लाल दिव्याची भिती घालवणारा नेता !


बापू…
भगवानराव लोमटे बीड जिल्हा परीषदेचे अध्यक्ष होते, तेंव्हा मी लोकमत मध्ये होतो. पत्रकारीतेच नवीन असलो तरी ब-यापैकी नाव झाले होते. मोठ्या लोकांमध्ये उठबस करण्याची सवय ब-या पैकी जडली होती. असे असतांनाही लाल दिव्यामधून येणाऱ्या व्हिआयपी लोकांबध्दलची भिती मनातुन जायला तयार नव्हती. या लाल दिव्याच्या गाड्यांमधून येणाऱ्या व्यक्तींना भेटावे बोलावे तर लागायचे, मात्र यावेळीचा माझा वावर अत्यंत संकुचित वृत्तीचा होता.
माझा हा भित्रेपणा बापूंच्या लक्षात आला असावा. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाची वेळ आली होती. बापू लाल दिव्याच्या गाडीतून खाली उतरले. माझ्या खांद्यावर हात टाकून त्यांनी मला बाजूला घेतले. आणि मला विश्वासात घेवून सांगू लागले. “रापतवार तुम्ही लोकमतचे प्रतिनिधी आहात. तुम्हाला वारंवार अनेक मोठ्या लोकांना भेटावेच लागते. तेंव्हा ही संकुचित वृत्ती सोडा. लालदिव्याच्या गाडीतून येणारे लोक हे जेंव्हा तुमच्याशी बोलतात, तेंव्हा ते तुम्हाला त्यांच्या बरोबरीचेच समजूनच बोलतात. तेंव्हा त्यांच्याशी बोलतांनाच संकोच तुम्ही मनातुन काढून त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला शिका. तुम्हाला पत्रकारितेत अजून खुप स्कोप आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्या…”
बापूंच्या या सकारात्मक बोलण्याचा माझ्या करीयरवर खुप फायदा झाला. आणि यानंतर माझे बापूंचे संबंध एकदम मधुर झाले. तेंव्हापासून आज पर्यंत पत्रकारिता करतांना राज्यातील मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती, मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आणि इतर अनेक मान्यवर व्हिआयपींना भेटण्याची संधी मिळाली. मात्र बापूंच्या या मंत्रानंतर माझी लाल दिव्याची भिती पार उडाली…


आज बापूंच्या स्मृती दिनानिमित्त बापूंच्या या आणि अनेक आठवणी ताज्या झाल्या.
बापूंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन….