महाराष्ट्र

नांदेड;मृत्युच्या थैमानास जबाबदार कोण स्थानिक प्रशासन की राज्य प्रशासन?

नांदेड येथील पद्मश्री शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यू चे तांडव संपता संपत नाही. १२ तासात २४ मृत्यूची बातमी येवून धडकते ना धडकेत तोच २४ तासात ४८ मृत्यू झाल्याची बातमी येवून धडकली आहे. त्यातच (कार्यतत्पर?) असलेल्या विद्दमान खासदारांचा संताप अनावर झाल्याने चक्क अधिष्ठाता यांनाच टॉयलेट साफ करायला लावण्याचा विश्व विक्रम केला आहे. २४ तासात ४८ मृत्यू आणि कार्यतत्पर खासदारांचे हे विश्वविक्रमी प्रताप याबद्दल सामान्य नागरिकांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मृत्यूंच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे


नांदेड येथील पद्मश्री शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे गेली दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या नकाशावर आहे. २४ तासात ४८ मृत्यू झाल्याच्या बातमीने संपुर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या ४८ मृत्यू पैकी १६ मृत्यू हे नवजात बालकांचे मृत्यू आहेत, ही संतापजनक घटना आहे.
नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एवढे मृत्यू ही अतिशय संतापजनक आणि वैद्यकीय क्षेत्रातील काळीमा फासणारी बाब असली तरीही हे मृत्यू का झाले? त्यांच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे, तो सहसा कोणी घेत आहे असे दिसून येत नाही.

अतिदक्षता विभागात २४ शिशूंची क्षमता ६५ शिशूंवर उपचार!


या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग निदान व उपचार विभागातील नवजात शिशूंसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग (वॉर्मरुम) ची व्यवस्था आहे. या रुममध्ये कमी वजन असलेल्या नवजात शिशूंवर उपचार करण्यात येतात. या अतिदक्षता कक्षात फक्त २४ अत्यवस्थ शिशूंवर उपचार करण्याची सुविधा आहे. उपलब्ध अधिकृत माहिती नुसार हे मृत्यूचे तांडव सुरू झाले तेंव्हा २४ शिशूंवर उपचार करण्याची क्षमता असलेल्या या कक्षात ६५ नवजात बालकांवर उपचार सुरु होते. नवजात शिशूंसाठी असलेल्या एका छोट्याशा कॉटवर तीन-चार मुले ठेवून किंबहुना या कक्षातील रिकाम्या जागेवर बेड टाकून त्यांचेवर उपचार सुरु होते. अशा परिस्थितीत एका वेळेस एकाच शिशूंला म्हणजे फक्त २४ शिशूंला वॉर्मिग ची सुविधा मिळणार मग बाकीच्या ४१ शिशूंना ही सुविधा कशी मिळणार? २४ शिशूंवर उपचार करण्यासाठी नियुक्त केलेला स्टाफ ६५ शिशूंवर उपचार कसा करणार? याच वेळी या अतिदक्षता विभागात जंतुसंसर्ग झाला असल्याची ही चर्चा आहे. या सर्व बाबींचा विचार वैद्यकीय प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी करायला हवा.

राज्यातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहे अशीच अनास्था


ही अवस्था एकट्या नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहे असे नाही. राज्यातील जवळपास २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही परिस्थिती आहे.
एक तर सुरुवातीच्या काळात ५० विद्दार्थी क्षमता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या १५० ते २०० जागांवर नेवून ठेवली. या बदलत्यात राज्यशासनाने ना प्राध्यापकांच्या जागा वाढवल्या ना कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या! जागा वाढवायचे सोडा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इंन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही काही बदल केले नाहीत. एखाद्या कोंडवाड्याप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था झाली आहे. राज्यातील या २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अर्धाधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. रुग्णालयात औषध-गोळ्यांचा पत्ता नाही. रक्त, लघवी,थुंकला व इतर तपासण्या तर जवळपास बंदच झाल्यात जमा आहेत. एक्स रे, सोनोग्राफी, एमआयआर, सी. टी. स्कॅन, डायलिसिस या महागड्या मशीनतर जवळपास बंदच आहेत. या मुलभूत सोयी फक्त बीले पास करुन कमिशन खाण्यासाठीच करण्यात येतात का असा प्रश्न पडावा या सारखी परिस्थिती आहे.

त्रिसदस्यीय चौकशी समिती कोणाचा बळी घेणार?


नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या मृत्यू तांडवाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी डॉ. भारत चव्हाण, डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य आणि डॉ. जोशी या तीन तज्ञांची स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. ही समिती वर उपस्थित केलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचं गांभिर्य लक्षात घेऊन आपला अहवाल देईल का? की राजकीय लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी अधिष्ठाता आणि विभागप्रमुखांचा बळी घेईल, हे ही पहावे लागेल.


प्रत्येक गावात असलेली एखादी मोठ्या शासकीय संस्थेवर विद्दमान लोकप्रतिनिधींचा सतत अंकुश असणे हे अशा गोष्टी टाळण्यासाठी खुप आवश्यक आहे. गावातील ही शासकीय मोठी संस्था ही गावातील आणि परिसरातील लाखो लोकांच्या सुविधासाठी शासनाने निर्माण केलेली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा योग्य पध्दतीने चालवण्यासाठी शासन त्यावर प्राधिकृत अधिकारी नेमले, त्या अधिका-यापेक्षाही ही शासकीय यंत्रणा योग्य पध्दतीने चालती का नाही हे पाहण्याचे काम लोकप्रतिनिधीं केले पाहिजे. ब-याच ठिकाणी लोकप्रतिनिधी अशा पध्दतीचे काम करतांना दिसून येत नाही. ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा शासकीय यंत्रणेवर अंकुश राहिलेला नसतो, त्याठिकाणी या ना त्या कारणाने असे मृत्यूचे तांडव निर्माण होते.

मृत्यूचे तांडव पुन्हा होवू नये यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री काय उपाययोजना करणार?


नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु असलेल्या या मृत्यू तांडवाच्या घटना टाळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने भेट देवून पाहणी केली. अधिका-यांना सुचना करुन हे मंत्री निघून गेले. मात्र नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अथवा राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयात असे मृत्यूचे तांडव उभा राहु नये साठी कांहीं मुलभूत उपाययोजना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ करतील का हा प्रश्न आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker