महाराष्ट्र

मराठवाडा मुक्ती संग्राम विशेष; स्वामी रामानंद तीर्थ अनासक्त कर्मयोगी!


प्रा. सागर कुलकर्णी यांचा विशेष लेख!

नुकतेच आपण भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा स्वातंत्र दिन प्रचंड उत्साहात साजरा केला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. हा अमृत महोत्सव म्हणजे वर्षभर चालणारा उत्साहाचा सण आहे. निजामाच्या जुलमी सत्तेविरुद्ध लढलेल्या ज्ञात अज्ञात अशा वीरांचे वीर पुरुषांचे कृतज्ञ स्मरण आपण यावर्षी करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. या देशातील तरुण पिढ्यांना आपल्या राष्ट्रपुरुषांबद्दल योग्यपणे सांगितले जात नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. असं आपले पंतप्रधान एका भाषणामध्ये म्हणाले होते. आणि खरोखरच त्यातही विशेषतः मराठवाडा मुक्ती संग्राम, मुख्यत्वे स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या असंख्य सहकारी, स्वयंसेवक, कार्यकर्ते त्यांच्या विचारांचे अनुयायी, अनेक धुरंधर नेते, वकील मंडळी, शिक्षक मंडळी यांच्याबद्दल आजची तरुण पिढी अपरिचित आणि अनभीज्ञ आहे . स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचे कृतज्ञ स्मरण करून तरुणांपर्यंत अतिशय सोप्या पद्धतीने या सर्वांचे कार्य आपण पोहोचवले पाहिजे. त्यांच्या कार्याची ओळख करून देणे हे मला अतिशय गरजेचे वाटते त्यासाठीच हा लेखन प्रपंच.


स्वामी रामानंद तीर्थ हे खरे तर एक कर्मयोगी संन्यासी होते. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यामध्ये सांगितलेला अनासक्त कर्मयोग आपल्या आयुष्यभर आचरणात आणणारे स्वामी रामानंद तीर्थ हे खरोखरच कर्मयोगी संन्यासी होते. स्वामी रामानंद तीर्थ हे विज्ञाननिष्ठ एक महान शिक्षक होते. हैदराबाद म्हणजेच तत्कालीन मराठवाडा राज्याचे अग्रणी स्वातंत्र्य सेनानी आणि गोरगरीब जनतेचे कैवारी. त्याच पद्धतीने निजामाच्या जुलमी सत्तेविरुद्ध बंड पुकारून लोकांना एकत्र करणारे. लोकांच्या मनातील जनसामान्याचे जननायक होते.
स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील खेडगी येथे झाला. सिंदगी या गावी त्यांचे वडील शिक्षक होते. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर हे होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण गाणगापूर येथे घेतले. तर माध्यमिक शिक्षण सोलापूर मधून पूर्ण केले. स्वामी रामानंद तीर्थ सर्वार्थाने लहानपणापासूनच विचारशील होते. अत्यंत बुद्धिमान आणि तितकेच व्यासंगी विद्यार्थी म्हणून त्यांचा शालेय जीवनापासून सर्वत्र नावलौकिक होता. त्यांनी टिळक विद्यापीठातून अनुक्रमे बीए आणि एम ए उत्तुंग यशाने पूर्ण केले होते.
स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1929 साली हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळा मध्ये मुख्याध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. हिप्परग्याची राष्ट्रीय शाळा ही लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या मूलभूत विचारांवर चालणारी शाळा होती. याच राष्ट्रीय शाळेमध्ये अध्यापन करताना त्यांनी स्वतःच्या भविष्याचा भक्कम पाया रचला. या शाळेत शिकवण्यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ यांनी राजकारण आणि लोकशाही बद्दलच्या त्यांच्या संकल्पना स्पष्टपणे मांडल्या. लोकचळवळीसाठी ,उद्याचे नेते सक्षम बनण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न स्वामीजींनी केला.


स्वामी रामानंद तीर्थ पुढे अंबाजोगाई मध्ये आले. आणि अंबाजोगाई मध्ये 1917 पासून सुरू असलेल्या योगेश्वरी शाळेमध्ये शिक्षक आणि पुढे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झाले. टिळकांनी सांगितलेल्या राष्ट्रीय शिक्षणाचा प्रचार-प्रसार करण्यात अंबाजोगाई येथील तत्कालीन विद्वान मंडळी, वकील मंडळी या शाळेत लोकविलक्षण गुणवत्तेने कार्य करत होती. स्वामीजी त्यांच्यासोबत आल्याने या कार्याला खूप मोठे बळ प्राप्त झाले. आणि ही शाळा चळवळीचे केंद्र म्हणून उदयास आली. तसेच शाळेमध्ये अनेक विधायक उपक्रम सुरू केले. त्या दिवसात हैदराबाद संस्थानावर जुलमी निजाम सातवा म्हणजेच मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. पहिला निजाम मीर कमरुद्दीन खान हा मुघलांचा राज्यपाल होता. त्याने 1724 मध्येच इथे सत्तेचा दावा केला होता. भारताला स्वातंत्र्य देताना ब्रिटिशांनी पाचशे ते सहाशे संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा अधिकार दिला होता. परंतु हैदराबादच्या निजामाने बहुसंख्य हिंदूंच्या मताविरुद्ध भारतात सामील न होता स्वतंत्र राहणेच पसंत केले होते. याचा परिणाम म्हणून भारत आणि हैदराबाद राज्य यांच्यात एक वर्षासाठी यथास्थिती कायम ठेवण्याचा करार झाला. अशा या अनिश्चिततेच्या वातावरणात स्वामी रामानंद तीर्थ यांनी जनतेला एकत्र आणण्याची आणि त्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली.

हैदराबाद संस्थान मुक्त करण्यासाठी, निजामाविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जात,धर्माचा विचार न करता राजकीय व्यासपीठांच्या संघटनावर त्यांनी भर दिला. मराठवाडा मधील लोकांची महाराष्ट्र परिषद, कर्नाटक कानडी लोकांची कर्नाटक परिषद आणि तेलगूच्या आंध्र महासभेच्या सदस्यासह हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्याची त्यांची इच्छा होती. स्वामीजींनी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखालील हरिपुरा काँग्रेसच्या बैठकीत 1937 यावर्षी काँग्रेसच्या हैदराबाद राज्य शाखेची स्थापना करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी आणि अपार मोठ्या कष्टाने हा प्रस्ताव त्या सभेमध्ये मान्य झाला. तथापि दुर्दैवाने हुकूमशाही क्रूर निजामाने राज्य काँग्रेस स्थापनेपूर्वीच या सगळ्या गोष्टींना प्रतिबंध केला.
स्वामी रामानंद तीर्थ यांनी राज्य [स्टेट] काँग्रेस स्थापन करण्यासाठी त्यांचा संघर्ष अविरत सुरू ठेवला होता. म. गांधीजींच्या प्रेरणेने सत्याग्रह आणि असहकार चळवळी, कामगार चळवळी त्यांनी सुरूच ठेवल्या होत्या. त्यामुळे त्यांना निजामाने अटक देखील केली होती.
24 ऑक्टोबर 1938 रोजी त्यांनी सुरू केलेला सत्याग्रह हा हैदराबाद राज्याच्या इतिहासातील निजामाविरुद्धचा पहिला औपचारिक निषेध आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
स्वामीजींनी जनमानसात नवीन ऊर्जा आणि प्रचंड क्रांतिकारी प्रेरणा निर्माण केली. स्वातंत्र्याच्या जाणीवा लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचे सगळे श्रेय स्वामी रामानंद तीर्थ, पूज्य बाबासाहेब परांजपे, आनंद कृष्ण वाघमारे, गोविंद भाई श्राफ यांना जाते.
कालांतराने निजामाने स्टेट काँग्रेस वरील बंदी उठवली. 1947 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद राज्य काँग्रेसचे पहिले अध्यक्ष बनले. तिथे त्यांनी निजामाविरुद्ध स्वातंत्र्यासाठी अंतिम संघर्ष पुकारायला सुरुवात केली. स्वामी रामानंद तीर्थ यांनी निजाम कासिम रजवी याला आव्हान दिलं होतं. स्वामीजींनी भारताच्या स्वातंत्र्याचे अंतिम युद्ध हे हैदराबाद संस्थानाच्या भूमीतच होणार आहे अशी एक प्रकारे घोषणाच केली होती.
निजामावर हल्ला करण्यासाठी त्यांनी अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातील स्त्री-पुरुषांना एकत्र करून सत्याग्रह आंदोलन आणि चळवळीचा बीज मंत्र दिला होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद राज्याला भारतात सामील होण्यासाठी प्रचार आणि प्रसार केला. अनेक चळवळी त्या काळात सक्रिय होत्या. ज्याला निजामाने कडाडून विरोध केला होता. हैदराबादच्या स्टेट काँग्रेसने सात ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीय प्रदेशात सामील व्हा म्हणून घोषित केला होता. या नंतरही प्रचंड निषेध, संप आणि ध्वजारोहण सर्वत्र सुरू झाले होते. ज्यामुळे निजामाच्या सरकारने पुन्हा एकदा याच काँग्रेसला बेकायदेशीर ठरवले होते. आणि मोठ्या प्रमाणात अटक, धरपकड त्याकाळी सुरू केली होती.
स्वामी रामानंद तीर्थांना निजामाने 111 दिवस तुरुंगात टाकले . हैदराबाद संस्थानातील निजामाविरुद्ध जनतेला एकत्रीकरण करण्यात स्वामीजींचे प्रमुख योगदान आहे.
स्वामीजींनी मराठवाड्यातील मातीतील जनसामान्यांपर्यंत ही स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत करून सर्व तळागाळातील लोकांना एकत्रित आणण्याचे कार्य केले होते. दरम्यान निजाम संस्थानात रजाकाराच्या अन्याय, अत्याचारामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आणि शेवटी यामुळेच भारताचे सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस अॅकशऩ करावी यासाठी पुढाकार घेत ऑपरेशन पोलोची योजना आखली होती. 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस कारवाई सुरू झाली होती. आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते.
किंबहुना पोलिसांच्या कारवाईनंतर संक्रमणकालीन सरकारने हैदराबाद राज्यातील स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुक्त केले होते.


