महाराष्ट्र

अनिल देशमुख १ वर्ष १ महिना आणि २० दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज (दि.२८) आर्थर रोड तुरुंगातून सायंकाळी पाच वाजता सुटका झाली. तब्बल एक वर्ष, एक महिना आणि 20 दिवसांनी अनिल देशमुख आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख यांचे कुटुंबीय तुरुंगाबाहेर उपस्थित होते. अनिल देशमुख तुरुंगा बाहेर येताच त्यांना खाद्यांवर उचलून घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

१३ महीने तुरुंगात!

अनिल देशमुख यांना दहा दिवसांपूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला होता. तथापि, सीबीआयने त्याविरोधात दाद मागितल्यामुळे दहा दिवसांची स्थगिती न्यायालयाने स्वतःच्या आदेशाला दिली होती. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा सीबीआयने मुदतवाढ मागितली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यामुळे देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होताअनिल देशमुख यांचे आम्ही स्वागत करत आहोत. त्यांची आज सुटका होत आहे. कोणत्याही आरोपाविना त्यांना तेरा महिने तुरुंगात रहावे लागले. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. पण कोर्टाने न्याय केला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली. दरम्यान, देशमुख यांच्या सुटेकदरम्यान जयंत पाटील, सुप्रिया सुळे तुरुंगाबाहेर उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या स्वागताचे बॅनर्सही झळकले.

परमवीर सिंग यांचा लेटर बॉंम्ब

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप एका पत्राद्वारे केला होता. त्या लेटर बॉम्बमुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहींच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.

काय आहे प्रकरण ?

मुंबईतील 1750 ऑर्केस्ट्रा बार/ पबमधून प्रत्येकी तीन लाख रुपये या प्रमाणे अंदाजे ४० ते ५० कोटी गोळा करण्यास तेव्हाचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना देशमुख यांनी सांगितले. त्यानुसार वाझे यांनी त्यापैकी चार कोटी ७० लाख रुपये गोळा करून देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी कुंदन शिंदे याच्याकडे दिले, असा देशमुख यांच्यावर आरोप आहे. १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली. त्यानंतर बदल्या व नियुक्त्यांसाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात सीबीआयने ६ एप्रिल २०२२ रोजी त्यांना अटक केली होती.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker