नळदुर्ग पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय असलेले नळदुर्ग उस्मानाबादच्या आग्नेयेकडे हे सुमारे ५० किमी अंतरावर आहे. हा आपल्या पद्धतीचा देशातला एकमेव दुर्ग आहे, ज्यातून नदी वाहते, त्यात शेती करतयेते, नदीवर कोटात धरण आहे, पाण्यात घर आहे, घरावरून पाणी वाहतं. मराठवाड्याच्या तीव्र उन्हाळ्यात थंड राहणारं हे घर आहे. या किल्ल्यामध्ये बेसाल्ट खडकाचं खोरं आहे. यातल्या नदीचं नाव बोरी. या दुर्गाला एका बाजूला टेकडी आहे आणि तीन बाजूंनी तटबंदी आहे. बुरुज दांडगे बांधलेले आहेत. आणि ते जड तोफा पेलण्याइतके मोठे आहेत. दुर्गाचा संपूर्ण परिघ सुमारे दीड मैल आहे.
आतील भाग अर्धवट उध्वस्त भिंतींनी उजाड झालेला आहे. मध्यभागी जाणारा एक विस्तीर्ण रस्ता आहे. किल्ल्याला अनेक बुरुज आहेत त्यापैकी उपली बुरुज किल्ल्याच्या अगदी पोटात आहे आणि भव्य आहे. त्यावरून भोवतीचा अनेक मैल लांबीचा परिसर न्याहाळता येतो. परांडा बुरुज, नगर बुरुज, संगम बुरुज, संग्राम बुरुज, पुणे बुरुज आणि इतर बुरुज आहेत. किल्ल्याच्या आत तटबंदीचे अवशेष आणि काही इमारतींचे अवशेष आहेत. इमारतीतील बारुद कोठा, बारादरी, मशीद, अंबरखाना, रांगण महाल, जाळी इत्यादी इमारती भग्नावस्थेत असल्या तरी या अवशेषांवरून एके काळी ही वैभवशाली वास्तू असल्याचा भास होतो.
किल्ल्यात लोकवस्तीही आहे. किल्ल्यावर दोन पाण्याची टाकी आहेत. मच्छली तोफ, हाथी तोफ आणि मगर तोफ या महत्वाच्या तोफा आहेत. हाथी दरवाजा आणि हुरमुख दरवाजा हे किल्ल्याचे मुख्य दरवाजे आहेत. किल्ला आणि रणमंडळाला जोडणारी इमारत म्हणजे नदीला बांधलेले धरण आहे. बोरी नदी, धरण आणि धरणाच्या मध्यभागी बांधलेला पाणीमहाल.
हा महाल बांधण्यात आला इब्राहिम आदिलशाह दुसराच्या कारकिर्दीत. या किल्ल्यावर हल्ला झाला तरी कितीही वर्षं तो शत्रूला तोंड देऊ शकत असे. कारण किल्ल्यात स्वतःची नदी होती आणि शेतीसुद्धा होती. पाणी आणि धान्याची सोय आतच करता येत असे. दारुगोळ्याचा कारखानाही आतच होता. त्यामुळं कितीही काळ बाहेरच्या शत्रूला तोंड देता येत असे. आदिलशाहीची सौंदर्यदृष्टी या किल्ल्यात ओतप्रोत दिसते. १६८६ साली मुघलांनी हा किल्ला जिंकून घेतला.
Madhyam Network / Madhyam News
#माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी