ऑगस्टच्या पावसाने मोडले १२३ वर्षाचे रेकॉर्ड; सर्वात कमी पावसाची नोंद!


दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज
यावर्षी सुरुवाती पासूनच हुलकावणी देणा-या पावसाने हवामान खात्याचा ऑगस्ट मध्ये चांगला पाऊस होईल असा वर्तवलेला अंदाज सपशेल खोटा ठरवला, उलट गेली १२३ वर्षात अत्यंत कमी झालेला पाऊस असे नवे रेकॉर्ड या वर्षी ऑगस्टमध्ये तयार झाले असे हवामान खात्यानेच आज अधिकृत सांगितले!
सोयाबीन पीकाने टाकल्या खाली माना
यावर्षी सुरुवाती पासूनच अत्यंत कमी झालेल्या पावसाने सर्वांचीच झोप उडविली असली तरी राज्य शासन मात्र अजूनही दुष्काळ जाहीर करण्याचे नांव घेत नाही. सुरुवातीपासूनच कमी झालेला पाऊस ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल असा हवामान विभागाने सांगितलेला अंदाज खोटा ठरला असून ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी लावलीच नाही. जुलै महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसाच्या भरवशावर पेरणी केलेली सोयाबीन व इतर पिके आजपर्यंत कशीबशी तग धरून उभी होती. मात्र ऑगस्ट घ्या पावसाने धोका दिल्यानंतर व शेवटच्या आठवड्यात सुरु झालेल्या जोरदार उन्हानंतर शेतातील उभ्या पिकांने आपल्या माना खाली टाकायला सुरुवात केली आहे.
फुल गळतीला झाली सुरुवात!


अत्यंत कमी झालेल्या यावर्षीच्या पावसात पेरणी केलेले सोयाबीन आता फुलव-यात आले आहे. पिकांना महिनाभरापासून पावूस नसल्यामुळे सोयाबीन ला दगडु पहाणारी फुले झाडात त्यातच उरले नसल्यामुळे फुले सोडु लागली आहेत. फुलांनी लगडलेली झाडे पाहण्याऐवजी झाडांच्या बुडाला पडलेली फुले पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे. या ही परिस्थितीत जी झाडे तग धरून उभी आहेत व ज्या झाडांना शेंगा लागत आहेत त्या सोयाबीन च्या शेंगात शक्तीच दिसत नाही. कुपोषित शेंगामध्ये दाना धरत नाही, धरलाच तर तो कुपोषित असल्याचे पहायला मिळत आहे. ही सर्व परिस्थिती पाहणे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेच्या पलिकडची आहे.
परिणामी शेतातील सोयाबीन आता शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची पुर्ण शक्यता मावळली आहे.
१२३ वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद!


या सर्व परिस्थित ३१ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान खात्याने आपला अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात हवामान विभागाने या वर्षी च्या ऑगस्ट महिन्याने मागील १२३ वर्षाचे अत्यंत कमी पाऊस पडल्याचे नवे रेकॉर्ड निर्माण केले असल्याचे सांगितले आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी मागील १९०१ वर्षांपासून २०२३ वर्षांपर्यंतच्या ऑगस्ट महिन्यातील पडलेल्या पावसाचा हवाला देत यावर्षीच्या नव्या रेकॉर्डची माहिती दिली आहे.
दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण
भारतीय हवामान विभागाने आज सांगितलेल्या आपल्या अंदाजात पुढे असे म्हटले आहे की, यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहेत. ‘आयएमडी’तर्फे सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. या अंदाजानुसार राज्यात या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता जास्त आहे. अनेक जिल्ह्यांत ऑगस्ट अखेरपर्यंत अपुरा पाऊस नोंदला गेला असताना, सप्टेंबरमध्येही पाऊसमान कमी राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते असे म्हटले आहे.


पर्जन्यमानाचे आकडे बदलले!
पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे १ जून ते ३१ऑगस्ट या कालावधीतील पर्जन्यमानाचे आकडेही बदलले आहेत. राज्यात मान्सून हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. मात्र, याच कालावधीत कोकणात सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त, मध्य महाराष्ट्रात २३ टक्के कमी, मराठवाड्यात २१ टक्के कमी आणि विदर्भात १८ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे.
भारतीय हवामान विभागाने ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, ‘सप्टेंबरमध्ये देशात सरासरीच्या ९१ ते १०९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, ईशान्य, पूर्व भारताचा काही भाग आणि हिमालयाच्या पायथ्याकडील भाग वगळता इतरत्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील. महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के आहे. सप्टेंबर मधील पावसाची राष्ट्रीय सरासरी १६८ मिमी आहे.’
सप्टेंबर मध्ये तापमान वाढण्याची शक्यता!


सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे. याचा थेट परिणाम पिकांवर, तसेच जमिनीतील आर्द्रतेवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मान्सूनच्या उत्तरार्धावर एलनिनोचा थेट परिणाम
मान्सूनच्या आगामी स्थितीबाबत बोलताना ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. एम. राजीवन म्हणाले, ‘एल निनोचा थेट परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धावर झाल्याचे दिसते आहे. ऑगस्टमध्ये मान्सूनचा अक्ष (मान्सून ट्रफ) बहुतांश काळ सर्वसाधारण स्थितीपेक्षा उत्तरेला, हिमालयाच्या पायथ्याशी राहिला. त्यामुळे या काळात कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली नाहीत. सप्टेंबरमध्ये मेडन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) या ढगांच्या क्षेत्रामुळे काही काळ मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्याची तीव्रता फार नसेल. त्यानंतर पावसात पुन्हा खंड पडू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता जास्त आहे.’


बंगाल उपसागरात ६सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र?
भारतीय हवामान विभागाच्या विस्तारित हवामान अंदाजामध्ये दीर्घ काळ ‘ब्रेक’ स्थितीत असणारा मान्सून सप्टेंबरच्या सुरुवातीला सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. या अंदाजानुसार ४ सप्टेंबरला वायव्य बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यापुढील ४८ तासांत म्हणजे ६ सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. हे क्षेत्र पश्चिम-वायव्येला सरकून मध्य भारतात पावसाचे प्रमाण वाढू शकते.
विभाग निहाय पावसाची तुट
कोकणात – ५६
विदर्भ – ५१
मध्य महाराष्ट्र – ६४
मराठवाडा – ७४
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात विभाग निहाय झालेली तुट खालील प्रमाणे आहे. सदरील तुट ही टाक्यात आहे.