माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भारतजोडो यात्रेत सक्रीय सहभाग


महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात बलाढ्य नेत्यांपैकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे एक आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात राजकारणापासून अलिप्त राहण्याची घेतलेली भूमिका विरोधकांच्या पथ्यावर पडेल, अशी स्थिती आहे. मात्र, आता पुन्हा एक ते राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वयाच्या ८२व्या वर्षी देखील ते शारीरिकदृष्ट्या ते खूप तंदुरुस्त असल्याची प्रचिती ‘भारत जोडो’त राहुल गांधींसोबत तब्बल १०-११ किलोमीटर चालताना आली. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकारणात सक्रिय होतील की काय, या चिंतेतून विरोधकांची झोप उडाली, अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या माध्यमातून सरकारी नोकरी सोडून राजकारणात एन्ट्री केलेल्या सुशीलकुमार शिंदेंची ताकद देशाच्या राजकारणात वाढली होती. अशावेळी मनात आणले असते तर मुलगी प्रणिती शिंदेंना राज्यात केव्हाच मंत्रिपद दिले असते. विधानपरिषदेवर पण घेतले असते. तरीदेखील त्यांनी तसे न करता ‘शहर मध्य मधून २००९ची निवडणूक लढायला लावली. त्यानंतर सलग तीनवेळा प्रणिती शिंदे तेथून आमदार झाल्या. मोदी लाट, ‘एमआयएम’ची क्रेझ आणि स्वकियांचा विरोध, असा चक्रव्यूह त्यांनी भेदला. त्यांना पक्षाने प्रदेश कार्याध्यक्षपद दिले आणि त्यांची ओळख महाराष्ट्रभर पोचली. परंतु, एकीकडे राज्याच्या राजकारणात प्रणिती शिंदेंची ताकद वाढत असतानाच त्यांना ‘होम पिच’ वर पराभूत करण्याचा डावविरोधकांनी आखायला सुरवात केली. ‘फोडा व राज्य करा’ ही विरोधकांची कूटनीती ओळखून सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकारणात सक्रिय होतील, हे निश्चित मानले जात आहे. सध्या पक्षाला व जिल्ह्याला त्यांची गरज असून त्यांची सक्रियता विरोधकांसाठी चिंता वाढवणारी आणि काँग्रेससाठी फायद्याची ठरेल हे निश्चित.
शिंदे पुन्हा सक्रिय होणार असल्याची चर्चा !
कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसतानाही सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ते देशाचे गृहमंत्री, अशी पदे भूषविली. २३ एप्रिल १९७३ ते २०१४ अशा तब्बल ४९ वर्षांत त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत स्वत:साठी ना साखर कारखाना ना शैक्षणिक संस्था उभारली. आपल्या कार्यकर्त्यांना मात्र त्यांनी सढळ हाताने मदत केली. पण, आता त्यातीलच काहीजण त्यांच्याच विरोधात प्रणिती शिंदे यांच्या पराभवासाठी प्रयत्न करीत आहेत, हे विशेष. २००९ ते २०१९ या तिन्हीवेळेस विशेषत: २०१४ नंतर मोदी लाट असतानाही आमदारकीची हॅटट्रिक केलेल्या आमदार प्रणिती शिंदेंच्या पराभवासाठी आता स्वकियांसह विरोधकांनी रणनीती आखायला सुरवात केली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकारणात सक्रिय होतील की काय, या चिंतेतून विरोधकांची झोप उडाली, अशी चर्चा आहे.
आज ही लोकप्रियता कायम!
गावच्या, तालुक्याच्या व राज्याच्या राजकारणात थोडेसे यश मिळाल्यानंतर अनेकांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था, कारखाने असावेत, असे वाटते. पण, १९७३ मधील करमाळा पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी सर्वसामान्यांचे जीवन अनुभवले होते, परिस्थितीची जाण होती. राज्याचा सलग नऊवेळा अर्थसंकल्प त्यांनी मांडला. पुढे १६ जानेवारी ते १ नोव्हेंबर २००४ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. २००४ ते २००६पर्यंत आंध्रप्रदेशाचे राज्यपाल राहिले. देशाचे ऊर्जामंत्री, गृहमंत्री, लोकसभेचे नेते अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी ४९ वर्षाच्या (१९७३ ते २०१४) राजकीय कारकिर्दीत भूषविली. पण, स्वत:च्या फायद्यासाठी काहीच केले नाही, हे विशेष सभा असो वा कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्याला नावानिशी बोलावून ‘काय चाललयं’ अशी विचारणा करणारे, सामान्यांना सहजपणे भेटणारे आणि कोणाचाही फोन आला, तर त्याला लगेच उत्तर देणाऱ्या सुशीलकुमारांनी कधीच डोक्यात हवा शिरू दिली नाही, ही त्यांची जमेची बाजू. त्यांचे आजही राजकीय वजन तेवढेच असून त्यांची राजकीय क्रेझ आजही कायम आहे..