भारत जोडो यात्रा; कीचन कॅबिनेटच्या जिल्ह्यात सामसूम!


खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथुन निघालेली भारतजोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहे. राज्यातील ५ जिल्ह्यात या यात्रेचे १४ मुक्काम असून ३८४ किमी अंतर ही यात्रा चालणार आहे. महाराष्ट्रात येणारी ही यात्रा यशस्वी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, अमित देशमुख यांच्या सह महाराष्ट्रातील प्रमुख कॉग्रेसी नेत्यांनी आपली कंबर कसली असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आणि सोशल मेडियावर झळकत आहेत. मात्र गांधी कुटुंबियांच्या किचन कॅबिनेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खा. रजनीताई पाटील यांच्या बीड जिल्ह्यात मात्र या भारतजोडो यात्रेचा फारसा बोलबाला झालेला दिसत नाही.


देशात निर्माण झालेली अराजकता थोपविण्यासाठी खा. राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी ते काश्मीर अशी सलग ३,५१७ किमी अंतराची भारत जोडो पदयात्रा सुरु केली आहे. कन्याकुमारी, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांचा टप्पा पार करून ही यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे.
महाराष्ट्रात ही यात्रा ५ जिल्ह्यातुन जाणार असून १४ दिवस मुक्काम करणार आहे.
७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा तेलंगणा राज्यातुन महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलुर मध्ये प्रवेश करणार आहे. नांदेड जिल्ह्यात या यात्रेचे ४ मुक्काम असून पुढे ही पदयात्रा हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातुन मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. या १४ दिवसांच्या मुक्कामात राहुल गांधी यांच्या २ जाहीर सभा तर १० कॉर्नर मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे.


खा. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील भारतजोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री गेल्या दोन महिन्यांपासून सतत प्रयत्न करीत आहेत. याचसोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, सतेज पाटील यांच्यासह मराठवाड्यातील अनेक मान्यवर नेत्यांसह महाराष्ट्रातील अनेक नेते कामाला लागले आहेत.


महाराष्ट्रातील ही १४ दिवसांची भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी गांधी घराण्याच्या किचन कॅबिनेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज येथे राहणाऱ्या खा. सौ. रजनीताई पाटील यांची प्रमुख भुमिका राहील, खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातुन सर्वाधिक लोक खा. रजनीताई पाटील यांच्या बीड जिल्ह्यातुन सहभागी होतील असा अंदाज कॉंग्रेस प्रेमी विशेषतः खा. रजनीताई पाटील यांचे समर्थक बांधत होते. पण आज खा. राहुल गांधी यांची भारतजोडो यात्रा महाराष्ट्रात येत आहे तो पर्यंत ही खा. रजनीताई पाटील यांनी भारत जोडो यात्रे संबंधिची अधिक माहिती देण्यासाठी वा या यात्रेत कॉंग्रेस पक्षाच्या किमान आपल्या गटातील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे यासाठी कसल्याही प्रकारची कार्यकर्ते, समर्थक यांची बैठक घेऊन अथवा एखादे प्रसिध्दी पत्रक काढून आवाहन केल्याचे दिसून येत नाही.
खा. सौ. रजनीताई पाटील यांनी या संदर्भात केलेल्या प्रयत्नांची माहिती मिळवण्यासाठी आम्ही स्वतः अंबाजोगाई येथील जबाबदार कॉंग्रेस कार्यकर्त्यांसमक्ष खा. सौ. रजनीताई पाटील, बीड जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि खा. सौ. रजनीताई पाटील यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते राहुल सोनवणे यांचेशी दुरध्वनी वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यापैकी खा. रजनीताई पाटील यांचा फोनच लागू शकला नाही तर राजेसाहेब देशमुख आणि राहुल सोनवणे यांनी फोन लागूनही तो उचलला नसल्यामुळे त्यांची भुमिका समजू शकली नाही.
बीड जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेशी या संदर्भात आम्ही दुरध्वनी वरुन भारतजोडो यात्रे सहभागा संबंधी विचारणा केली असता त्यांनी अद्दाप आपल्याला यात्रेत सहभागी होण्यासाठी चे पासेस उपलब्ध झाले नसल्याचे सांगितले. यासंदर्भात आपण खा. सौ. रजनीताई पाटील यांच्या केज येथील कार्यालयाशी संपर्क साधला मात्र आपल्याला हे पासेस नांदेड येथील नियोजन समितीकडुनच घ्यावे लागतील असे सांगण्यात आल्याचे त्यांनी आपल्या नावाची वाच्चता न करण्याच्या अटीवर सांगितले.
बीड जिल्ह्यातील केज येथील खा. सौ. रजनीताई पाटील यांचे आणि गांधी घराण्याचे वैयक्तिक संबंध सर्वश्रुत आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्या संपुर्ण भारतभर ओळखल्या जातात. याच विश्वासाच्या बळावर खा. सौ. रजनीताई पाटील कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीत गेली अनेक वर्षे आपले स्थान टिकवून आहेत. याशिवाय सतत राज्यसभेवर व एखाद्या राज्याच्या प्रभारी म्हणून त्यांच्यावर सतत जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर आजपर्यंत सोपवलेली आपण पहातो आहोत.


याचमुळे गांधी घराण्याच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खा. रजनीताई पाटील या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील महाराष्ट्रातील १४ दिवसांच्या मुक्कामात राज्यातुन सर्वाधिक तरुणांसह या यात्रेत सहभागी होतील असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र प्राप्त माहितीनुसार खा. सौ. रजनीताई पाटील या आपल्या मोजक्या सहका-यांसह या यात्रेत सलग १४ दिवस सहभागी होणार असल्याची आणि सतत १४ दिवस राहुल गांधी यांच्या सोबत चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.