मांजरा धरणात फक्त २३ टक्केच पाणी!


या वर्षी फक्त ५.०६९ दलघमी ची वाढ!
बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनेक गावांची तहान भागवणा-या मांजरा मध्यम प्रकल्पात जुलै उजाडला तरी फक्त २३ टक्केच पाणी साठा जमा झाला असून यावर्षी च्या पावसाळ्यात फक्त ५.०६९ दलघमी पाणी साठ्याची वाढ झाली आहे.
यावर्षी पावसाळा सुरु होवून ४५ दिवस उलटून गेले असले तरी बीड जिल्ह्यातील अद्यापही पेरणीयोग्य पावूस झाला नाही. या विभागातील तुरळक गावामध्ये मोठा पाऊस झाला असला तरी अनेक गावांमध्ये पेरणी योग्य ओल आपल्या शेतीत आली नाही. या विभागातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.


यावर्षी पुरेसा पाऊस नसल्याने बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनेक गावांची तहान भागवणा-या मांजरा मध्यम प्रकल्पात पाण्याची किंचित वाढ झाली आहे. मांजरा धरणात आज अखेर पर्यंत फक्त २३ टक्केच पाणी साठा उपलब्ध आहे. गेल्या दोन दिवसांत धरण क्षेत्रात ५७ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात ५.०६९ दलघमी इतकी वाढ झाली आहे.
लातूर शहर व एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह ६३ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या २२४.०९३ दलघमी साठवण क्षमतेच्या धनेगाव ( ता. केज ) येथील मांजरा धरणाच्या पाणी साठ्यात घट होत चालली होती. धरणात पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात महिन्यात पाणी साठा समाधानकारक वाढत नसला तरी मागील तीन वर्षांपासून परतीच्या
पावसाने धरण हे ओव्हरफ्लो झाले होते. यंदा जून अखेरपर्यंत पावसाने दडी मारली होती. मात्र बुधवारी युसुफवडगाव आणि होळ मंडळात दमदार पाऊस झाला. तर धरण क्षेत्रात ५७ मिमी इतका पाऊस पडल्याने धरणाच्या पाणी साठ्यातएका रात्रीत ५.०६९ दलघमी इतकी वाढ झाली आहे. धरणात सध्या ८८. ९०८ दलघमी इतका पाणी साठा असल्याची माहिती धरणाचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.
मांजरा धरणातील एकुण पाणी पातळी ६४२.३७ मीटर असून सध्या धरणात फक्त ६३७.९९ मी. पर्यंत पाणी साठा उपलब्ध आहे. धरणात पाणी साठवण क्षमता २२४.०९३दलघमी एवढी असून सध्या धरणात फक्त ८८.९०८ दलघमी एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. धरणाचा जिवंत पाणीसाठा साठवण क्षमता १७६.९६३ दलघमी असून सध्या धरणात फक्त ४१.७७८ दलघमी एवढाच जिवंत साठा आहे. मांजरा धरण फक्त २३.६१ टक्के भरले असून धरण भरण्यासाठी आणखी भरपुर पावसाची आवश्यकता आहे.


फक्त दोन मंडळात अतिवृष्टी
केज तालुक्यात बुधवारी रात्री दमदार पाऊस झाला असून युसुफवडगाव १०८ मिमी आणि होळ महसूल मंडळात ७९ मिमी पाऊस झाल्याने या दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. पाऊस चांगला झाल्याने आता पेरणीला वेग येणार आहे.