महाराष्ट्र

कोट्यवधी रुपयांचा निधी येवून स्वाराती रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांची तहान भागेना!

‘स्वाराती’ रुग्णालयातील जलकुंभ कोरडेच!

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी बीड, लातुर, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांसह सीमालगत असलेल्या आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो रुग्ण सतत येत असतात. या रुग्णालय परिसरात मोठ-मोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या मात्र या रुग्णालयात उपचारासाठी येणा-या रुग्ण आणि नातेवाईकांची तहान भागवण्यासाठी वैद्यकीय प्रशासन सतत अपयशी ठरत आहे. या लोकांना पाण्याचा शोध घेत फिरण्याची वेळ यावी ही या वैद्यकीय महाविद्यालयाची शोकांतिका आहे.

अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय हे या विभागातील पंचक्रोशीत येणाऱ्या गावातील सामान्य लोकांसाठी आरोग्य संजीवनी ठरले आहे. या रुग्णालयात बीड, लातुर, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांसह सीमालगत असलेल्या आंध्रप्रदेश कर्नाटक या राज्यातील हजारो रुग्ण येत असतात.
या रुग्णालयात उपचारासाठी येणा-या रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने कोट्यवधी रुपयांच्या टोलेजंग इमारती उभ्या केल्या.

या इमारतीत अत्याधुनिक मशिनरी व इतर भौतिक सुविधा उपलब्ध केल्या. मात्र या रुग्णालयात उपचारासाठी येणा-या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छतेसाठी लागणारे मुबलक पाणी मात्र उपलब्ध केलेले ठळक पणे दिसून येत नाही. रुग्णालयास कोट्यावधी रुपयांचा शासकीय निधी उपलब्ध करून देण्यासाठी या विभागातील लोकप्रतिनिधी शासन दरबारी पाठपुरावा करुन मंजूर करुन आणतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणून सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाण्याची परिस्थिती जैसे थे च आहे.

रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आज पर्यंत पाण्याची सोय का झाली नाही ? पाण्यासाठी रुग्णालय परिसरात येणाऱ्यांना पाण्यासाठी वणवन करावी या पेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असेल. कोट्यावधी रुपयांचा निधी येतो पण या पैशामधुन पाणी वितरणाचे योग्य नियोजन का करण्यात येवू नये असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो आहे. नाही म्हणायला अंबाजोगाई रुग्णालयाच्या या टोलेजंग इमारतीच्या जाळ्यात पंचेवीस वर्षापुर्वी बांधलेल्या दोन पाण्याच्या टाक्या बांधलेल्या दिसतात, मात्र या पाण्याच्या टाकीत पाणी अभावानेच आढळुन येते.

या व्यतिरिक्त शहरातील का दानशुर संस्थांनी आपल्या संस्थाच्या नावाने थंड पाणी देणारी पाणपोयी सुरु करण्यात आल्याचे दिसून येते, मात्र ही पाणपोयी फोटो काढून छापुन येईपर्यंत अथवा सोशल मीडियावरुन निघून जाई पर्यंतच दिसतात, त्यानंतर या दिसतही नाहीत.

रुग्णालय परीसरात ऍटो दीक्षा चालवून आपल्या कुटुंबियांची उपजिविका भागवणा-या कष्टकरी ऍटो चालकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशव्दाराच्या चौकात सुरु केलेली थंड पाण्याची पाणपोई मात्र गेली अनेक वर्षांपासून सतत सुरू असलेली दिसते. ही पाणपोई चालवणा-या ऍटो चालकांचे अभिनंदन करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोना महामारी व त्यानंतर आलेल्या म्युकर मायकॉसिस या आजारांवर सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्यामध्ये, गरीब रुग्णांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देवून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणा-या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सातत्याने या रुग्णालयाचा मोठा वाटा आहे. अशा या रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था व्हावी ही माफक अपेक्षा सामान्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker