

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे १ जून २०२२ पासून आतापर्यंतच्या साधारण चाळीस दिवसात पावसाशी संबंधित घटनांमुळे राज्यभरात एकूण ७६ जणांना मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ७६ पैकी ९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली असल्याचं ANI वृत्तसंस्थेने ट्रिट करून दिली आहे.
A total of 76 people have lost their lives due to rain-related incidents in Maharashtra since 1st June 2022 till date. Out of 76, 9 people died in the last 24 hours: State Disaster Management Department
— ANI (@ANI) July 10, 2022
दरम्यान राज्यभरात झालेल्या पावसामुळे तब्बल ८३८ घरांचे नुकसान झाले आहे आणि ४९१६ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आपत्ती एमजीएमटी विभाग आणि पुनर्वसन विभागाने ३५ मदत शिबिरे स्थापन केली असल्याने पीडितांना मदत पोहचविण्यात मदत होतं आहे. दरम्यान याचं कालावधी मध्ये सव्वाशे प्राण्यांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्या भरापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सुरुवातीला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार पाऊस झाला नाही. परंतु आता राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाने कहर केला आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जून महिन्यात देशातील वायव्य प्रदेशातील दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा येथे, तर पश्चिम किनारपट्टीवर केरळ, गोवा, कोकण, रायगड, ठाणे, मुंबई येथेही पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे ईशान्य भारतातील बहुतांश प्रदेशदेखील महापुराने वेढलेले आहेत. परंतु, भारतीय हवामान खात्यातर्फे (आयएमडी) सांगण्यात आले आहे की, आसाममध्ये १९८९ ते २०१८ या काळात जून ते सप्टेंबर महिन्यातील मोसमी पावसाचे प्रमाण थोडे कमी होत आहे. तसेच जुलै महिन्यात राजस्थान, पंजाब आणि हरियाणा व पश्चिम किनारपट्टीच्या सर्व भागांना पाऊस झोडपून काढेल, असाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.
एकीकडे मध्य भारतात पावसाच्या प्रमाणात ३० टक्के घट नोंदवण्यात आली आहे, तर दुसरीकडे ईशान्य भारतात २२ टक्के जास्त पाऊस यंदा बरसला आहे. देशभराच्या पावसाच्या नोंदणीचा विचार करता, हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे एकूण आठ टक्के पाऊस कमी पडला आहे. पण, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई व महानगरातील स्थिती
जून महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काळात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मुंबई व महानगरात वाहतुकीची दाणादाण उडाली. पहिल्याच पावसाने मुंबईकरांना वेठीस धरले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी तुंबणार नाही, रस्त्यांवर खड्डे पडणार नाही, असे केलेले दावे खोटे ठरले आहेत. हवामान विभागाच्या नोंदणीप्रमाणे कुलाब्याला २२७.८ मिमी पाऊस, तर सांताक्रुझला १७५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पालिकेच्या माहितीप्रमाणे, माहिम, दादर, धारावी, परळ आणि वरळी येथे 200 मिमी पावसाची नोंद झाली व अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. ‘जी’ दक्षिण विभागात २०८ मिमी व ‘एच’ पश्चिम विभागात १९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. माहिमचे नागरिक सुनील देशमुख म्हणतात की, “हिंदमाता जंक्शन व किंगसर्कलमधील रस्ता पाण्याखाली गेला होता आणि वाहतूक कोलमडली होती. पावसाचे गुडघाभर पाणी साचल्याने व रस्ता तुंबण्याच्या समस्या अंधेरी, जुहूला व अनेक ठिकाणी सुद्धा अनुभवाला मिळाल्या.” तलावातील प्रदेशात जास्त पाऊस न पडल्याने तलावातील पाणीसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झालेली नाही. महानगर प्रदेशातील ठाणे, नवी मुंबई इत्यादी भागात जोरदार पाऊस बरसल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु होती.तसेच कल्याण-बदलापूरच्या ग्लोब बिझनेस पार्क आणि विमको नाका येथे पाणी तुंबले होते. ठाण्याच्या वंदना सिनेमा व कोळीवाडा येथे ठाणे स्थानकाजवळ पाणी साचले होते.
पहिल्या पावसात व काल-परवापासून कोसळणार्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याची समस्या उद्भवली होती. मुसळदार पावसाच्या तडाख्यात मुंबईत ६० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. १० ते १२ ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. धारावीत पाणी साचल्याने पालिकेचे दावे पुन्हा फोल ठरल्याची संतापाची प्रतिक्रिया स्थानिकांकडून केली जात होती. येथील लोकसंख्या एक लाखांपर्यंत असूनही पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात मुंबई महापालिका अयशस्वी ठरली आहे.