स्वामी रामानंद तीर्थ हे जनसामान्यांचे नेते होते. स्वामी रामानंद तीर्थ यांचे अपार प्रयत्न , अतुलनीय नेतृत्व आणि भारताची विविध क्षेत्रातील धोरणे विशेषतः सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलीस कारवाईने हैदराबाद संस्थानाला मुक्त केलं. आणि हैदराबाद संस्थान भारताला जोडल्या गेलं.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वामीजींनी आपला पूर्ण वेळ हा शैक्षणिक कार्यासाठी गरीब-वंचित-पीडित जनसामान्य यांच्या कल्याणासाठी खर्च केला होता. शिक्षणाचा प्रचार प्रसार होऊन शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे झाले पाहिजे असे ते म्हणायचे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशामध्ये निर्माण झालेल्या अनेक शिक्षण आयोगामध्ये स्वामीजींनी सांगितलेला शिक्षणाचा मूलभूत विचार, त्याचे प्रतिबिंब प्रत्येक आयोगामध्ये आपल्याला दिसत आहे. पुढील काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करून शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन दिले होते. कृतीयुक्त सहभागातून राष्ट्रीय शिक्षणाचा लोकमान्य टिळकांचा विचार सामान्यांपर्यंत खऱ्या अर्थाने नेण्याचे योगदान हे स्वामी रामानंद तीर्थ यांचे आहे.
स्वामी रामानंद तीर्थ यांनी 22 जानेवारी 1972 रोजी म्हणजे वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अशा या महान थोर कर्मयोगी विभूतीस माझा शत शत प्रणाम…!!!

प्रा.डॉ.सागर शरद कुलकर्णी’
वाणिज्य विभाग ,
स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय , अंबाजोगाई
९५५२६८२२६७*

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker