प्रबोधन

पेशवाईतील स्त्रिया… मस्तानीबाई

जेंव्हा एखाद्या व्यक्ती बद्दल पुर्ण माहिती नसते तेंव्हा ते व्यक्तिमत्व गूढ ठरते म्हणुनच इतिहासाच्या दृषटीने मस्तानीबाई गुढ ठरतात ..

पेशवाई म्हणजे जशी अनेक थोर पुरुषांच्या कर्तृत्वाची यशोगाथा आहे तसा अनेक स्त्रियांच्या धगधगत्या होमकुंडाचा इतिहासही आहे …पेशवाईत थोरल्या राधाबाई गोपिकाबाई ,पार्वतीबाई, रमाबाई या स्त्रियांना वलय मिळालं .. गंगाबाई , यशोदाबाई, सगुणाबाई , धाकट्या राधाबाई अशा अनेक स्त्रिया दुर्लक्षित राहिल्या … पण आनंदीबाई आणि मस्तानीबाई या दोन स्त्रियांच्या नावा भोवती मात्र कायम गुढ राहिलं …

श्रीमंत बाजीराव आणि मस्तानीबाई ही समाजाने नाकारलेली तरल प्रेम कहाणी होती हे लक्षात घ्यायला हवे, इतिहासात जरी श्रीमंत बाजीराव आणि मस्तानीबाई यांच्या लग्नाचे दाखले उपलब्ध नसले म्हणुन मस्तानीबाई बाजीरावांची रक्षा किंवा नाटकशाळा ठरू शकत नाहीत .. . त्या काळात पेशवाईतील अनेक पुरुष नाटकशाळा बाळगुन होते … ती त्या काळच्या समाज व्यवस्थेने स्वीकरलेली पद्धती होती , असे असले तरी अशा नाटकशाळा किंवा रक्षा पैकी किती स्त्रियांचा वंश किंवा पुढची शाखा प्रचलित आहे ? पण मध्य प्रदेश मध्ये बांदा प्रांतात मस्तानीबाईची शाखा रुजली आणि वाढली …पेशवे घराण्याने स्वीकारल्या शिवाय हे असं घडणं शक्य नव्हते…

मस्तानीबाई म्हणजे बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. राजा हिंदू होता पण मस्तानीबाईची आई इराणी किंवा अफगाणी मुस्लिम धर्मीय होती , त्या राजा राणीची ही कन्या, दुरदैवाने मस्तानी च्या जन्मा बद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही.

मस्तानीबाई म्हंटले की पाहिला विचार येतो … त्यांचे सौंदर्य !! त्या सौंदर्या बद्दल बऱ्याच दन्तकथा प्रचलीत आहेत पण त्याला इतिहासाचा आधार नाही , असं असलं तरी साक्षात श्रीमंत भाळतात म्हणजे नक्कीच विशेष सौंदर्य असेल असं म्हणायला जागा आहे …
“मस्तान” हा खरं तर मुळ फारसी विशेषशणार्थी शब्द ज्याचा अर्थ सौंदर्यवान , आकर्षक , उन्मत्त , धुंद …आणी मस्तान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप म्हणजे मस्तानी ! या वरून एक कल्पना येऊ शकते कदाचित तिच्या मोहक रूपा मुळेच आई वडलांनी तिचे नाव मस्तानी ठेवले असावं ….

पण हे होत असताना कदाचित नियती हसत असावी तिने या रूपवतिला इतिहासातील शापित सौंदर्य ठरवायचा घाट आधीच घालुन ठेवला होता !!

श्रीमंत बाजीराव आणि मस्तानीबाई यांची नेमकी भेट कधी ,केंव्हा, कुठे झाली याचे नेमके पुरावे उपलब्ध नाहीत … श्रीमंत बाजीरावांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० चा इतिहासकारांच्या मते या दोघांच्या वयात १३-१४ वर्षाचे अंतर होते , याचा अर्थ १७१३-१४ च्या सुमारास मस्तनीबाई चा जन्म असावा .. दोघे एकमेकांच्या आयुष्यात आले तेंव्हा त्यांची वयं असावीत जवळपास एकोणतीस आणि सोळा ..
२८ एप्रिल १७४० ला श्रीमंतांचा नर्मदातीरी रावेरखेडीला मृत्यु झाला , म्हणजे या उभयतांचा सहवास होता १०-११ वर्षांचा …या दहा अकरा वर्षात अक्खी पेशवाई ढवळुन निघाली होती …

समाजाने जरी नाकारले तरी तिने मनाने बाजीरावाना स्वीकारले होते , जेव्हढे वर्ष सहवासात राहिल्या तेवढी वर्षे भाषा , पेहराव , भोजन पद्धती ब्राम्हणांचा स्वीकारला असं रियासतकार लिहितात ….मस्तानीबाई अश्वरोहणात कुशल होत्या , तलवारबाजी भालाफेक त्या जाणुन होत्या , मोहिमांत त्या बाजीरावाना साथ देत … वेगात घोडेसवारी करण्यात दोघेही पटाईत होते …

” रात्र ही झोपेकरिता नाही, तर ती बेसावध शत्रूच्या छावण्यांवर हल्ला करण्याची देवाने दिलेली नामी संधी आहे. झोप ही घोड्यावर बसल्यावरही घेता आली पाहिजे.’ असे उद्गार थोरल्या बाजीरावाचे होते .. त्यांना घोड्यावर बसून झोप घेण्याची कला अवगत होती … अशा या इतिहास पुरुष बाजीरावांची खास स्त्री म्हणजे मस्तानीबाई ….

१७३४ च्या सुमारास बाजीरावांना मस्तानीपासून समशेरबहाद्दर हा पुत्र झाला. त्या वेळेस बाजीराव मोहिमेवर होते , ह्या बाळंतपणात मातोश्री राधाबाई आणि काशीबाईनी त्यांची पुर्ण काळजी घेतली होती.. पुढे जाऊन समशेर बहादरना पेशवे घराण्यात व राजकारणात मानाचं स्थान लाभलं …. शनिवारवाड्यात सगळ्यांनी भरभरून प्रेम दिले …समशेर बहाद्दर १७६१ साली पानिपतावर धारातीर्थी पडले …. पुढच्या पिढीला पेशव्यांनी मध्य प्रदेशातील बांदा येथे जहागिरी दिली . या सगळ्या गोष्टी मस्तानीबाईचं स्थान मान्य करायला पुरेशा होतात …

पण ….

हयातीत खुप दुःख भोगलं … पुण्याने कधीच स्वीकार केला नाही , दोनदा कैद झाली .. १७३९ आणि १७४० …बाजीरावानी शनिवार वाड्यात मस्तानी महाल बांधला , पण सुख नशिबात नव्हते. त्याकाळचा सनातनी समाज ह्या नात्याला स्वीकारायला तयार नव्हता ,वाड्यात काशीबाई इतके जवळचं कोणीही नव्हते , काशीबाईच्या मनाचा मोठे पणा , त्यांना मस्तानीबाई बद्दल सहानभुती वाटत होती , त्यांनी समजावुन आणि संभाळून घेतले. मातोश्री राधाबाई किंवा चिमाजी आप्पाना मस्तानीबाई बद्दल व्यक्तिगत राग नव्हता , त्यांना राज्यहितासाठी कठोर व्हावे लागत होते , त्यात ही दोन्ही व्यक्तिमत्वे अत्यंत करारी , कर्मठ आणि कर्तबगार होती यात वादच नाही … पण या सगळ्याचा परिणाम मस्तानीबाईला आयुष्याची ओढाताण देऊन गेला हे मात्र खरं !

