महाराष्ट्र

बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा !

आ. नमिता मुंदडा यांचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न

अंबाजोगाई शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून आ. नमिता मुंदडा यांनी केलेला पाठपुरावा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय यामुळे भविष्यात बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीची आशा पल्लवित झाली आहे.

बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीनंतर शहर पाणी पुरवठ्याचा ताण होणार कमी!

अंबाजोगाई शहराच्या पाणी पुरवठ्याचा वाढत जाणारा ताण कमी करण्यासाठी व पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या विभागाच्या आ नमिता अक्षय मुंदडा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून या साठवण तलावाच्या निर्मितीतील मोठा अडसर दुर केला असल्यामुळे या साठवण तलावाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रामुळे पुन्हा आशा झाल्या पल्लवीत

अंबाजोगाई शहराचा पिण्याच्या पाण्याचा वाढत जाणारा ताण कमी करण्यासाठी भविष्यकाळात बुट्टेनाथ साठवण तलावाची निर्मिती आवश्यक आहे हे ओळखून तत्कालीन आ. डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी आपल्या कार्यकाळात बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीची मागणी राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडे केली. साठवण तलावाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु असतांनाच या तलावाच्या निर्मितीसाठी गोदावरी उपखो-यात येणाऱ्या वाण नदीच्या पात्रात नवीच साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध होत नसल्याचा अहवाल नाशिक येथील जलसंधारण कार्यालयाने राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाला दिला असल्यामुळे सदरील साठवण तलावाच्या निर्मितीची आशा पुर्णपणे मावळली होती.

पृथ्वीराज साठे, प्रा. सौ. संगिता ठोंबरे आणि राजकिशोर मोदी यांनी ही केला होता पाठपुरावा

आ. डॉ. सौ. विमल मुंदडा यांच्या अकाली निधनानंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पृथ्वीराज साठे व प्रा. सौ. संगिता ठोंबरे, तत्कालीन नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या राजकीय शक्तीचा उपयोग करीत ही मागणी पुढे रेटली होती, मात्र त्यांच्या या प्रयत्नांना ही यश आले नव्हते.

आ. नमिता मुंदडा यांचा पाठपुराव्याची दखल!

केज विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व तीन वर्षापुर्वी आ. नमिता मुंदडा यांच्या कडे आले आणि पुन्हा एकदा बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीचा प्रश्न त्यांनी उचलुन धरला. या मागणीसाठी सातत्याने जलसंधारण विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे त्यांचा पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याच्या अनुषंगाने आ. नमिता मुंदडा यांनी १४ सप्टेंबर २०२१ रोजी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला आहे.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रात

यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातुन आ. नमिता मुंदडा यांना एक पत्र प्राप्त झाले असून या पत्रात “मध्य गोदावरी खोऱ्यातील १९.२९ अघफु पाणी शिल्लक आहे. त्यानुसार १४.१५ अघफु (४००.६८ दलघमी) पाण्याचे नियोजन प्रगतीत असून या प्रस्तावात बुट्टेनाथ साठवण तलावास २०.००दलघमी पाणी प्रस्तावित केले आहे. सदर प्रस्तावास शासनाने महामंडळ स्तरावर पाण्याचे नियोजन करण्याबाबत निर्देश दिले असून सदरील पाण्याच्या नियोजनाचे काम क्षेत्रीय स्तरावर प्रगती पथावर आहे.” असे कळवले आहे.

मार्ग मोकळा झाला असला तरी प्रक्रिया खुप मोठी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्राच्या अनुषंगाने आता गेली अनेक वर्षांपासून मंजूरीसाठी प्रलंबित असलेल्या बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होण्यास मदत झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सदरील पत्रानुसार बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीसाठी नाशिक कार्यालयातुन महामंडळ स्तरावर पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळेल व सदरील प्रमाणपत्रानंतर बुट्टेनाथ साठवण तलावाच्या मंजूरीचा मार्ग मोकळा होईल. या प्रक्रियेनंतर बुट्टेनाथ साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध होईल.

आता पुन्हा विशेष प्रयत्न करण्याची गरज

सदरील संपुर्ण प्रक्रिया वेळ घेणारी असली तरी अंबाजोगाई शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सदरील प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करुन घेण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी विशेष प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आता शहरवासीयांकडुन करण्यात येत आहे.


Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker