ग्राहकांची विश्वासार्हता हीच सर्वात मोठी ठेव; आ. धनंजय मुंडे


आजचा काळात बँकेची व ग्राहकांची विश्वासाहर्ता हीच सर्वात मोठी बँकेची ठेव आहे असे स्पस्ट मत राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले . ते अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या अहमदनगर शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरचे आमदार संग्राम जगताप, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी, माजी आमदार संजय दौंड, पृथ्वीराज साठे , अंबासाखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णुपंत सोळंके, बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, जेष्ठ संचालक वसंत चव्हाण यांच्यासह बँकेचे सर्व संचालक यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड हे उपस्थित होते.


बँकेच्या नवीन वास्तूच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम नवीन वास्तूचे फीत कापून तसेच दीपप्रज्वलन व माता योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी केले. अहमदनगर ही संतांची भूमी असून या शहराची ओळख ही कुठलाही काना , मात्रा व वेलांटी नसलेले सरळ माणसांचे शहर असल्याची आहे. संत ज्ञानेश्वर, शिर्डीचे साईबाबा, मोहटा देवी असे विविध धार्मिक स्थळांनी नटलेला असा हा जिल्हा असल्याचे राजकिशोर मोदी यांनी बोलताना सांगितले.
मागील 26 वर्षांपूर्वी दहा लाखांच्या भाग भांडवलावर सुरू केलेली बँक आज पाचशे कोटीचा टप्पा ओलांडत आहे हे सर्व ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाच्या बळावरच शक्य झाले असल्याचे याप्रसंगी मोदी यांनी आवर्जून नमूद केले. बँक चालवीत असताना ग्राहक हाच सर्वश्रेष्ठ मानून बँकेचा कारभार सुरू ठेवला असल्याने आज बँकेच्या 16 शाखा महाराष्ट्राच्या विविध भागात कार्यरत आहेत. तसेच या शाखा सर्व सुविधांनी व डिजिटल रित्या चालू असल्याचे राजकिशोर मोदी यांनी अभिमानाने सांगितले .स्वर्गीय बाबुरावजी आडसकर, स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी सुरू केलेल्या सहकार चळवळीच्या पावलावर पाऊल ठेवूनच आपले कार्य सुरू असल्याचे राजकिशोर मोदी यांनी यावेळी कबुल केले. तसेच राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही असाच कार्यभार सुरू राहणार असल्याचे राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी सांगितले.


यावेळी माजी आमदार संजय दौंड व पृथ्वीराज साठे, ऍड राजेश्वर चव्हाण आणि अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशरावजी आडसकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना बँकेच्या नवीन वास्तूच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी एखादी बँक उभा करून ती यशस्वीपणे चालवणे हे मोठे जिकरीचे व कठीण काम असल्याचे सांगितले. अंबाजोगाई पिपल्स बँकेने व बँकेचे संस्थापक राजेश्वर मोदी यांनी ग्राहकांचा विश्वास कमावत लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. आज अनेक बँका सुरू होऊन त्या कधी बुडित निघतात हे कळत देखील नसल्याचे आमदार जगताप यांनी नमूद केले. अशा बँकांत ग्राहकांनी त्यांची आयुष्यभराची पुंजी बँकेत जमा केलेली असल्याने बुडीत निघालेल्या बँकेमुळे ग्राहकांचे अतोनात नुकसान होऊन त्यांचे कुटुंब उध्वस्त होते . मात्र अशा परिस्थितीत देखील अंबाजोगाई पिपल्स बँक ही ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवून आहे हे राजकिशोर मोदी यांचे मोठे यश मानावे लागेल असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी काढले. सहकारी बँकेच्या अर्थ साह्याने अनेक नवीन लघु व मोठे उद्योजक स्टार्टअप च्या माध्यमातून निर्माण होऊ पाहत आहेत. अहमदनगर शहरात सुरू केलेल्या या बँकेस शुभेच्छा व्यक्त करताना आपण बँकेस सदैव सहकार्य करण्याची भूमिका घेऊ असा आशावाद देखील यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.


आपल्या उद्घाटनपर भाषणात राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे म्हणाले की राजकिशोर मोदी हे मागील तीस वर्षापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा राजकारणातून समाजकारण ,शहराची शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडण करतांना बॅंकेच्या माध्यमातून अर्थकारण देखील अतिशय यशस्वीरित्या सांभाळत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. अवघ्या दहा लाख रुपये भाग भांडवलावर सुरू केलेली अंबाजोगाई पिपल्स बँक ही आज 500 कोटीचा टप्पा ओलांडून 1000 कोटींकडेवाटचाल करताना अहमदनगर सारख्या मोठ्या शहरात देखील आपले वर्चस्व निर्माण करू पाहत असल्याचे म्हणाले. आजच्या परिस्थितीत बाप लेकावर, भाऊ भावावर विश्वास ठेवत नाही मात्र अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या सुजान ग्राहकांनी राजकिशोर मोदी व त्यांच्या बँकेवर अपार विश्वास दाखवला. ग्राहकांचा विश्वास हीच सर्वात मोठी ठेव असल्याचे यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी स्पष्ट सांगितले. बँकेने केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील आपले जाळे विणण्याचे काम सुरू केले आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आज एलआयसी सारखी संस्था आपला विश्वास गमावत आहे मात्र अंबाजोगाई पिपल्स बँक ही आपली विश्वासार्हता कायम ठेवून असल्याबद्दल बँकेचे व संस्थापक राजकिशोर मोदी यांचे अभिनंदन व कौतुक केले.आजच्या परिस्थितीत बँकिंग क्षेत्राची दयनीय अवस्था झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे, काही लोकांमुळे बँकिंग क्षेत्र हे बदनाम होत आहे मात्र अशाही परीक्षेच्या घडीला अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक हे चांगले काम करीत आहे याबाबत बँकेच्या सर्व संचालकांसह कर्मचारी व ग्राहकांचे आमदार धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले. शेवटी बँकेच्या माध्यमातून निर्माण झालेला आजचा वटवृक्ष हा यापुढे उभ्या महाराष्ट्राला सावली देवो ही सदिच्छा आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास राजकिशोर मोदी व अंबाजोगाई पिपल्स बँकेवर प्रेम करणारे अनेक ग्राहक महिला, जेष्ठ नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णुपंत सोळंके यांनी व्यक्त केले.