या नात्यामुळे पेशवे परिवारात अनेक वाद उदभवले अनेक वादळे आली आणि त्याचे पडसाद सगळी कडे उमटले … मग सुरु झालं बाजीराव आणि मस्तानीबाई यांचा एकमेकांशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न … ते एकत्र राहात असताना त्यांच्या कडे इतरांचे येणे जाणे बंदच झाले , या वर उपाय म्हणुन मस्तानीला कैद करण्याचा मार्ग काढला गेला

पाबळ हे मस्तानीबाईंना उदर निर्वाह खर्चा साठी दिलेले गाव , इथे गावाच्या वेशिलगत बाजीरावांचा प्रशस्त वाडा होता , जवळच एक मशीद बांधली होती , वाड्यात एक विहीर होती , त्या विहिरीचे पाणी मस्तानीबाई पुण्यात असताना त्यांना रोजच्या वापरासाठी पुण्यात येत असे अशी वंदता आहे …

रावेरखेडी मुक्कामी २८ एप्रिल १७४० ला बाजीरावांची जीवनयात्रा संपली ,त्या वेळेस मस्तानीबाई पुण्यात कैदेत होत्या , श्रीमंतांच्या मृत्युची बातमी समजल्या नंतर केंव्हातरी मस्तानीबाईचा मृत्यु झाला , नैसर्गिक मृत्युची शक्यता कमीच आहे …मस्तानीबाईची कबर आणि मशीद पाबळला आहे .

मस्तानीबाई सती गेल्या अशी एक समजुत आहे , सती जाण्याचे दोन प्रकार असतात सहगमन म्हणजे पतीच्या मृत देहाबरोबर स्वतःचे दहन करून घेणे , पतीच्या मृत्युच्या वेळेस पत्नी जवळ नसेल तर असते अनुगमन म्हणजे पतीच्या वापरातील एखादी वस्तु सोबत घेऊन आयुष्य संपवणे , त्यामुळे मस्तानीबाईंचा मृत्यु अनुगमन पद्धतीत मोडु शकतो.

१७५३ मध्ये समशेर बहाद्दर च्या विवाह प्रसंगी पेशव्यांनी मस्तानीबाईंच्या स्मृती करता सुवासिनींना भोजन दिले… हा विवाह प्रसंगी होणाऱ्या नंदी श्राध्दाचा भाग असतो … मस्तानीबाईंच्या मृत्यु नंतर पेशव्यांच्या देवघरात मस्तानीबाईंचा टाक खुद्द चिमाजीअप्पानी करवुन घेतला होता , पेशवे कुटुंबात स्त्री सती गेल्यानंतर तिच्या नावाचा टाक करून देवघरात ठेवायची पद्धत होती असे टाक अन्नपुर्णाबाई , रमाबाई आणि मस्तानीबाई या तिघींचे असल्याची नोंद आहे … ह्या सगळ्या गोष्टी मस्तानीबाईचं पेशवाईतील स्थान ठरवायला पुरेशा आहेत …

हिंदुधर्मातील सटवाई जन्माच्या पाचव्या दिवशी कपाळी भविष्य लिहते असे म्हणतात … त्या सटवाई ने कदाचित मस्तानीबाईच्या नशिबी जन्मभर अवहेलना आणि मृत्यु नंतर गुढता लिहिली असावे …

मस्तानीबाईच्या अवहेलनेला जबाबदार कोण ? पेशवे कुटुंबीय ? त्या काळचा समाज ? की त्यांचे प्राक्तन ?

साडे तीनशे वर्षा नंतर जर आजही हिंदु – मुस्लिम विवाहाला सहजा सहजी समाज मान्यता मिळत नसेल तर, त्या काळातील सनातन पेशवे घराण्याला किंवा समाजाला दोष देणे कितपत बरोबर आहे ? हा प्रश्न आपणच स्वतःला विचारायला हवा… म्हणुणच आपण त्यांचे प्राक्तन किंवा विधिलिखित एवढेच म्हणु शकतो !!!

बिपीन कुलकर्णी

संदर्भ –
पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )
मराठा रियासत खंड 3

#पेशवाईतीलस्त्रिया

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker