन्यास प्रतिकार न करता पांढरे निशान दाखवून शरणागती स्विकारावी असे सर्वानुमते ठरवून भारतीय सैन्यासमोर स्वतः कँप्टन रझवी यांनी निजाम राजवटीतील सर्व सैन्यदलासोबत शरणागत पत्करली. कँप्टन नझर अली रझवी यांच्या पुढाकाराने आणि समंजसपणामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाची ही चळवळ कसल्याही प्रकारचा रक्तपात न होता अंबाजोगाई येथे थांबली.
मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ संपून आज जवळपास ७५ वर्षाचा कालावधी पुर्ण होतो आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामापुर्वीच्या १८६० ते १९०० या चाळीस वर्षाच्या कालावधीत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या माध्यमातून या काळातील अनेक आठवणी अंबाजोगाईकरांच्या मनात आजही घर करुन आहेत. या एतिहासिक इमारतींचे जतन होणे गरजेचे आहे.
सुदर्शन रापतवार/अंबाजोगाई.
sudarshanrapatwar@gmail.com