कापसाच्या किंमतीत १४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ; शेतकऱ्यांना दिलासा!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/Cotton-BCCL.gif)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/Cotton-BCCL.gif)
देशात कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली असून कापूस बाजारात अचानक तेजी आली आहे. या आठवड्यात कापसाच्या दरात १४ टक्के वाढ झाली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला असल्याचे दिसून येते आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. गेल्या आठवड्यात कापसाचे भाव 14 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे देशातील कापसाच्या दरातही सुधारणा झाली आहे. देशाच्या वायदे बाजारात कापसाने प्रति गाठी 50,000 रुपयांची पातळी गाठली आहे.
▪️कापूस बाजारात अचानक तेजी का?
देशात आणि जागतिक बाजारपेठेत कापसाचे भाव पुन्हा सुधारले. झाले असे की, युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर (USDA) आणि आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने 2022-23 मध्ये जागतिक कापूस उत्पादन कमी होईल असा अंदाज वर्तवला आहे.
त्यामुळे कापसाच्या भावांना आधार देत देशातील कापसाचा भावही प्रति गाठी 50 हजारांवर पोहोचला. कापसाच्या एका गाठीचे वजन 170 किलो असते. यंदा अमेरिकेतील कापूस पिकाला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे USDA ला युनायटेड स्टेट्समधील कापूस उत्पादन सुमारे 40 दशलक्ष गाठींनी कमी राहण्याची अपेक्षा होती.
यूएस कापूस निर्यातही यावर्षी 2.5 दशलक्ष गाठींनी कमी राहण्याचा अंदाज आहे. अमेरिकेतून होणारी कापसाची निर्यात कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. या काळात भारतातून कापसाची मागणी वाढेल. भारतातील कापूस लागवड यावर्षी 5 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र पावसाचा पिकावर वाईट परिणाम होत आहे.
महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यानंतर देशातील कापसाच्या भावातही वाढ झाली आहे.
गुरुवारी कापूस वायदा प्रति गाठी 50,000 रुपयांच्या आसपास बंद झाला. बाजार समित्यांमध्ये कापसाचा भाव 10 हजार 300 रुपये आहे. हा दर कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात न्यूयॉर्क कॉटन एक्स्चेंजमध्ये कापसाच किमती 14 टक्क्यांनी वाढून 125 सेंटवर पोहोचल्या. पण कापुस वायदा गुरुवारी 118 सेंटस प्रति पॉंड वर स्थीर झाला होता.