महाराष्ट्र

जमिनीवर सरपटत पुर्ण केली सप्तपदी; दिव्यांग जोडप्याच्या लग्नाची जगावेगळी गोष्ट

नाशिक / दोन तरूण व्यक्तींमधील मैत्री त्या मैत्रीचं आधीत प्रेमात आणि नंतर लग्नामध्ये रूपांतर झाल्याच्या गोष्टी आपल्या सभोवती अनेकदा घडतात. जालिंदर सापनार (Jalindar Sapner) आणि सारिका रणपिसे (Sarika Ranpise) या नाशिक जिल्ह्यातील जोडप्याचाही नुकताच प्रेमविवाह झालाय. त्यांचा प्रेमविवाह साधा नाही. ही दोघंही जन्मत: दिव्यांग आहेत. त्यातच दोघांचीही परिस्थिती साधारण, लग्नाला घराच्यांचा विरोध होता. पण दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. या प्रेमापुढे सर्व अडथळे पार झाले आणि त्यांचं लग्न झालं. (Nashik Unique love story of divyang people)

अडीच अक्षरे प्रेमाची..

जालिंदर मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील उजनीचा. तर सारिका ही पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वापागावची राहणारी आहे. ही दोघंही दिव्यांग आहेत. त्यांना चालता येत नाही. त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी ग्रामीण अपंग केंद्र टाकळी ढोकळेश्वरमध्ये पाचवी पासून शिक्षणासाठी पाठवलं होतं. पाचवीमध्ये शिकत असतानाच दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.

हे दोघंही एकमेकांना मदत करत असतं. परस्परांच्या सहवासातून मैत्री आणि जवळीक वाढली. हळूहळू फोनवर त्यांच्यात संभाषण सुरू झालं. हे सर्व टप्पे पार केल्यानंतर ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली. दोघांनाही आपल्या अंपगात्वाबाबत माहिती होती. त्यामुळे एकमेकांना समजून घेत त्यांच्या प्रेमाची वाटचाल सुरू झाली.

ही वाटचाल सोपी नव्हती!

जालिंदर आणि सारिका एकमेकांच्या प्रेमात पडली होती. त्याचबरोबर त्यांना शिक्षणही पूर्ण करायचं होतं. बारावी झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. त्यावेळी जालिंदर २२ वर्षांचा तर सारिका १८ वर्षांची होती. थोडी वाट बघावी लागली तरी चालेल पण आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये लग्न करू असा त्यांचा निश्चय होता.
लग्न करण्यासाठी घरच्यांची परवानगी घेण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. त्या बिकट परिस्थितीमध्ये सारिकानं पुढाकार घेतला. तिनं तिच्या आई-वडिलांकडं लग्नाची परवानगी मागितली. ‘मला जालिंदरसोबत लग्न करायचं आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखते. आम्ही दोघं एका वर्गात होतो. जालिंदरही माझ्यासारखाच आहे. त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे,’ असं सारिकानं तिच्या आई वडिलांना सांगितलं. सारिकाच्या आई-वडिलांचा या लग्नाला विरोध होता. त्यांनी सारिकाला शिक्षण बंद करण्याचा इशारा दिला. एकिकडं कुटुंबीयांचा विरोध तर दुसरिकडं जालिंदरच्या प्रेमाची ओढ अशा कोंडीत सारिका अडकली. या सर्व अडचणीत जालिंदर सारिकाच्या सोबत होता. त्याच्या भक्कम पाठिंब्यामुळेच तिला धीर आला. दोघांच्या समोरचा पेच सुटला.

सरपटत पूर्ण केली सप्तपदी

‘जे होईल ते होईल, आपण आता एकमेंकाशिवाय राहू शकत नाही’ याची दोघांनाही जाणीव झाली होती. त्या दोघांनी ३० जून रोजी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर घरच्यांच्या इच्छेनुसार १८ जुलै रोजी उजनी गावात त्यांचा विवाहमोठ्या थाटामाटात पार पडला. सारिकाचे आई-वडिल या लग्नाला उपस्थित नव्हते. पण, जालिंदरच्या कुटुंबीयांनी लग्नाला हजेरी लावत नव्या जोडप्याला आशिर्वाद दिले.
जिद्द आणि चिकाटी असली की सारं काही मिळतं, असं म्हणतात. जालिंदर-सारिकाकडं या जोडीला परस्परांच्या प्रेमही होतं. त्यामुळे त्यांनी हा खडतर प्रवास पूर्ण केला. ‘तुम्हाला चालता येत नाही, तुम्ही सप्तपदी घेऊ नका,’ असा सल्ला त्यांना लग्नाला उपस्थित असलेल्या मंडळींनी दिला. पण, त्यांनी एकमेकांच्या साथीनं सरपटत सप्तपदी पूर्ण केली.

दिव्यांग जोडप्याला मदतीची गरज

दोघांच्याही घरची परिस्थिती बेताची आहे. आई-वडील मोलमजूरी करतात. जालिदंरचे भाऊ देखील दिव्यांग आहेत. त्यांनाही चालता येत नाही. चप्पलचा आधार घेत सपरटत चालतात. या दोघांना दिव्यांग असल्यानं काम करण्याला मर्यादा आहेत. तसंच त्यांना त्यांचं शिक्षण देखील पूर्ण करायचं आहे. या जोडप्याला नव्या संसारासाठी सरकारनं मदत करावी अशी मागणी समाजसेवक दत्तू बोडके यांनी केली आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker