महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांची राजकीय कोंडी करणारा “ब्रेन” कोणाचा?

मागील पंधरा दिवसांत बीड जिल्ह्यात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन कार्यक्रम बीड जिल्ह्यात झाले ते ही पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या अनुपस्थितीत! पहिला कार्यक्रम झाला तो माजी आमदार कै. विनायक मेटे यांच्या समर्थकांना राजकीय शक्ती देण्यासाठी आणि दुसरा कार्यक्रम झाला तो बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गहिनीनाथ गडावर ज्येष्ठ संत कै. वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्तचा!

सहा वर्षापुर्वी बीड जिल्ह्यातीलच भगवान गडावरील महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना गडाची दारे बंद केली होती. आता कै. वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गहिनीनाथ गडाचे ही दारे बंद करण्याचा घाट घालण्यात आला असल्याची चर्चा बीड जिल्ह्यात जोर धरु लागली आहे. पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांना या दोन्ही गडाचे दरवाजे बंद करून त्यांचे राजकीय खच्चीकरण करणारा “ब्रेन” नेमका कोणाचा आहे?
पंकजा आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांचे राजकीय खच्चीकरण करण्याची मोहीम वेग धरत असली तरी मराठवाड्यातील भाजपा कार्यकर्ते अजूनही मौन का धरुन आहेत? याचा शोध घेण्याचे काम मराठवाड्यातील भाजपा कार्यकर्त्यांना आता करावे लागणार आहे.
पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मधील वाद मिटण्या ऐवजी पराकोटीचा होत चालला असल्याचे
दिवसेंदिवस आपल्याला पहावयाला मिळत आहे. अलिकडेच देवेंद्र फडणवीस यांचे दोन कार्यक्रम पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांना वगळुन घेण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांत मुंडे भगिनींना वगळण्यात संयोजकाचा हात आहे की अन्य कोणाच्या सांगण्यावरून त्यांना दुर ठेवण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे. मात्र राज्यातील ३० ते ३५ मतदार संघात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचे मोठे जाळे असतांना भाजपाच्या या “ब्रेन” ला मुंडे भगिणींचा रोष ओढवून घेणे खरोखरच परवडणारे आहे का याचा विचार व्हायला हवा! खरं तर गेली १० वर्षांपासून सतत बदलत चाललेल्या या राजकीय स्थित्यंतराचा धोंडोळा घेण्याचा प्रयत्न करण्यासाठीच या लिखाणाचे प्रयोजन आहे.

१५ वर्षापुर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जेंव्हा गोपिनाथ मुंडे सक्रिय होते तेंव्हा भाजपामध्ये शहरी भाजपा आणि ग्रामीण भाजपा असे सरळ दोन गट पडल्याची चर्चा रंगली होती. ग्रामीण गावगाड्यांतील अठरापगड जातींचा समावेश असलेल्या भाजपाचे नेतृत्व गोपिनाथ मुंडे यांच्याकडे असायचे तर सुशिक्षीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीतून तयार झालेल्या शहरी भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्या कडे असायचे! मतभेद असले तरी शहरी आणि ग्रामीण भाजपानी एकत्र येत महाराष्ट्रात आपले स्वतंत्र साम्राज्य उभे केले. राज्यात भाजपा-सेना युतीचं पहिलं राज्य आणलं! या काळात सलग १०-१५ वर्षे गोपीनाथ मुंडे यांनी भाजपावर आपली हुकूमत चालवली. भाजपाचे सर्वेसर्वा प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर नंतर महाराष्ट्रात अस्तित्वात असलेला मुंडे आणि गडकरी गटाचा वाद संपुष्टात आला तसेच इतर ही सर्व गट-तट मागे पडले.

२०१४ नंतर तर भाजपाची समिकरणेच बदलली. देशात आणि राज्यात मोदी -शहा यांचा काळ सुरु झाला! या काळात महाराष्ट्रात सत्तेत असो अथवा नसो आपल्यावर कायम अन्याय होत असल्याची चर्चा करणारा पंकजा मुंडे यांचा गट मात्र कायम चर्चेत राहिला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या जवळच्या कांहीं नेत्यांनी पंकजा मुंडे यांना साथ दिली तर कांही नेत्यांनी उगवत्या सुर्याला नमस्कार करीत नवीन भाजपा आत्मसात केली.
पंकजा मुंडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मात्र अजूनही पक्षात चांगली संधी मिळेल याची प्रतिक्षा आहे. मात्र याच परिस्थितीत पंकजा मुंडे यांच्या अनेक समर्थकांची कोंडी करीत या नव्या भाजपाने त्यांना कस्पटासारखे दुर केले. एवढेच नव्हे तर पंकजा मुंडे यांना जिथे संधी मिळेल असे वाटत होते तिथुन त्यांची संधी हातातुन निसटण्याची पुर्ण रणनिती भाजपाच्या या “ब्रेन” ने वापरली! ही संधी पंकजा मुंडे यांना न मिळुन देण्याचं खापर मात्र पंकजा मुंडे यांच्या गटाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडलं.


पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फारसे सख्य नसल्याचे संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. ही नाराजी यापुर्वीही महाराष्ट्राने अनेकवेळा पाहिली आहे. मात्र मागच्या शनिवारी बीड जिल्ह्यात संत गहिनीनाथ गडावर संत श्रेष्ठ कै. वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थित असतांना बीड जिल्ह्याच्या विद्यमान खा. डॉ. प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघी बहिणींना या कार्यक्रमाचे निमंत्रणच न दिल्या मुळे आता पुन्हा पंकजा मुंडे आणि फडणवीस गटातील वादात नव्याने ठिणगी पडली आहे!
२०१६ ला महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका दसरा मेळाव्याची प्रथा खंडीत पडली आणि एका नव्या वादाचा विषय पुढे आला होता. हा नवा वाद होता पंकजा मुंडे आणि भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचा. २०१६ ला भगवान गडावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्या भाषणाला गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी विरोध केला. भगवान गड हे धार्मिक व्यासपीठ आहे आणि यापुढे येथे राजकीय भाषणे होवू दिली जाणार नाहीत ही भुमिका त्यांनी घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी माघार घेतली आणि त्या गडाच्या खाली उतरल्या. गडाच्या पायथ्याशी लाखो लोकांची गर्दी करुन त्यांनी दसरा मेळावा घेतला. पुढे हीच परंपरा कायम राहिली. लोक गडावर जावून भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेत आणि खाली येवून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात सहभागी होत. डॉ. नामदेव शास्त्री आपल्या भुमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी पंकजा मुंडे यांच्या साठी भगवान गडाचे दरवाजे कायमचे बंद केले.

या घटनेच्या सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री भाजपाच्या व्यासपीठावर तेही देवेंद्र फडणवीस यांचे सोबत दिसले. त्यावेळी भाजपाची सत्ता असून ही पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास परवानगी नाकारण्यात आली. महंतांच्या या भुमिकेला भाजपातुनच नेमका कोणाचा पाठिंबा आहे याची जाहीर चर्चा ही त्यावेळी झाली. आज पंकजा मुंडे यांची राजकीय कोंडी होत असल्याची चर्चा समोर येत असतांनाच डॉ. नामदेव शास्त्री यांचही नावं चर्चेत येवू पहातेय. डॉ. नामदेव शास्त्री फडणवीस यांच्या सोबत व्यासपीठावर नेमकं का येत आहेत? २०१६ ला भगवान गडाचे दरवाजे बंद करण्याच्या घटनेशी यांचा काही संबंध आहे का? याचीही चर्चा आता होवू लागली आहे. यासर्व चर्चेच्या मुळाशी जावून यातील अधिक बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सर्व गोष्टी सुर्यप्रकाशाएवढ्या स्वच्छ व स्पष्ट दिसू लागतील. पंकजा मुंडे यांचे भगवान गडावरील दरवाजे बंद करण्यामागे डॉ. नामदेव शास्त्री यांचा नेमका काय हेतु आहे. पंकजा मुंडे यांना डावलून आ. धनंजय मुंडे यांच्या सोबत हातमिळवणी करणारे डॉ. नामदेव शास्त्री अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक का करु पहात आहेत? या प्रश्नांची उत्तरे मराठवाड्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी शोधण्याची योग्य वेळ आता आली आहे.

संत वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर कार्यक्रम होतो. गहिनीनाथ गड हा बीड जिल्ह्यातच आहे. बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या या गडावर कै. संत वामनभाऊंची पुण्यतिथी साजरी करण्याची जुनी परंपरा आहे. गोपीनाथ मुंडे असतांना त्यांना या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण गडाचे महंत स्वतः प्रत्यक्ष भेटून अथवा फोन करुन द्दायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर हे रितसर निमंत्रण पंकजा मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून अथवा दुरध्वनी वरुन दिले जायचे. यावर्षी कै. वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे रितसर निमंत्रण पंकजा अथवा खा. डॉ. प्रितम मुंडे यांना दीले गेले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निमंत्रण जातीने देण्यासाठी गहिनीनाथ गडाचे महंत हे स्वतः मुंबईमध्ये दोन दिवस तळ ठोकुन होते, मात्र ते पंकजा मुंडे यांना निमंत्रण देण्यासाठी गेले नाहीत अथवा त्यांना महंतांनी साधा फोन ही केला नाही असा दावा मुंडे समर्थक करतात.

या वर्षीचा संत वामनभाऊ पुण्यतिथीचा हा कार्यक्रम प्रतिवर्षी प्रमाणे जोरदार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला येवून कार्यक्रमाची शोभा ही वाढवली. पण बीड आणि नगर जिल्ह्यांमधील लाखो भाविक ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी अतुर होते त्या पंकजा मुंडे या कार्यक्रमाला आल्या नसल्यामुळे समर्थकांचा हिरमोड झाला. ज्या व्यासपीठावर बीड जिल्ह्यातील आजी माजी आमदार हजर राहीले त्या व्यासपीठावर पंकजा मुंडे आणि खा.डॉ. प्रितम मुंडे नसल्याचीच चर्चा गडावर अधिक झाली! पंकजा मुंडे गैरहजर राहण्याची नेमकं कारण काय असू शकतील याची चर्चा आता महाराष्ट्रात होवू लागली आहे.
पाच वर्षांपुर्वी महाराष्ट्रातील ३० ते ३५ विधानसभा मतदार संघावर आपला प्रभाव दाखवणा-या, बीड सारख्या मागास जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करुनही पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जावून लाखो लोकांच्या सभा गाजवणा-या पंकजा मुंडे यांची त्यांच्याच पक्षात त्यांची गोची नेमकं कोण करत आहे? हे आता सर्वश्रुत आहे. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मधील नेमका वाद काय आहे? हा वाद मिटवण्यासाठी केंद्रीय नेते का प्रयत्न करत नाहीत? या प्रश्नांची उत्तरे आता मराठवाड्यातील जनतेला हवी आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकी पुर्वी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून भाजपाला निर्विवाद वर्चस्व मिळवून देणा-या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री पदाची दावेदारी सांगताच त्यांची राजकीय कोंडी करुन राजकारणातुनच उठवण्याचे शडयंत्र आखणे आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणणे हे एवढे सोप्पे आहे का? पंकजा मुंडे यांचा आज ही महाराष्ट्रातील किमान ३० ते ३५ विधान सभा मतदार संघात मोठा चाहता वर्ग आहे, या मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड, मावळ, पिंप्री-चिंचवड, इंदापूर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नांदगाव, जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतुर, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतुर, औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पुर्व, औरंगाबाद पश्चिम, उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, उस्मानाबाद, लातुर जिल्ह्यातील लातुर ग्रामीण, अहमदपूर, बीड जिल्ह्यातील परळी, केज, माजलगाव, बीड, आष्टी, गेवराई या मतदारसंघावर आजही पंकजा मुंडे यांचा प्रभाव आहे. याशिवाय महाराष्ट्रात निर्माण झालेला माधव पॅटर्न मधील माळी, धनगर आणि वंजारा समाजात आजही पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला मानणारा मोठा वर्ग आहे. पंकजा मुंडे यांची एवढी मोठी शक्ती असतांनाही त्यांच्याच जिल्ह्यात भगवान आणि गहिनीनाथ गडासारख्या दोन मोठ्या गडाचे दरवाजे बंद करून त्यांना राजकीय आव्हान देण्याची हिंमत करणे हे एवढे सोप्पे काम नाही. हे नेमकं कोण करतो आहे याचा शोध घेवून त्याला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज बीड जिल्ह्यात येत आहेत. मध्यंतरीच्या काळात राज्यातील राजकारणात अडगळीत पडलेले चंद्रशेखर बावनकुळे हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने भाजपा महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षात गोपीनाथ मुंडे यांचे स्थान काय होते हे त्यांना चांगलेच माहीत आहे. त्यानंतर पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध,

त्यांच्यातील हेवेदावे सुध्दा चंद्रशेखर बावनकुळे यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत. पंकजा मुंडे यांची महाराष्ट्रातील अन्य मतदार संघातील राजकीय शक्ती देखील बावनकुळे यांना चांगलीच माहिती आहे. हे सगळं माहीत असूनही बावनकुळे हे “अळी मिळी गुपचुप गिळी” ही भुमिका घेवून गप्प आहेत. पंकजा मुंडे यांची राजकीय कोंडी करणा-या “ब्रेन” चा बंदोबस्त करण्याची भुमिका प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे घेणार का? हा खरा प्रश्न आहे. किमान असे झाले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उपद्रव करणे भाजपाला महाग पडु शकेल का? यांचा विचार तरी चंद्रशेखर बावनकुळे यांना निश्चित करावा लागेल.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker