महाराष्ट्र

सुखाच्या प्राप्तीसाठी धम्माची वाट चालावी लागेल; पुज्य भदन्त महाविरो

चांदापुर येथील ९व्या बौध्द धम्म परीषदेचा शानदार समारोप

धम्म सदाचार शिकवतो, त्यामुळे सुखाच्या प्राप्तीसाठी धम्माची वाट चालावी लागेल असे मत पुज्य भदन्त महाविरो यांनी चांदापुर येथे आयोजित केलेल्या नवव्या बौध्द धम्म परीषदेत धम्मदेसना करतांना व्यक्त केले.

परळी तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन, वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही १९ फेब्रुवारी २०२३ रोजी नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला पुज्य डाॅ.भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म देसना देण्यासाठी पुज्य डाॅ.भदन्त इंन्दवंस्स महाथेरो (कुशीनगर), पुज्य भिक्खू धम्मशील थेरो (हिंगोली / बीड), पुज्य भन्ते महावीरो आणि पुज्य भिक्खू रत्नदीप थेरो (औरंगाबाद) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आले होते. या धम्म परिषदेचे “सम्यक संकल्प” या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात आले. मागील काही वर्षांपासून बौद्ध धम्म उपासकांसाठी नांवारूपास आलेले सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी, जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी, वसंतनगर तांडा, मौजे चांदापूर, ता.परळी येथे रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी येथे नवव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरूवात पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने करण्यात आली.

या धम्म परीषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष एॅड.अनंतराव जगतकर हे होते. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रदीप रोडे (प्रियदर्शी धम्म संस्कार केंद्र, बीड), नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे, संग्राम लक्ष्मण गित्ते (सरपंच, चांदापूर), विलास गायकवाड (उपमुख्याध्यापक, योगेश्वरी नुतन विद्यालय, अंबाजोगाई), प्रा.विलास रोडे (मिलिंद काॅलेज, परळी वैजनाथ), सौ.शाहू विजय राठोड (सरपंच, वसंतनगर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली, या प्रसंगी धम्म देसना देताना पुज्य भदन्त महाविरो म्हणाले की, बुध्द धम्म हा सदाचार शिकवतो, त्यामुळे सुखाच्या प्राप्तीसाठी धम्माची वाट चालावी लागेल, धम्माचा अंतिम उद्देश समजून घ्या, आधुनिक समाजात सदाचार व दुराचार यांचे युद्ध सुरू आहे. मानवाने चिंतन व मनन करावे, चिवर आणि भिक्षापात्र ही धनसंपत्ती सर्वश्रेष्ठ आहे. असे सांगून पुज्य भदन्त महाविरो यांनी कुशल कर्म, त्रिशरण, पंचशील, अष्टांग मार्ग, दहा पारमिता, कर्मवाद, धम्म संस्कार, दानाचे महत्व विशद केले. पुज्य भिक्खू रत्नदीप थेरो यांनी श्रामनेर शिबीराचे महत्व, शिबिरात होणारे धम्म संस्कार, धम्म उपासकांनी धम्माचे आचरण करून दानाची भावनिकता वाढवावी. धम्म विचाराने परिवर्तन शक्य आहे. यापुढे धम्माचा विचार विस्तीर्ण करण्यासाठी कार्यरत राहू, उत्तम व चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी पुज्य भिक्खू रत्नदीप थेरो यांनी सांगितले. तर पुज्य डाॅ.भदन्त इंन्दवंस्स महाथेरो यांनी तथागत गौतम बुद्धांनी जगाला लोककल्याणाचा मार्ग सांगितला आहे. बुध्दाचा धम्म हा मनुष्याच्या कल्याणासाठी आहे. धम्मात दान पारमिता आहे. धम्म देसना सतत ऐका, धम्माने मन शांत होते, सुख लाभते. शील-समाधी-प्रज्ञेतून दु:ख मुक्तीचा मार्ग मिळतो.

धम्माने अशुद्ध मन शुद्ध होते. उत्तम माणूस होण्यासाठी प्रत्येकाने धम्माचे आचरण व पंचशीलाचे पालन करावे असे आवाहन पुज्य डाॅ.भदन्त इंन्दवंस महाथेरो यांनी केले. यावेळी बोलताना पुज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी सर्वप्रथम उपस्थित सर्व पुज्य भिक्खू गणांचा परीचय करून दिला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला तथागतांचा शुध्द धम्म दिला आहे. भारतीय संविधानात मानवी कल्याणाचा जो विचार सामावला आहे. तो वंदनीय बाबासाहेबांनी ञिपीटीकातून घेतला आहे. प्रत्येकाने धम्माचे आचरण करावे. धम्म विचारात मोठी शक्ती सामावली आहे. धम्म म्हणजे काया, वाचा शुध्द करणे होय. दु:ख नष्ट करणे, शील घडविणे, जसे आपले कर्म तसे आपण घडतो. त्यामुळे आपणच आपल्या सुख, दुःखाला जबाबदार आहोत. आपण कोणत्याही जिवाची हत्या करायची नाही. तर ञिशरण, पंचशील आणि धम्माचे पालन करायचे असे आवाहन पुज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी केले.

प्रास्ताविक करताना राजेंद्र घोडके यांनी सांगितले की, यावर्षी धम्म परीषदेस एॅड.अनंतराव जगतकर, चंद्रशेखर वडमारे, राहूल घोडके,प्रा.बी.एस. बनसोडे यांच्यासह उपासकांचे अनमोल सहकार्य लाभले. चांदापुर येथील तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाणच्या कार्याची माहिती यावेळी उपस्थितांसमोर ठेवून धम्म परिषदेसाठी नियमीत धम्मदान करावे असे आवाहन घोडके यांनी केले. प्रा.प्रदिप रोडे यांनी केले चांदापुर येथे नवे ऊर्जा केेंद्र निर्माण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप करताना अ‍ॅड.अनंतराव जगतकर यांनी बुद्ध धम्माची महती विषद केली. धम्म दान वाढत आहे, धम्माचे उपासक व कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतल्यामुळे तक्षशिला केंद्रास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याची माहिती देवून चारित्र्यसंपन्न व नितीमान समाज निर्माण करण्यााठी धम्म आचरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन एॅड.जगतकर यांनी केले.

याप्रसंगी श्रामनेर शिबिरास सहकार्य करणारे आनंद वाघमारे व शिबिरात सहभागी झालेले अजिंक्य कांबळे, दयानंद वेडे, प्रतिक कांबळे, सुरेश साळवे, सिध्दार्थ वाघमारे, निलेश गायकवाड, रितेश कांबळे यांनी ही आपले अनुभव सांगताना समायोचित मनोगत व्यक्त केले. धम्म परिषदेच्या ठिकाणी परळी ग्रामीण पोलीस यांचे सुरक्षा पथक उपलब्ध करून देण्यात आले होते. या धम्म परिषदेत 14 विविध महत्वपुर्ण ठराव मांडण्यात येवून ते पारित करण्यात आले. हे ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. ठरावांचे वाचन प्रा.गौतम गायकवाड यांनी केले. तर धम्म परिषदेचे सुत्रसंचालन जगन सरवदे यांनी करून उपस्थित उपासक, उपासिका यांचे आभार चंद्रकांत इंगळे यांनी मानले. धम्म उपासक हे पांढरे वस्त्र परिधान करून धम्म परिषदेत सहभागी झाले होते. तसेच १० फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत भन्ते धम्मशील, भन्ते महाविरो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामनेर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४९ उपासकांनी सहभाग घेतला. शिबिरातील श्रामनेरांना प्रा.गौतम गायकवाड यांनी अंतर्वस्त्र व चिवरदान केले. या शिबिराचा समारोप १९ फेब्रुवारी २०२३ रोजी धम्म परीषदेच्या सांगता सोहळ्यानंतर झाला.

श्रामनेर शिबीरास आनंद वाघमारे, चंद्रकांत बनसोडे, संजय साळवे गौतम सरवदे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. धम्म परीषदेच्या पार्श्वभूमीवर रमाई चौक, कबीरनगर, अंबाजोगाई, जवळगाव, पुस, घाटनांदूर, उजनी, पट्टीवडगाव, नागापूर, या गावांतून धम्म रॅली काढण्यात आली, धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी वै. जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे, प्रा.प्रदीप रोडे, राजेंद्र घोडके, प्रा.गौतम गायकवाड, राहुल घोडके, जगन सरवदे, सचिन वाघमारे, विश्वनाथ भालेराव, व्यंकट वाघमारे, सिमा चंद्रकांत इंगळे आणि संयोजन समितीचे सुरेश मस्के (उजनी), गौतम कांबळे (बागझरी), राजाभाऊ चक्रे (साळुंकवाडी), जालींदर कसबे (साळुंकवाडी), सुरेश विजय कांबळे (पट्टीवडगाव), अशोक कांबळे (पट्टीवडगाव), वैजनाथ कांबळे (पट्टीवडगाव), प्रसिध्दीप्रमुख प्रा.बालाजी जगतकर, सत्यपाल वाघमारे (पट्टीवडगाव), बौध्दाचार्य मुरलीधर कांबळे, मिलिंद नरबागे, राज जगतकर, भारत जगताप, प्रा.बी.एस. बनसोड, किशोर इंगळे, प्रा.मधुकर शिनगारे, संजय साळवे (पुस), सुरेखा रोडे, अर्जून काळे, आकाश वेडे, विनोद रोडे, धनंजय जोगदंड, सुशिल इंगळे, रूक्मिण गोरे, सुहासिनी इंगळे, स्वप्निल रोडे, बंडू इंगळे, विजय हजारे, धम्मानंद मस्के, उर्मिला वैद्य, (भिमनगर), सुचिता सोनवणे, (बोधीघाट), तुळसाबाई काळे, विद्या लक्ष्मण बाघमारे, पुष्पा गुणाजी होके, बाबा वाघमारे, अमोल जगताप (नंदागौळ), आदींनी पुढाकार घेतला होता.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker