नाशिक मध्ये अतिवृष्टी; गोदावरीला पूर, दुतोंड्या मारूती पाण्याखाली
जायकवाडीत 5533 क्युसेक पाण्याची आवक


मागील तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचाविसर्ग सुरु आहे. पाण्याचा जोर लक्षात घेऊन विसर्ग कमी जास्त करण्यात आला. मुसळधार पासामुळे नाशिकच्या गोदावरीतील दुतोंड्या मारूती पाण्याखाली गेला आहे.
गंगापुर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मागील २ दिवसांपासून अतिवृष्टी होत असून गंगापूर प्रकल्पाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रामधून गोदावरी नदीमधे सकाळी होळकर पुलाजवळ 7000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरु आहे. पाऊसचा जोर पुढचे काही दिवस असाच रहाणार असल्याने गंगापूर धरणामधून आज दुपारी 11 वाजता सुरुवातीला 1500 क्यूसेक्स विसर्ग करण्यात येऊन तो टप्याटप्याने वाढविण्यात येत आहे. त्यामूळे होळकर पुलाजवळ गोदावरी नदीत पाण्याची पातळी वाढणार असल्याने नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना नागरिकांना प्रशासनामार्फत देण्यात आल्या.
आज रोजी 1:00 वा. गंगापूर धरणातून 5500 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्याचे नियोजन होते. पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी 2 वाजता धरणातून 10000 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते.
दरम्यान सप्तश्रृंगी गडावर ढगफुटी झाल्याची माहिती आहे. यामुळे गडावर पाणीच पाणी झाले होते. गडाच्या पायर्यावरून पाण्याचा लोंढा सुरु होता. दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही भाविक जखमी झाल्याची
प्राथमिक माहिती आहे.
आदित्य ठाकरे यांनी उभारलेला लोखंडी पूल पाण्याखाली, त्र्यंबकच्या शेंद्रीपाड्यात झाले होते उदघाटन
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील शेंद्रीपाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे (Aaditya Thakaray) यांनी भेट दिलेल्या शेंद्रीपाड्यातील लोखंडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ये जा करण्यासाठी आता हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
शहरासह जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरु असून मंगळवार पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर आता पर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आलेला शेंद्री पाडा येथील लोखंडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांची येजा पूर्ण पणे थांबली आहे.
मे महिन्यात त्र्यंबक (Trimbakeshwer) तालुक्यातील शेंद्रीपाडा येथील महिलांचा लाकडी बल्ल्यावरील जीवघेणा प्रवास माध्यमांनी उजेडात आणला होता. त्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेत संबंधित पुलावर लोखंडी पूल उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही दिवसांतच या ठिकाणी लोखंडी पूल उभारण्यात आला होता. शिवाय या लोखंडी पुलाच्या उदघाटनासाठी स्वतः आदित्य ठाकरे आले होते.
दरम्यान गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेला पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आदित्य ठाकरे यांच्यां माध्यमातून बसविण्यात आलेला तास नदीवरील लोखंडी पुल पाण्याखाली गेला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा शेंद्रीपाडा परिसरातील महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष एबीपी माझाने महाराष्ट्रला दाखविला. त्यांनतर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनाच्या माध्यमातून तास नदी काठावर लोखंडी पूल बसविला. 30 फुटाहून अधिक उंचीवर पूल बसविण्यात आला होता. पावसाळ्यात पूल पाण्याखाली जाईल, पुलाचा उपयोग होणार नाही अशी माहिती स्थानिकांनी त्याचवेळी प्रशासनाला आणि युवासेना पदाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि आता पहिल्याच पावसात लोखंडी पूल पाण्याखाली गेला आहे.
पाण्यासाठी महिलांचा संघर्ष
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सगळीकडे नदी, नाले, विहिरी तुडुंब भरले आहेत. पावसाने (Rain) बळीराजा देखील सुखावला आहे. मात्र एवढा पाऊस पडूनही महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष आजही जैसे थे आहे. नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील शेंद्री पाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथील महिला भर पुरात पाण्याचा हंडा डोक्यावर घेत वाट काढत आहेत.