प्रबोधन

प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मोहरलेला प्रतिभावंत साहित्यिक;

अण्णाभाऊ साठे

जन्मल्या पासून वारणेच्या, कृष्णा, कोयनेच्या खो-यात, डोंगर द-यात, सांगली जिल्हा, तालुका वाळव्याच्या वाटेगावी वयाच्या आकराव्या वर्षापर्यंत आई सोबत भूख पाठीशी बांधून,शाळेची तोंडओळखही निटशी न झालेला पोरगा होता तुकाराम, ज्याला घरचा थोरला म्हणून अण्णा म्हणत, भाऊरावांचा मुलगा म्हणून अण्णाभाऊ. बापासोबत वाटेगावाहून पायी चालत मुंबईतल्या माटुंग्याच्या लेबर कँपवर वास्तव्याला आलेल्या अण्णाभाऊंना मुळात कुठल्याही ज्ञानाची अथवा शिक्षणाची परंपरा नाही.कष्टाचा, दारिद्र्याचा आणि मांगकीच्या हालकी,ढोलकी,तुनतुनं आणि तमाशाचा घरान्याच्या कलेच्या वारशाशिवाय कुठल्या दुस-या औपचारिक शिक्षणाचाही वारसा नाही.भर पावसाळ्यात १ ऑगस्ट १९२० साली जन्मलेल्या आणि भर पावसाळ्चातच १८ जुलै १९६९ ला जगाचा निरोप घेतलेल्या या केवळ ४९ वर्षे आयुष्य जगलेल्या,अंगभूत कलागूणावर उपसलेल्या आणि परिस्थितीनं घडवलेल्या प्रतिभावंत कवीनं, कथाकारानं, नाटककारानं, शाहिरानं, लोकनाट्य लेखक आणि कलावंतानं अर्थातच या थोर साहित्यिकाने मराठी साहित्याच्या इतिहासात मैलाचा दगड म्हणून नोंदवली जावी अशी अजरामर कामगिरी केलेली आहे. वाटेगावच्या मांगवाड्यासह माटुंग्याच्या लेबर कँपची,चिरागनगरच्या झोपडपट्टीची, लालबावटा पथकाची, पोवाडा, छक्कड या साहित्य प्रकाराची, पहिल्या दलित साहित्य संमेलनातील उद्घाटकीय भाषणाची, मराठी कथा आणि कादंब-यांमधून जगासमोर आणलेल्या तमाम शोषित वंचित समाजघटकांच्या व्यथा वेदनांची सुवर्ण अक्षरांनी नोंद केली आहे.

अण्णाभाऊंच्या वाङमयीन कर्तुत्वाची तोंडओळख :

आयुष्याच्या आरंभीचे चौदा-पंधरा वर्षे वाटेगाव आणि परिसरात गरिबीचे चटके भोगत रानोमाळ भटकण्यात आणि पारंपारीक हालकी ढोलकी वाजवण्यात, नदी-नाले-डोंगरांनी रानमेवा आणि शिकारी करण्यात घालवलेल्या अण्णाभाऊंनी मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या बकाल वस्तीत राहून लालबावट्याच्या तत्वज्ञानाचे धडे गिरवले. जगण्यानं बघीतलेली सगळी दु:खे सगळा अपपरभावी जीवनव्यवहार पाहिला, अन्याया-अत्याचार आणि एकूनच शोषणाविरुद्विध कामगारांना लढे उभारण्यासाठी मिळत गेलेले कम्युनिष्ठांची तात्विक रसद पाहिली आणि अंत:करणाला फुटत गेलेला पाझर शब्दबद्ध करत गेले. अवघ्या ४९ वर्षे आयुष्य लाभलेल्या अण्णाभाऊंनी १३ कथासंग्रह, ३५ कादंब-या, ३ नाटकं, १४ तमाशे, १० पोवाडे,१ प्रवास वर्णन, आणि हयातीत ७ कादंब-यांवर बेतलेले सिनेमे काढले.साहित्य क्षेत्रात हे असे अतुलनीय कर्तुत्व सिद्ध केलेल्या अण्णाभाऊं या प्रतिभावंत साहित्यिकाची दृष्टी चौफेर होती.दु:ख मग ते कोणाचंही असो दु:ख आहे आणि ते वेदनादायी आहे, ही प्रगल्भ जाण त्यांच्या करुणेनं ओथंबून गेलेल्ला लेखणीला आहे.
जेष्ठ कवी शेषराव शिंदे म्हणतात…

“अण्णाभाऊच्या लेखणीला होती शपथ समतेची
दिधला साहित्यात मान आठरापगड जातीला.

वाटेगावाच्या वस्तिला एका अंध्या-या रातीला
अण्णाभाऊच्या जन्मानं सुटला सुगंध मातीला.”

साहित्याच्या सगळ्या शाखांनी अण्णाभाऊंनी तमाम जाती जमातीचं दु:ख वेशीवर टांगलं आहे.अडल्या नडल्या माणसाचे प्रश्न आपल्या सडेतोड लेखणीने मुखरीत केले आहेत.मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवाव्यात अशा कलाकृती अण्णाभाऊंनी लिहिल्या आहेत.

अण्णाभाऊंची लोकप्रिय कादंबरी ‘फकिरा’ आज आपण का वाचली पाहिजे ?


कादंबरीच्या क्षेत्रात १९६० साली महाराष्ट्र शासनानं उत्कृष्ठ वाङमय पुरस्कारानं गौरवलेली ‘फकिरा’ ही एकच कलाकृती अण्णाभाऊंचं मोठेपण अधोरेखीत करायला पुरेशी आहे. ही कादंबरी अण्णाभाऊंनी १९५९ साली प्रकाशीत केली, जी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे.याच कादंबरीचं भलं मोठं थोरलेपण आणि तत्कालीन परिस्थितीतील वाङमयीन वातावरणाला छेद देणारं आगळं वेगळं रसायण म्हणून आणि अर्थातच काळाच्या भाळावर आपल्या अभिजात प्रतिभेची मोहर उमटवणारी, वाङमयीन दृष्ट्या श्रेष्ठ कादंबरी असल्याची नोंद या वि.स. खांडेकरांनी आपल्या प्रस्तावनेतच केली आहे.

अण्णाभाऊंच्या समग्र साहित्यावर आरंभीच्या काळात थोर विचारवंत डॉ.बाबुराव बागूल आणि प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर यांनी सखोल संशोधन केले आणि आयुष्यभर समाज प्रबोधन केले आहे.आदरणीय विचारवंत माधवराव गादेकर सरांच्या मते अण्णाभाऊंच्या साहित्यीने ‘पुरुषाचा स्वाभिमान, स्त्रियांचं शील आणि देशाचं स्वातंत्र्य’ या मूल्यांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून मौलिक शब्दात साकारले आहे. आदरणीय विचारवंत बाबुराव बागुल म्हणतात तसी ही कादंबरी ‘एकेकाळी सह्याद्रीची गिरीशिखरे तुडवीत महाराष्ट्रातील शेठ-सावकार आणि ब्रिटीश सरकार यांना खोब-याच्या वाटीप्रमाणे घोड्याच्या टाचेखाली तुडविणा-या फकीराची शौर्यगाथा आहे’. गावच्या आब्रुसाठी झुरणा-या गावच्या मोठ्या माणसांच्या स्वप्नांखातर शत्रुशी कडवट झुंज देवून धारातिर्थी पडणा-या जिगरबाज तरुणांची ही नितांत सुंदर कादंबरी आहे. ही कादंबरी गावकुसाबाहेर सांबरात राहणा-या मांगवाड्यातील जिगरबाज मांगाची आणि फकिरा या त्याच्या शुरवीर लेकाची रोमहर्षक शौर्यगाथा जशी आहे तशीच ती गावातल्या शंकर पाटील आणि विष्णुपंत कुलकर्णीं सारख्या गावाचं भलं व्हावं म्हणून तत्कालीन ब्रिटीशांशीही वैर घेणा-या भल्या माणसांचीही संस्मरणीय गाथा आहे.

आपल्याच गावच्या आडदांड मराठा समाजाच्या माणसाने किरकोळ कारणावरुन गरीब बाईमाणसाची केलेली बेईज्जत आणि क्रूर मारहान पाहून, त्याला समजावून सांगूनही ऐकत नाही हे दिसल्यावर कु-हाडीनं त्याची खांडोळी करणारा मराठा समाजाचाच विवेकी तरूण सत्तु भोसले याच ‘फकिरा’ कादंबरीतल्या एका प्रकरणात फकिराचा जिव्हाळ्याचा दोस्त म्हणून ओझरता आलेला आहे. तत्ककालीन मराठा समाजाच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध जसा सत्तू भोसले लढतो आणि परीसरातील तमाम सावकार, गावगुंड आणि हुंड्यापायी जाळभाज करुन बायका न नांदवणा-या सासरच्या माणसांचा कर्दनकाळ होतो. अण्णाभाऊंच्या याच फकिरा कादंबरीमुळं मराठी साहित्यात आपलिया न्यायप्रिय भूमीकेमुळं अजरामर झालेल्या सत्तू भोसलेंवर नंतर अण्णाभाऊंनी ‘वारणेचा वाघ’ ही स्वतंत्र कादंबरी लिहीली आणि याच कादंबरीवर मराठी सिनेमाही काढला.हा मूल्यासाठी आणि माणुसकीसाठी तळहातावर प्राण घेऊन लढणारा जिगरबाज सत्तु भोसलेही याच कादंबरीची देन आहे. सत्तू भोसलेला स्वकियांच्या आणि इंग्रजांच्या कचाट्यातून सहीसलामत सुडवून जीव वाचवणा-या फकिराबद्दल ‘नाईक’ असा आदरपुर्वक अभिवादन वापरुन असा जिगरबाज भाऊ आपल्या पाठीशी असण्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो.

या कादंबरीनं दबल्या पिचल्या गावकुसाबाहेरील मांग माणसाला त्याच्या शौर्याचा इतिहास दिला. भयानक दुष्काळाच्या झळांनी वाटेगावचा मांगवाडा सांबरात आज मरतो की उद्या मरतो अशा अवस्थेत बेडसगावचा खजीना लुटण्याची मोहीम फकिरा आणि त्याचे सवंगडी राबवतात. मोहीमेदरम्यान वाड्यातल्या महिला आणि लेकीबाळी एका खोलीत सगळ्यांना कोंडून घेतात.धन दौलत लुटली तरी चालेल पण आपल्या अविवाहित मुली जपल्या जाव्या हा त्या मागचा हेतू. फकिरा जेंव्हा दार उघडण्यासंदर्भात दरडावतो तेंव्हा आतून ही शंका व्यक्त करुन गयावया केली जाते तेंव्हा फकिरा जे बोलतो ते कुण्याही संवेदनशील मनुष्याला त्याच्या बद्दल आदरभाव वाटावा असंच आहे. फकिरा घापरलेल्या माय-बहिनींना दिलासा देतो.माय माऊल्यांची इज्जत लुटून भरणारी त्याची औलाद नसल्याचं सांगून मटक-याचा मठ लुटतो आणि गोरगरीबांना समसमान धान्यवाटप करुन जगवतो. हा असा अन्यायी मग्रुर सत्तेला लुटून, मठांनी धनधान्य आणि संपत्तीचा धनसंचय करणा-या मठक-यांना लुटून जनता जगवतो.जिथं सरकारंच परीस्थितीवर कानाडोळा करुन ही आपली जबाबदारीच नाही अशी भूमीका घेतं तेंव्हा मग शंकर पाटील असोत नाही तर विष्णूपंत कुलकर्णी अशा रानोजी सारख्या, फकिरा सारख्या शूरविरांच्या पाठीशी उभे रहातात, हे आजही आपण शिकण्यासारखं आहे.

मराठी कादंबरीनं शंकर पाटीलांसारख्या मराठा समाजातल्या माणसाचा मूल्यसंघर्ष काय असतो हे दाखवून दिलं. सत्तू भोसले़सारखे मराठा समाजाचे स्वाभिमानी तरुण हा मूल्यसंघर्ष कसा करतात याचं भव्यदिव्य विराटदर्शन याच कादंबरीनं दिलं. निळू फुलेंनी साकारलेलं बेरकी,थापाड्या आणि वासनेच्या अंगानं जाणारं कुटानेखोर पाटलांचं खलनायकी व्यक्तीरेखा कुठं आणि अण्णाभाऊंच्या फकिरा कादंबरीतील ही सोण्यासारखी मराठा समाजाची माणसं कुठं.याच कादंबरीत गावगाडा चालवणारे, गावाचं नेतृत्व करणारे लोक मग ते कुण्याही जातीसे असोत, कसे असावेत यासाठी शंकर पाटील आणि विष्णूपंत कुलकर्णींसारख्या माणसांचा नीतीमूल्यासाठी कोणत्याही संकटाला निधड्या छातीनं पुढं जाणारा संघर्ष पाहिला पाहिजे. ‘उकिरड्याचाही पांग फिटतो अन् तुम्ही तर माणस आहात तुम्ही जगल पाहिजे’ हे दुष्काच्या सावटात सापडलेला गावाचा मांगवाडा मरणावस्थेत असताना या दबल्या पिचल्या माणसांचं बळ बांधण्यासाठी विष्णुपंतांचं विधान विसरण्याजोगं नक्की नाही.

गावात देवीची जत्रा भरवण्यामागचं अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थातच समाजशास्त्र समजून घ्यायचं झालं तर कुण्याही नेतृत्व करु पाहणा-या आणि किमान वाचता येणा-या मनुष्यानं फकिरा कादंबरी एकदा तरी नजरेखालून घालायलाच पाहिजे.जोगणीची जत्रा आपल्या गावात भरवली जावी असं शंकर पाटलांना विष्णपंत कुलकर्णींना का वाटावं ? त्यावर रानोजी मांगानं आणि नंतर फकीरानं का जीवाची जोखीम घेऊन मोहीम फत्ते करावी.स्वत:चं शीर गेलं पण जोगणी आपल्या शिवंत घेऊन येणारा फकिराचा शूरवीर बाप रानोजी मुळातुनच वाचला पाहिजे.हीच कहानी पुन्हा फकिरा कसा फत्ते करतो आणि गावदैवचीची जत्रा भरवून गावचा मानपान वाढवतो. या मानपानाच्या पालखीला पूजा करण्याचा पहिला मान फकिराचा आजोबा,आज्जी,माय यांना कसा देतो गाव ही कृतज्ञताही आज डोळ्याखालून घालून आमलात आणण्यासारखी आहे.

भूख किती भयंकर असते आणि भुखेपायी कसले कसले रणसंग्राम होवू शकतात याचा जरा जरी इतिहास चाळावा वाटला तरी ही कादंबरीच आपण एकदा वाचावी असंच मी म्हणेन.गोर गरीब माणसं आपुलकीनं, जिव्हाळ्यानं आणि अगदीच प्राणपणानं जपले तर जिवाला जीव देऊ शकतात, याचं जितं जागतं चित्रण ही कादंबरी करते.शंभर सव्वाशे पानाचं हे मोडून पडलेल्या माणसाला आपला स्वाभिमानी इतिहास सांगणारं पुस्तक आपल्या घरात नसावं आणि आपण ते वाचलेलं नसावं म्हणजे आपण आपल्या पुर्वजांचा पराक्रमी चेहराच अजून पाहिला नाही असंच म्हणावं लागेल.

 

प्रा.डॉ. मुकुंद राजपंखे
प्रा.डॉ. मुकुंद राजपंखे

या लेखाचे लेखक प्रा. डॉ मुकुंद राजपंखे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझलकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या आणि गायीलेल्या अनेक गझला लाखो श्रोत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे प्रमुख असून पदवी, पदव्युत्तर विभागात ज्ञानदानाचे आणि संशोधनाचे काम करतात.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker