मराठीभाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईलाच व्हावे; आ. धनंजय मुंडे झाले आक्रमक


आद्यकवी मुकुंदराह यांची कर्मभूमी असलेले बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे मराठी भाषेचे उगमस्थान असल्याबाबत अनेक भाषा तज्ज्ञांचे एकमत झाले आहे. त्यामुळे मराठी भाषेचे विद्यापीठ हे अंबाजोगाई येथे उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी आ. धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या निमित्ताने केली आहे.


आद्य कवी मुकुंदराज यांनी प्रसिद्ध ग्रंथ विवेकसिंधु याची निर्मिती अंबाजोगाई येथूनच केली. मराठवाडा मुक्ती संग्रामा दरम्यान स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यातील पहिली मराठी शाळा ही अंबाजोगाई येथेच सुरू केली होती. त्यामुळेच अंबाजोगाईला मराठी भाषेची जननी म्हटले जाते.


राज्य सरकारने रिद्धपुर जि. अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याची अर्थसंकल्पात घोषणा केली असून, या बाबीला माझा विरोध नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले. मराठी भाषेचे विद्यापीठ कुठे व्हावे याबाबत शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष, कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनीही हे विद्यापीठ अंबाजोगाई येथे करणे योग्य असल्याचा अहवाल तत्कालीन सरकारला सादर केला होता, त्यामुळे मराठी भाषेचे उगमस्थान असलेल्या अंबाजोगाई शहरातच मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले जावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.